ज्यांच्याकड 40 वर्ष सत्ता होती त्यांनी कोपरगावचा पाण्याचाही प्रश्न सोडवला नाही, आमदार काळेंचा विरोधकांना टोला
ज्यांना सत्ता असतांना विकास करता आला नाही ते आता काय विकास करणार? त्यामुळे कोपरगावकरांसाठी हीच नामी संधी आहे.
कोपरगाव नगरपरिषद निवडणूक प्रचाराच्या माध्यमातून (Election) विरोधकांच्या तोंडून विकासाच्या गप्पा कोपरगावकरांना ऐकायला मिळाल्या आणि त्यांनी नेहमीप्रमाणे विकासाचे स्वप्न दाखवत आहे जे आजपर्यंत कधीच त्यांनी पूर्ण केलेले नाही आणि यावेळी सुद्धा करणार नाही. कारण ४० वर्ष कोपरगाव नगरपरिषदेची सत्ता त्यांच्या ताब्यात होती तरी त्यांना कोपरगाव शहराचा पिण्याच्या पाण्याचा प्रश्न सोडविता आला नाही व कोपरगाव शहराचा विकासही करता आला नाही. विकास करण्याच्या भूलथापा देवून त्यांनी नेहमीच कोपरगावकरांची दिशाभूल केली आहे आणि आताही करत आहेत. विरोधक आज विकासाबद्दल जे सांगतात ते त्यांना चाळीस वर्षात का करता आले नाही? असा प्रश्न कोपरगावकरांना पडला आहे.
त्यामुळे ज्यांना सत्ता असतांना विकास करता आला नाही ते आता काय विकास करणार? त्यामुळे कोपरगावकरांसाठी हीच नामी संधी आहे. मी दिलेला शब्द पूर्ण करतोच हे कोपरगावकरांनी पिण्याच्या पाण्याच्या प्रश्नावरून आणि २०१९ पासून कोपरगाव शहराच्या झालेल्या विकासावरून पाहिले आहे. त्यामुळे कोपरगावकरांच्या मनातील विकास सत्यात उतरविण्यासाठी कोपरगाव नगरपरिषदेच्या निवडणुकीत राष्ट्रवादी कॉंग्रेस पक्षाचे नगराध्यक्ष आणि नगरसेवक मोठ्या मताधिक्याने निवडून द्या असं आवाहन आशुतोष काळे यांनी केले आहे.
राष्ट्रवादी कॉंग्रेसचे नगराध्यक्ष आणि नगरसेवक पदाच्या उमेदवारांच्या प्रचारार्थ गुरुवार (१८) रोजी आयोजित करण्यात आलेल्या प्र.क्र.०७ व प्र.क्र.१५ मधील कॉर्नर सभेत नागरीकांशी आ.आशुतोष काळे यांनी संवाद साधला याप्रसंगी ते बोलत होते. ते पुढे म्हणाले की, विरोधकांकडे चाळीस वर्ष सत्ता असूनही त्यांनी कोपरगावकरांना मुलभूत सुविधांपासून वंचित ठेवले आहे.विरोधकांच्या नेहमीच्या भूलथापांना फसायचे की, विकासाला साथ द्यायची याचा विचार करा. मी दिलेला शब्द आणि दिलेली आश्वासने पूर्ण करून कोपरगावचा शाश्वत विकास झाला असून शहराचा विकास अधिक गतिमान आणि लोकाभिमुख होण्यासाठी विकासात आडवे येणाऱ्या विरोधकांना सत्तेपासून दूर ठेवा.
कोपरगाव शहरात मागील चाळीस वर्षापासून रखडलेली विकासाची कामे प्रगती पथावर आहे. पुढच्या तीन वर्षात शहराचे मुलभूत प्रश्न सोडवून शहराचा सर्वांगीण विकास करण्याचे माझे स्वप्न आहे. सहा वर्षांपासून कोपरगावचे अनेक दशकापासुंचे प्रलंबित प्रश्न सोडवत आहे. पुढच्या काळात कोपरगाव शहराला नव्या उंचीवर घेऊन जायचे आहे. शहराचा विकास साधण्यासाठी पालिकेची सत्ता असणे अत्यंत आवश्यक असून प्रत्येक प्रभागाचा सर्वांगीण विकास करण्यासाठी सक्षम आणि विकासाभिमुख प्रतिनिधी निवडणे गरजेचे आहे. राष्ट्रवादी काँग्रेसचे उमेदवार हे विकासाचे प्रतिनिधी असून, त्यांच्या माध्यमातून कोपरगावच्या प्रगतीचा वेग अधिक वाढणार आहे.त्यासाठी माझ्या विचाराचे प्रतिनिधी आणि काकांसारखा अनुभवी साथीदार नगरपालिकेत असणे आवश्यक आहे.
राष्ट्रवादी काँग्रेसचे नगराध्यक्षपदाचे उमेदवार काका कोयटे हे गेल्या अनेक वर्षांपासून सामाजिक क्षेत्रात कार्यरत असून समाजाच्या प्रत्येक घटकासाठी त्यांचे योगदान आहे. समता उद्योग मंदिराच्या माध्यमातून शेकडो महिलांना रोजगार उपलब्ध करून देत महिलांना स्वावलंबी बनवण्याचे महत्त्वपूर्ण काम ते करीत आहे. कोपरगावच्या सर्वांगीण विकासासाठी समाजाची जाण असलेला, सामाजिक भान ठेवणारा व्यक्ती काकासाहेब कोयटे यांच्या रूपाने नगराध्यक्ष म्हणून शहराला मिळाला, तर कोपरगावचा चेहरा-मोहरा निश्चितच बदलणार आहे.
कोपरगाव नगरपालिका निवडणुकीच्या माध्यमातून शहरात परिवर्तनाची लाट सुरू आली आहे वर्षानुवर्ष सत्ता असूनही विकास करू न शकणाऱ्या विरोधकांना सत्तेपासून दूर ठेवण्याची ही संधी न गमावता राष्ट्रवादी काँग्रेसचे नगराध्यक्ष व नगरसेवकांना बहुमताने विजयी करा असे आवाहन आ.आशुतोष काळे यांनी यावेळी केले. ज्या झाडाला चांगले आणि गोड फळे येतात त्याच झाडाला लोक दगड मारतात. त्यामुळे आपले नगराध्यक्षपदाचे उमेदवार हे नगराध्यक्षपदासाठी आणि कोपरगावच्या विकासासाठी अतिशय सक्षम उमेदवार आहेत. त्यामुळे विकास कामांना विरोध करणाऱ्या विरोधकांनी निवडणूक पण कोर्टात नेली तेथेही त्यांच्या पदरी निराशा पडली. विरोधकांनी काकांवर बिनबुडाचे आरोप आणि निराधार टीका करून पाहिली मात्र जनसामान्यांच्या सुख-दु:खात आणि अडीअडचणीत धावून जाणाऱ्या व्यक्तीबद्दल होणारी टीका कोपरगावकरांना अजिबात आवडली नाही.
पुढे बोलताना काळे म्हणाले, त्यामुळे त्यांनी काकांच्या समता पतसंस्थेचीही बदनामी करण्याचा प्रयत्न केला पण तिथेही विरोधकांच्या पदरी अपयशच आले. असे खालच्या पातळीचे राजकारण हि आपल्या कोपरगावची राजकीय संस्कृती कधीच नव्हती त्यामुळे कोपरगावकर विरोधकांवर अतिशय नाराज असून नगराध्यक्षपदी काकासाहेब कोयटे यांनाच निवडून देतील असा विश्वास आशुतोष काळे यांनी व्यक्त केला. तसंच, कोयटे म्हणाले, माझ्या विरोधात त्यांनी अनेक डाव टाकले परंतु त्यांचे सगळे डाव त्यांच्यावर उलटले आहे. समता पतसंस्थेची आणि वैयक्तिक माझी बदनामी करण्याचा प्रयत्न केला परंतु जनता माझ्यासोबत असल्याने हा डाव पण त्यांच्यावरच उलटला. कोपरगावच्या जनतेचा माझ्यावर विश्वास आणि प्रेम आहे. त्यामुळे माझा विजय निश्चित असून नगराध्यक्ष म्हणून लवकरच तुमच्या सेवेत हजर होणार आहे.
