नवीन वर्षांनी पिचडांसाठी आणली सुवार्ता; ‘अमृत सागर दूध संघा’वर राखलं वर्चस्व
![नवीन वर्षांनी पिचडांसाठी आणली सुवार्ता; ‘अमृत सागर दूध संघा’वर राखलं वर्चस्व नवीन वर्षांनी पिचडांसाठी आणली सुवार्ता; ‘अमृत सागर दूध संघा’वर राखलं वर्चस्व](https://dvmep2zap7gv4.cloudfront.net/wp-content/uploads/2023/01/Untitled-design-34-1.png)
अहमदनगर : अकोले तालुक्यातील अमृत सागर दूध संघाची निवडणूक आज झाली. या निवडणुकीत महाविकास आघाडीच्या पॅनलला धूळ चारत माजी आमदार वैभव पिचड यांच्या पॅनलने विजय मिळविला. त्यांच्या पॅनलने 15 पैकी 13 जागांवर विजय मिळविला.
मागील वर्षी अगस्ती सहकारी साखर कारखाना व राजूर ग्रामपंचायत निवडणुकीत पिचड पिता-पुत्रांना चाळीस वर्षांची सत्ता गमवावी लागली होती. त्यामुळे अमृत सागर दूध संघाची निवडणूक जिंकून पिचड पिता पुत्रांचे राजकीय अस्तित्व संपविण्याचा घाट महाविकास आघाडीने घातला होता.
मात्र, या निवडणुकीत राजकीय कौशल्य वापरत पिचड यांनी सत्ता राखली. या निवडणुकीत पंधरा जागांसाठी 30 उमेदवार निवडणूक रिंगणात होते. तर मतदार अवघे 130 होते. सायंकाळी चार वाजेपर्यंत मतदान प्रक्रिया संपली त्यानंतर लगेच मतमोजणी झाली. या दूध संघावर पूर्वी वैभव पिचड हेच अध्यक्ष होते.
पिचडांच्या शेतकरी समृद्धी मंडळ पॅनलमधील विजयी उमेदवार – अनुसूचित जाती जमाती वैभव मधुकरराव पिचड, भटक्या विमुक्त जाती जमाती बाबुराव शंकर बेनके, इतर मागासवर्गीय आनंदराव रामभाऊ वाकचौरे, महिला राखीव अश्विनी प्रवीण धुमाळ, सुलोचना भाऊसाहेब औटी, सर्वसाधारण गट आप्पासाहेब दादापाटील आवारी, रामदास किसन आंबरे, अरुण दिनकर गायकर, बबन किसन चौधरी, सुभाष सूर्यभान डोंगरे, जगन वसंत देशमुख, गंगाधर गणपत नाईकवाडी, रावसाहेब रामराव वाकचौरे हे विजयी झाले. महाविकास आघाडीच्या विकास मंडळाकडून शरद कारभारी चौधरी व गोरक्ष गणपत मालुंजकर हे सर्वसाधारण गटातून विजयी झाले.