मोठी बातमी : बारामती ॲग्रोवर 6 ऑक्टोबरपर्यंत कारवाई करू नका; HC चा रोहित पवारांना दिलासा
![मोठी बातमी : बारामती ॲग्रोवर 6 ऑक्टोबरपर्यंत कारवाई करू नका; HC चा रोहित पवारांना दिलासा मोठी बातमी : बारामती ॲग्रोवर 6 ऑक्टोबरपर्यंत कारवाई करू नका; HC चा रोहित पवारांना दिलासा](https://dvmep2zap7gv4.cloudfront.net/wp-content/uploads/2023/06/rohit-pawar-1.jpg)
Rohit Pawar : राष्ट्रवादी (शरद पवार) गटाचे आमदार रोहित पवार (Rohit Pawar) यांच्या बारामती ॲग्रो कंपनीला (Baramati Agro Company) महाराष्ट्र प्रदूषण नियंत्रण बोर्डाने (Maharashtra Pollution Control Board) नोटीस पाठवली होती. ही नोटीस मध्यरात्री दोनच्या सुमारास आल्याने मोठी खळबळ माजली होती. या नोटीसमध्ये 72 तासांत रोहित पवार यांना दोन प्लांट बंद करण्याचे निर्देश देण्यात आले होते. आता या प्रकरणात हायकोर्टाने (Mumbai High Court) रोहित पवार यांना मोठा दिलासा दिला आहे. 6 ऑक्टोबरपर्यंत कारवाई न करण्याचे निर्देश हायकोर्टाने महाराष्ट्र प्रदूषण नियंत्रण बोर्डाला दिले आहेत.
MPCB ने दिनांक 27/09/2023 रोजी रोहित पवारांच्या कंपनीला नोटीस बजावत 72 तासात संबंधित युनिट बंद करण्याचे आदेश दिले होते. त्यानंतर या नोटीसीला कंपनीने हायकोर्टात आव्हान दिले होते. त्यावर आज सुनावणी पार पडली. यात संपूर्ण घटनेची वस्तुस्थिती लक्षात घेत हायकोर्टाने याप्रकरणात 6 ऑक्टोबरपर्यंत कोणतीही कारवाई न करण्याचे निर्देश प्रदूषण नियंत्रण मंडळाला दिले आहेत. न्यायालयाच्या या आदेशामुळे संबंधित कंपनी आपले काम नियमित सुरू ठेऊ शकणार असून, आजच्या आदेशामुळे न्यायालयीन प्रक्रियेवरील विश्वास दृढ झाल्याचे मत रोहित पवार यांच्या कंपनीकडून व्यक्त करण्यात आले आहे.
बारामती इथला बारामती अग्रो प्लांट हा एक मोठा प्लांट आहे. रोहित पवार हे या कारखान्याचे मालक आहेत. शेतीशी निगडीत अनेक वस्तू येथे तयार होतात. मात्र, गेल्या काही दिवसांपासून हा कारखाना वादात सापडला आहे. महाराष्ट्र राज्य प्रदूषण नियंत्रण मंडळाने रोहित पवार यांना काल पहाटे 2 वाजता नोटिस पाठवून हा कारखाना बंद करण्याच्या सूचना केल्या होत्या. खुद्द रोहित पवार यांनी या संदर्भात ट्वीट करून माहिती दिली होती. त्यावेळी रोहित पवार यांनी हे घाणेरडे राजकारण असून या विरोधात लढत राहणार असल्याची भूमिका घेतली होती.
कावेरी पाणी प्रश्न पेटला: बंगळुरूमध्ये विमानसेवा विस्कळीत, 44 उड्डाणे रद्द
रोहित पवार ट्विटमध्ये काय म्हणाले होते?
रोहित पवार म्हणाले होते की, राज्यातील दोन बड्या नेत्यांच्या सांगण्यावरून कुठला तरी द्वेष मनात ठेऊन आज पहाटे दोन वाजता राज्य शासनाच्या एका विभागाच्या माध्यमातून माझ्या कंपनीच्या एका विभागावर कारवाई करण्यात आली.संघर्ष करतांना भूमिका घेतांना अनेक अडचणींचा सामना करावाचा लागतो. मी बोलतो, ठोस भूमिका घेतो म्हणून मला अडचणीत आणण्यासाठी आता प्रयत्न सुरू झाले, असा आरोप रोहित पवारांनी केला होता.
दरम्यान, आज मुंबई हायकोर्टाकडून रोहित पवारांना बारामती अॅंग्रोबाबत दिलासा मिळाला आहे. मुंबई हायकोर्टाने महाराष्ट्र प्रदूषण नियमंत्रण बोर्डाला कारवाई न करण्याचे आदेश दिले. तर बारामती अॅग्रोबाबत सहा ऑक्टोबरला पुढील सुनावणी होणार आहे. त्यामुळं तुर्तास ही कारवाई टळळी असली तरी सहा ऑक्टोबरच्या सुनावणीत काय होतं, हेच पाहणं महत्वाचं आहे.