दुःखद बातमी : खान्देशातील काँग्रेसचा आवाज हरपला; ज्येष्ठ नेते रोहिदास पाटील यांचे निधन

दुःखद बातमी : खान्देशातील काँग्रेसचा आवाज हरपला; ज्येष्ठ नेते रोहिदास पाटील यांचे निधन

धुळे : माजी मंत्री, खान्देश नेते दाजीसाहेब तथा काँग्रेसचे ज्येष्ठ नेते रोहिदास पाटील यांचे आज (27 सप्टेंबर) निधन झाले. गेल्या अनेक दिवसांपासून ते फुफ्फुसाच्या आजाराने त्रस्त होते. धुळे ग्रामीणचे आमदार कुणाल पाटील यांचे ते वडील आहेत. रोहिदास पाटील यांच्यावर उद्या (28 सप्टेंबर) सकाळी 11 वाजता धुळे शहरातील एस.एस.व्ही.पी.एस महाविद्यालयाच्या मैदानात अंत्यसंस्कार करण्यात येणार आहेत. (Senior Congress leader Rohidas Patil passed away)

कोण होते रोहिदास पाटील?

रोहिदास पाटील यांना राजकीय वारसा घरातूनच लाभला. वडील चुडामण पाटील हे धुळे लोकसभा मतदारसंघाचे खासदार होते. 1962, 1967 आणि 1971 च्या लोकसभा निवडणुकीत चुडामण पाटील यांनी विजय मिळविला होता. हा वारसा रोहिदास पाटील यांनी पुढे चालवला. जवाहरच्या माध्यमातून त्यांनी काँग्रेसची जहागिरी कायम ठेवली. जुन्या कुसुंबा विधानसभा मतदारसंघातून ते 1985 हा एक अपवाद वगळता 1978 ते 2009 पर्यंत आमदार होते.

या दरम्यान, त्यांनी राज्याचे कृषीमंत्रीपदाची जबाबदारी अत्यंत उत्तमरित्या संभाळली होती. 2009 मध्ये मात्र पाटील पराभवाचा धक्का बसला होता. त्यानंतर 2014 मध्ये कुणाल पाटील यांनी मोदी लाटेतही तब्बल 46 हजार मतांनी विजय मिळवत वडिलांच्या पराभवाचा वचपा काढला. 2019 मध्येही कुणाल पाटील यांनी दुसऱ्यांदा विजय मिळविला. रोहिदास पाटील यांच्या पश्चात त्यांच्या पश्चात दोन मुले, मुलगी, सुना, नातवंडे असा परिवार आहे.

राहुल गांधी यांनीही घरी भेट दिली होती :

नुकत्याच झालेल्या भारत जोडो यात्रेदरम्यान, काँग्रेस नेते राहुल गांधी यांनीही धुळ्यात येताच रोहिदास पाटील यांची त्यांच्या घरी जाऊन भेट घेतली होती. “कैसे है आप दाजीसाहब” असे विचारत गळाभेट घेतली होती. त्यानंतर ज्येष्ठ नेत्या सोनिया गांधी यांच्याशी त्यांचे रोहिदास पाटील यांच्याशी बोलणे करून दिले होते. त्यामुळे सक्रिय राजकारणापासून दुर झाल्यानंतर काँग्रेसमध्ये रोहिदास पाटील यांना किती मान होता याचा अंदाज येऊ शकतो.

शरद पवार यांनीही व्यक्त केले दुःख :

काँग्रेस पक्षाचे ज्येष्ठ नेते माजी मंत्री रोहिदास पाटील यांचे फुफ्फुसाच्या दिर्घ आजाराने निधन झाले. धुळे जिल्ह्यात काँग्रेस पक्षाची ताकद वाढवण्यात त्यांचा मोठा वाटा आहे. खान्देश नेते दाजीसाहेब असे स्वत:चे वेगळे वलय निर्माण करणारे काँग्रेसचे धुळे जिल्ह्यातील नेतृत्व आज हरपले. त्यांच्या कुटुंबियांप्रति सहवेदना व्यक्त करतो. रोहिदास पाटील यांना भावपूर्ण श्रद्धांजली, असे म्हणत शरद पवार यांनी त्यांच्या भावना व्यक्त केल्या. 

Tags

follow us
  • fb
  • instagram
  • youtube