सत्ताधारी आमदारांच्या निधीचा ‘सातबारा’ अधिवेशनात निघणार; राष्ट्रवादीने सांगितला ‘मास्टर प्लॅन’

सत्ताधारी आमदारांच्या निधीचा ‘सातबारा’ अधिवेशनात निघणार; राष्ट्रवादीने सांगितला ‘मास्टर प्लॅन’

मुंबई : सत्तेत असणाऱ्या नेत्यांनाही निधीचे समान वाटप होत नाही. शिंदे गटाकडे गेलेले पैसे बघा, राष्ट्रवादीकडून सत्तेत जाऊन बसलेल्या आमच्यापैकी काही सहकाऱ्यांना किती पैसे मिळाले ते बघा आणि सर्वात मोठा भारतीय जनता पक्ष (BJP) आहे, त्यांना मिळालेले पैसे बघा. याची तुलना केल्यावर लक्षात येईल की, सरकारमध्ये किती असमानतेचे धोरण आहे. बाकी विरोधी पक्षाचे तर लांबच राहिले. पण त्यांच्या त्यांच्यातच तफावत आहे. या सगळ्या गोष्टी महाराष्ट्राच्या विधीमंडळात निघणार आहेत, असा इशारा राष्ट्रवादी (शरद पवार) गटाचे प्रदेशाध्यक्ष जयंत पाटील (Jayant Patil) यांनी पत्रकार परिषदेत दिला. (NCP (Sharad Pawar) group will raise the issue of inequality in fund distribution in the winter session)

जयंत पाटील म्हणाले, असमान निधीचे वाटपाबाबतची वेगवेगळ्या भागताल्या विधानसभेच्या सदस्यांची तक्रार आहे. हाजिर तो वजीर अशी परिस्थिती या सरकारमध्ये आहे. जो मंत्रालयात जातो, जो ठाण मांडून बसतो, तो जास्त पैसे घेऊन जातो. त्यामुळे सत्तारुढ असणाऱ्या आमदारांपैकी कोणी 300 कोटी मिळवले, कोणी 100 कोटी मिळवले आणि कोणी 50 कोटी मिळवले. ही तफावत सत्तारुढ आमदारांमध्ये आहे. त्यामुळे सत्तेतल्या आमदारांमध्ये प्रचंड नाराजी आहे, असा दावा यावेळी पाटील यांनी केला.

‘अयोध्येत नवा प्लॅन ठरणार, दंगली घडणार’; प्रकाश आंबेडकरांचं भाकीत

जयंत पाटलांकडून शेतकरी आक्रोश मोर्चाची घोषणा :

दुष्काळ, नापिकी, अवकाळी पाऊस आणि शासनाच्या चुकीच्या धोरणांमुळे राज्यातील शेतकरी अडचणीत सापडला आहे. शेतकऱ्यांच्या याच विविध प्रश्नांविषयी राष्ट्रवादी काँग्रेस (शरद पवार) गट हिवाळी अधिवेशनापूर्वी शेतकरी आक्रोश मोर्चा काढणार आहे. 30 नोव्हेंबरला जळगावमध्ये, 1 डिसेंबरला दिंडोरीत आणि 5 डिसेंबरला अमरावतीमध्ये हा मोर्चा निघणार आहे. या मोर्चादरम्यान ट्रॅक्टर रॅलीचेही आयोजन करण्यात आले आहे.

Abdul Sattar : मंत्रिमंडळाच्या बैठकीतील ‘त्या’ निर्णयांबद्दल सत्तारांनी मानले मुख्यमंत्र्यांचे आभार

राज्यातील शेतकऱ्यांना विविध संकटांचा सामना करावा लागत आहे. आधी दुष्काळाने होरपळलेला शेतकरी आता अवकाळी पावसाने हैराण झाला आहे. या पावसामुळे आलेली पिकेही वाया गेली. काही पिकांवर रोगराई पसरली आहे. जी पिके शिल्लक आहेत त्यांना बाजारभाव व्यवस्थित मिळत नाही. एकूणच महाराष्ट्रातील वेगवेगळ्या भागातला शेतकरी हवालदिल झालेला आहे. त्यामुळे शेतकऱ्यांच्या या महत्त्वाच्या विषयावर सरकारचे लक्ष वेधण्यासाठी आमचा हा शेतकरी आक्रोश मोर्चा असणार आहे, असेही जयंत पाटील यांनी सांगितले.

Tags

follow us
  • fb
  • instagram
  • youtube