“पटोलेंचं वक्तव्य असंवेदनशीलतेचा कहर, माफी मागा”; बावनकुळेंनंतर फडणवीसही चिडले

“पटोलेंचं वक्तव्य असंवेदनशीलतेचा कहर, माफी मागा”; बावनकुळेंनंतर फडणवीसही चिडले

Devendra Fadnavis replies Nana Patole : काँग्रेस प्रदेशाध्यक्ष नाना पटोले यांनी (Nana Patole) भरसभेत अकोल्याचे खासदार संजय धोत्रे यांच्याबद्दल अतिशय वादग्रस्त वक्तव्य केले. त्यांच्या या वक्तव्यावर भाजप नेते चांगलेच भडकले आहेत. आधी चंद्रशेखर बावनकुळे यांनी पटोलेंवर जोरदार प्रहार केला. त्यानंतर उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनीही (Devendra Fadnavis) पटोलेंना कडक शब्दांत फटकारले आहे. पटोलेंनी महाराष्ट्र आणि अकोल्याच्या जनतेची माफी मागावी असे फडणवीस यांनी ट्विटमध्ये म्हटले आहे.

काय म्हणाले फडणवीस?

एकीकडे काँग्रेस पक्ष दिल्लीत न्यायपत्र जाहीर करतो आणि दुसरीकडे त्यांचे राज्याचे प्रदेशाध्यक्ष नाना पटोले भर सभेत एका खासदाराच्या मृत्यूची कामना करतात? असंवेदनशीलतेचा हा कहर आहे. निवडणुकीत आपण विरोधक असलो तरी विरोधकांच्या मृत्यूची कामना, ही महाराष्ट्राची संस्कृती नाही. महाराष्ट्र आणि अकोल्यातील जनतेची माफी मागा! अशा शब्दांत देवेंद्र फडणवीस यांनी नाना पटोले यांच्यावर टीका केली.

तुमच्या घाणेरड्या राजकारणासाठी कुणाचं मरण चिंतू नका : बावनकुळे

याआधी भाजप प्रदेशाध्यक्ष चंद्रशेखर बावनकुळे यांनीही पटोलेंवर घणाघाती टीका केली होती. तुम्हाला ही जनता माफ करणार नाही. मते मिळविण्यासाठी तुम्ही भाजपविरोधात हवा तेवढा खोटा प्रचार करा मात्र तुमच्या घाणेरड्या राजकारणासाठी कुणाचे मरण चिंतू नका असे बावनकुळे म्हणाले होते.

नाना पटोलेंचं वक्तव्य काय होतं?

नाना पटोले नाना पटोले म्हणाले होते, मी 2014 ते 2017 दरम्यान खासदार होतो. यावेळी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी नोटबंदी आणि जीएसटीची घोषणा केली होती. मात्र तेव्हा त्यांच्या या निर्णयाला मी स्वतः विरोध केला होता. मी जेव्हा खासदार होतो तेव्हा अकोल्याचे खासदार (संजय धोत्रे) देखील होते. पण आता ते व्हेंटिलेटरवर असून, व्हेंटिलेटर केव्हा काढतील मला माहिती नाही. मात्र, निवडणुकीतच त्यांचा व्हेंटिलेटरवर काढतील.

follow us
  • fb
  • instagram
  • youtube