लोकसभेच्या निकालानंतर CM शिंदेंच्या खुर्चीला धोका? ‘फ्यूचर पॉलिटिक्स’मध्ये शक्यता किती..

लोकसभेच्या निकालानंतर CM शिंदेंच्या खुर्चीला धोका? ‘फ्यूचर पॉलिटिक्स’मध्ये शक्यता किती..

Eknath Shinde : यंदाची लोकसभा निवडणूक महाराष्ट्रासाठी अनेक अर्थांनी खास आहे. राज्यातील बड्या नेत्यांचं आगामी काळातील राजकारण सेट करणारी ही निवडणूक ठरेल असं म्हटलं तरी वावगं ठरणार नाही. ज्येष्ठ नेते शरद पवार, राज्याचे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे, उपमुख्यमंत्री अजित पवार, देवेंद्र फडणवीस, वंचित बहुजन आघाडीचे अॅड. प्रकाश आंबेडकर यांसारख्या दिग्गज नेत्यांची परीक्षा घेणारी ही निवडणूक असेल. तर दुसरीकडे निवडणुकीत महाविकास आघाडी यंदा महायुतीला जोरदार टक्कर देईल महायुतीच्या जागा कमी होतील असेही सांगितले जात आहे. विरोधकांनी तर निवडणुकीनंतर एकनाथ शिंदे यांचं मुख्यमंत्रिपद जाणार अशा वावड्याही उठवण्यास सुरुवात केली आहे.

शिंदेंचे शिलेदार  मात्र हा दावा अगदी ठासून फेटाळत आहेत. पण, खरंच लोकसभा निवडणुकीच्या निकालानंतर मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांची खुर्ची जाणार का? जरअसं काही घडलं तर का घडलं? नाही घडलं तर का नाही? यामागे काय शक्यता असू शकतात याच कळीच्या प्रश्नांची उत्तरे जाणून घेऊ या..

एकनाथ शिंदे यानी जेव्हा राज्याचा कारभार आपल्या हाती घेतला तेव्हापाासूनच त्यांच्या मुख्यमंत्रिपदाच्या खुर्चीवर टांगती तलवार कायम लटकत होती. त्यांचं मुख्यमंत्रिपद लवकरच जाणार अशी टीका विरोधी पक्षांकडून केली जात होती. त्यांच्या या टीकेवर गांभीर्याने विचार केला तर खरंच एकनाथ शिंदे यांचं मुख्यमंत्रिपद जाऊ शकतं का? तसं जर असेल तर यामागे काय शक्यता आहे याचा धांडोळा घेऊ या..

नाथाभाऊंच्या एन्ट्रीनं निवडणूक फिरली? महायुती मॅचविनर की ‘मविआ’ उधळणार गुलाल…

निवडणुकीतील परफॉर्मन्स ठरवणार गणित

लोकसभा निवडणुकीत जर शिंदे गटाला कमी जागा मिळाल्या तर शिंदेंची खुर्ची डळमळीत होऊ शकते. निवडणुकीच्या जागावाटपात भाजपने सुरुवातीपासूनच आक्रमक भूमिका घेतली होती. एक एक मतदारसंघासाठी भाजप नेते भांडत होते. त्यामुळे शिंदे गटाला दोन अंकी तरी जागा मिळतील की नाही असा प्रश्न उपस्थित केला जात होता. शिंदेंनी भाजपसमोर नमती भूमिका घेतली का अशीही चर्चा दबक्या आवाजात सुरू होती. परंतु, शिंदेंनी मुत्सद्देगिरी दाखवत थोड्याथोडक्या नाही तर तब्बल 15 जागा पदरात पाडून घेतल्या.

या पंधरा मतदारसंघांपैकी तेरा मतदारसंघात शिंदेंच्या शिलेदारांनी उद्धव ठाकरेंच्या सेनेला टक्कर दिली आहे. यातील जास्तीत जागा जिंकून खरी शिवसेना आपलीच आहे हे  शिंदेंना सिद्ध करावं लागणार आहे. कारण जर शिंदेंना कमी जागा मिळाल्या आणि उद्धव ठाकरेंनी त्यांच्यावर कडी केली तर मुख्यमंत्री शिंदेंचं आसन डळमळीत होऊ शकतं. आगामी विधानसभेचं गणित डोळ्यांसमोर ठेऊन भाजप त्यांना दूर ठेऊ शकतं अशी चर्चा आहे.

भाजपचं धक्कातंत्र प्रत्यक्षात आलं तर..

भाजपाच्या धक्कातंत्रात कधी कुणाचं राजकारण संपुष्टात येईल आणि कुणाला लॉटरी लागेल याची काहीच शाश्वती नसते. या धक्कातंत्राचा इतिहास पाहिला तर ज्यावेळेस भाजपाच्या विरोधात वातावरण असतं, मुख्यमंत्र्यांबाबत नाराजी वाढीस लागलेली असते त्यावेळी मुख्यमंत्री बदलला जातो. हरियाणात असा कारनामा भाजपने केला आहे. तोच पॅटर्न महाराष्ट्रात राबवायचं ठरलं तर येथील मुख्यमंत्रिपदाचं चित्र वेगळं असू शकेल. परंतु हे सगळं शिंदे गटाच्या निवडणुकीतील कामगिरीवर अवलंबून राहणार आहे.

लोकसभेचा ‘लातूर पॅटर्न’; देशमुखांच्या बालेकिल्ल्यात कुणाची हवा?, भाजप हॅट्रीक मारणार का?

यानंतरची आणखी महत्वाची गोष्ट म्हणजे निवडणुकीनंतर ठाकरे गट आणि भाजप पुन्हा एकत्रित आले तर राजकीय भूकंप घडू शकतो. पंतप्रधान नरेंद्र मोदींनी उद्धव ठाकरे माझे शत्रू नाहीत असे वक्तव्य करून याचे संकेत दिले आहेतच. जर निवडणुकीत भाजपला बहुमत मिळालं नाही आणि ठाकरे गटाने दोन आकडी खासदार निवडून आणले तर कदाचित ठाकरे गट महायुतीत येऊ शकतो अशी चर्चा आहे. परंतु, हे गणितही लोकसभा निवडणुकीच्या निकालावरच अवलंबून राहणार आहे.

..तर शिंदेंच सीएम पद राहिल सेफ

या शक्यता जरी गृहीत धरल्या तरी खरंच मुख्यमंत्री शिंदेंचं मुख्यमंत्रिपद जाईल का याची खात्री देता येणं अवघड आहे. कारण लोकसभेनंतर राज्यात विधानसभा निवडणुका होणार आहेत. उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनीही सांगितलं होतं की आगामी विधानसभा निवडणूक एकनाथ शिंदेंच्याच नेतृत्वात लढण्यात येईल. त्यांच्या या वक्तव्याकडं पाहिलं तर शिंदेंचं मुख्यमंत्रिपद पुढेही सेफ दिसतंय. त्यातही आणखी महत्वाचं म्हणजे विधानसभा निवडणुका जवळ आलेल्या असताना असा काही निर्णय घेऊन एका मित्राला दुखावण्याचा निर्णय भाजप घेईल अशी शक्यता दिसत नसल्याचे राजकीय जाणकार सांगतात.

follow us
  • fb
  • instagram
  • youtube

वेब स्टोरीज