बीड जिल्हा म्हणजे युद्धभूमी, कुणी येतो अन् जातीवर जातो, जयदत्त क्षीरसागरांनी व्यक्त केली खंत
बीड नगरपालिकेच्या निवडणुकीत योगेश क्षीरसागर यांनी भाजपचा झेंडा हाती घेतला आहे. त्यांच्या प्रचारात जयदत्त क्षीरसागर उतरले आहेत.
बीड जिल्ह्यात गेल्या काही काळापासून गुन्हेगारी सातत्याने चर्चेत आहे. (Beed) त्यावरुनच बीडची तुलना बिहारशी केली जाते. आता तशाच प्रकारची खंत माजी मंत्री जयदत्त क्षीरसागर यांनी व्यक्त केली. बीड जिल्हा म्हणजे युद्धभूमी झाली आहे, कुणालाही जाती धर्माच्या नावावर युद्ध खेळायचं असेल तर ते बीडमध्ये येतात असं जयदत्त क्षीरसागर म्हणाले आहेत.
त्याचबरोबर बीडची अवस्था बिहारपेक्षाही वाईट झाल्याचंही जयदत्त क्षीरसागर म्हणाले आहेत. बीड नगरपालिकेच्या निवडणुकीत योगेश क्षीरसागर यांनी भाजपचा झेंडा हाती घेतला आहे. त्यांना पाठिंबा देण्यासाठी माजी मंत्री जयदत्त क्षीरसागर यांनी प्रचारसभेत भाग घेतला. त्यावेळी त्यांनी बीडच्या सामाजिक परिस्थितीवर भाष्य केलं. सर्व जाती धर्मांना सोबत घेऊन जाणं गरजेचं आहे. जन्म घेतल्यानंतर समाजाचं काही देणं लागतो अशा व्यापक विचारातून काम करायलं हवं असं जयदत्त क्षीरसागर म्हणाले आहेत.
बीडमध्ये शरद पवारांच्या नेत्यावर जीवघेणा हल्ला; प्रकृती चिंताजनक अहिल्यानगरहून पुण्याला हलवलं
जयदत्त क्षीरसागर यांनी एक प्रसंग सांगितला. ते म्हणाले की, मूळचे बीडचे असलेले आणि पाटण्याला राहत असलेले एक दाम्पत्य गंगा स्नान करण्यासाठी प्रयागराजमध्ये गेले. ते बोलत असताना चुकून कुठेतरी त्यांच्याकडून बीडचा उल्लेख करण्यात आला. ते ऐकून दहा बारा लोक त्यांच्या भोवती जमा झाले. तुम्ही बीडमधून आला का? असं त्यांनी हिंदीतून विचारलं. त्यावर ते दाम्पत्य म्हणाले की, आमचे मूळ बीडचे आहे, पण राहतो पाटण्यामध्ये. त्यावर ते लोक भडकले. बीडचे लोक वाईट आहेत, यांना इथून हाकलून द्या असं त्या लोकांनी म्हटलं. नंतर त्या दाम्पत्याची अक्षरशः धिंड काढण्यात आली.
देशभरात आपली प्रतिमा एवढी वाईट झाली आहे. आता ही वाईट प्रतिमा धुऊन काढायची असेल तर त्याची सुरुवात स्थानिक स्वराज्य संस्थेच्या निवडणुकीपासून केली पाहिजे. दरम्यान, सोमवारी सिद्धिविनायक संकुल येथे अजित पवारांची सभा पार पडली. या सभेत क्षीरसागर कुटुंबाने 35 वर्षात काय केलं? असा सवाल अजित पवारांनी उपस्थित केला होता. यावरही जयदत्त क्षीरसागर यांनी उत्तर दिलं. मी अद्याप भाजपात प्रवेश केला नाही. मात्र मला मदत करायची आहे असं वक्तव्य जयदत्त क्षीरसागर यांनी केलं.
