‘मुघलप्रेमी’ असणाऱ्या बोलघेवड्या…; भाजपच्या ‘या’ मंत्र्यांची आव्हाडांवर जोरदार टीका

‘मुघलप्रेमी’ असणाऱ्या बोलघेवड्या…; भाजपच्या ‘या’ मंत्र्यांची आव्हाडांवर जोरदार टीका

मुंबई : अफजल खान आहेत, म्हणून शिवाजी महाराज…, शाहिस्तेखान आहेत म्हणून शिवाजी महाराज आहेत ना ! तुम्ही मुलांचा इतिहास काढल्यावर कसं चालेल”, असं वादग्रस्त वक्तव्य राष्ट्रवादी काँग्रेसचे आमदार जितेंद्र आव्हाड (Jitendra Awhad) पुण्यातील एका कार्यक्रमात बोलताना केले. यावेळी त्यांनी भाजपवर निशाणाही साधला. यामुळे भाजपा नेतेही आता आव्हाड यांच्यावर जोरदार टीकास्त्र होताना दिसत आहे. राज्याचे कॅबिनेट मंत्री भाजप नेते रविंद्र चव्हाण ( Ravindra Chavan) यांनी जितेंद्र आव्हाडांवर जोरदार टिका केली.

त्यानंतर आव्हाड यांनीही मंत्री महोदयांवर पलटवार केला. या मुद्द्यावरुन दोन्ही नेत्यांमध्ये चांगलाच वाद पेटण्याची शक्यता आहे. जितेंद्र आव्हाड यांनी या अगोदर औरंगजेब हा क्रूर नव्हता, असे विधान केले होते. त्यानंतर, आता परत एकदा अफजल खान आहेत, म्हणून शिवाजी महाराज, असे म्हटल्याने पुन्हा एकदा वाद निर्माण झाला. भाजप नेते रविंद्र चव्हाण यांनी जितेंद्र आव्हाड यांना मुघलप्रेमी म्हणत त्यांच्यावर जोरदार टीका केली.

जाहीर निषेध ! मुघलप्रेमी असणाऱ्या बोलघेवड्या जितुजींनी पुन्हा एकदा मुघलांवर स्तुतीसुमने उधळत छत्रपती शिवाजी राजांबद्दल चुकीचे उद्गार काढले. छत्रपती शिवाजी महाराज आहेत म्हणून तुम्ही आम्ही आहोत, हे विसरू नको. शेवटी’जित्या’ची खोड… तेच खरं, अशा शब्दात मंत्री चव्हाण यांनी आव्हाड यांच्यावर जोरदार निशाणा साधला. जितेंद्र आव्हाड यांनीही त्यावर पलटवार केला.

‘हे सगळे समजायला अक्कल लागते…औरंगजेब अफजल खान हे इतिहासातून काढून टाकले, तर मग शिवाजी महाराजांची लढाई कुणाबरोबर झाली. त्यांचे शौर्य चलाखी युद्ध नीति कशी समजावणार… जाऊदे तुमचा दोष नाही. हे सगळे समजणे म्हणजे मुंबईचा गँगवॉर नाही…झाकली मूठ सव्वालाखाची..,’ असे म्हणत आव्हाड यांनी रविंद्र चव्हाण यांच्यावर देखील पलटवार केले आहेत.

Tags

follow us
  • fb
  • instagram
  • youtube