बुलढाण्यातील अपघातावर PM मोदीही हळहळले; तर फडणवीस म्हणतात, हा अपघात…

बुलढाण्यातील अपघातावर PM मोदीही हळहळले; तर फडणवीस म्हणतात, हा अपघात…

Samruddhi Accident : समृद्धी महामार्गावर बुलढाणा (Buldhana) जिल्ह्यातील सिंदखेडराजाजवळ एका प्रवासी बसचा भीषण अपघात होऊन 26 जणांचा मृत्यू झाला आहे. आतापर्यंतचा समृद्धी महामार्गावरील हा सर्वात मोठा अपघात आहे. ही बस नागपूरवरुन (Nagpur) पुण्याकडे (Mumbai) निघाली होती. बसमध्ये एकूण 33 प्रवासी होते, त्यातील 8 प्रवासी बसमधून बाहेर पडण्यात यशस्वी झाले. हे 8 जण किरकोळ जखमी असून त्यांच्यावर सिंदखेडराजा येथे रुग्णालयात उपचार सुरु आहेत. या घटनेवर उपमुख्यमंत्री देवेंद्र फडमणवीस यांनी शोक व्यक्त केला आहे.

विदर्भ ट्रॅव्हल्सच्या पुणे येथे जाणाऱ्या एका खाजगी बसला बुलढाणा जिल्ह्यातील पिंपळखुटा येथे अपघात होऊन 25 जणांचा मृत्यू झाल्याची घटना अतिशय धक्कादायक आणि मनाला वेदना देणारी आहे. मी त्यांना भावपूर्ण श्रद्धांजली अर्पण करतो. या घटनेत 8 जण जखमी झाले असून त्यांना सिंदखेडराजा येथे रुग्णालयात दाखल करण्यात आले आहे. जखमींची प्रकृती धोक्याबाहेर आहे, असे त्यांनी ट्विट करत म्हटले आहे.

सदोष निर्मिती अन् मानवी त्रुटींमुळे अपघात; अजित पवारांची समृद्धीवर सडकून टीका

तसेच या अपघातातील मृतांच्या वारसांना 5 लाख रुपये आर्थिक मदत मुख्यमंत्री एकनाथराव शिंदे यांनी जाहीर केली आहे. जखमींच्या उपचाराचा खर्च राज्य सरकार करेल. जिल्हा तसेच पोलिस प्रशासनाशी आम्ही संपर्कात असून तातडीने सर्व प्रकारची मदत उपलब्ध करून दिली जात आहे. पोलिस अधीक्षकांनी दिलेल्या प्राथमिक माहितीनुसार, ही बस एका पुलावर आदळली आणि त्यानंतर डिझेल टाकी फुटल्याने वाहनाला आग लागली, असे फडणवीसांनी सांगितले.

या अपघातानंतर विरोधी पक्षनेते अजित पवार यांनी समृद्धी महामार्गाची सदोष निर्मिती आणि मानवी त्रुटींमुळेच हे अपघात घडत असल्याचे म्हटले आहे. त्यावर देखील फडणवीसांनी भाष्य केले आहे. ते म्हणाले की, “समृद्धी हायवेचे बांधकाम हे अत्यंत सुरक्षित आहे. समृद्धी हायवेच्या बांधकामामध्ये कोणताही दोष नाही. आत्तापर्यंत जे अपघात झाले आहे, त्यामध्ये मानवी त्रुटी अथवा गाड्यांच्या अडचणी समोर आल्या आहे. त्यामुळे हायवेच्या बांधकामावर टीका-टिप्पणी करणं योग्य नाही. आम्ही त्याठिकाणी स्मार्ट सिस्टीम लावणार आहोत. तिथे कॅमेरे लावून त्याच्या सहाय्याने मॉनिटरींग करणार आहोत.”

Accident : 26 जणांचा जीव घेणाऱ्या भागात सर्वाधिक अपघात; पिंपळखुटा हा अ‍ॅक्सिडेंट स्पॉट का बनलाय?

दरम्यान, या घटनेवर पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनीदेखील शोक व्यक्त केला आहे. महाराष्ट्रातील बुलढाणा येथे घडलेली गाडीची दुर्घटना अतिशय दु:खद आहे. ज्या व्यक्तींचा या अपघातात मृत्यु झाला त्यांच्या कुटुंबियांविषयी मी संवेदना व्यक्त करतो, असे मोदी म्हणाले. तसेच त्यांनी मृतांच्या नातेवाईकांनी 2 लाख रुपयांची मदत जारी केली असून जखमींना 50 हजार रुपयांची मदत जारी केली आहे.

Tags

follow us
  • fb
  • instagram
  • youtube