Arvind Sawant : मातोश्रीवरील ताब्याचं स्वप्न कधीच पूर्ण होणार नाही…

Sasdf

नागपूर : मातोश्रीवर ताबा मिळवणे हे दिवास्वप्न, ते कधीच पूर्ण होणार नसल्याचं उद्धव ठाकरे गटाचे खासदार अरविंद सावंत यांनी ठणकावून सांगितलं आहे. खासदार सावंत आज नागपूर दौऱ्यावर होते. यावेळी विमानतळावर त्यांनी माध्यमांशी संवाद साधत शिंदे-फडणवीस सरकारला कडक शब्दांत ठणकावलं आहे.

खासदार म्हणाले, निवडणूक आयोगाने केवळ संख्याबळाचा विचार करीत भाजपच्या संहितेनुसार निर्णय दिला. शिवसेना पक्ष आणि चिन्हाबाबत निकाल देताना निवडणूक आयोग घटनाबाह्य वागल्याचा गंभीर आरोपही त्यांनी यावेळी केला आहे.

शिवसेनेने १२४ जागा लढवल्या. त्यापैकी ५५ जागा निवडून आल्या. आताच्या बंडखोरांसह संपूर्ण १२४ जण शिवसेनेचा एबी फार्म आणि पक्षचिन्हावर लढले. मग पराभूत झालेल्यांची मते कोणाची होती, असा सवाल सावंत यांनी केला.

Maharashtra : ठाकरे गटाची चाल, मुख्यमंत्री शिंदेंविरोधात आणणार अविश्वास ठराव ?

तसेच सीबीआय, (CBI) ईडी, (ED) आयकर खाते या प्रमाणे निवडणूक आयोगही आता विकाऊ झालेला आहे, कोणालाच कशाची चाड राहिलेली नाही. निवृत्त न्यायाधीशांची नेमणूक लगेच राज्यसभा वा निवडणूक आयोगावर होते. हे कशाचे लक्षण आहे, असा सवालही त्यांनी केलाय.

दरम्यान, पक्षांतर विरोधी कायद्यामुळे पूर्वी एकट्याने होणारे पक्षांतर एकत्रितपणे होऊ लागले. म्हणून, २००३ मध्ये करण्यात आलेल्या घटनादुरुस्तीनुसार केवळ वैयक्तिकच नव्हे तर सामूहिक पक्षांतरालाही घटनाबाह्य घोषित केले गेले. हे लक्षात घेता शिंदेंनी पक्षद्रोह केला, असा आरोप ठाकरे गटाचे खासदार अरविंद सावंत यांनी येथे माध्यमांशी बोलताना केला.

शिंदेंनी स्वेच्छेने पक्ष सोडला. दुसरे म्हणजे कायद्यानुसार पक्ष सोडल्या नंतर सोडणाऱ्यांना स्वत:चा स्वतंत्र गट तयार करता येत नाही. त्यांना दुसऱ्या पक्षात विलिन व्हावे लागते. यांपैकी काहीही शिंदे गटाने केलेले नाही. शिवाय ते एकाच वेळी बाहेर पडले नाही. तर गटागटाने निघाले, याकडे सावंत यांनी लक्ष वेधलंय.

Tags

follow us