“आदित्य ठाकरेंना अटक करून चौकशी करा”, दिशा सालियान प्रकरणी नितेश राणेंची मागणी

“आदित्य ठाकरेंना अटक करून चौकशी करा”, दिशा सालियान प्रकरणी नितेश राणेंची मागणी

Mumbai News : दिशा सालियान मृत्यू प्रकरण पुन्हा (Disha Salian Case) एकदा राजकीय वर्तुळात तापले असून यावरून भाजप नेते आणि मंत्री नितेश राणे (Nitesh Rane) यांनी ठाकरे गटाचे आमदार आदित्य ठाकरे यांच्यावर थेट हल्ला चढवला आहे. दिशा सालियनच्या वडिलांनी मुंबई उच्च न्यायालयात दाखल (Mumbai News) केलेल्या याचिकेनंतर हे प्रकरण पुन्हा चर्चेत आले आहे. या याचिकेत दिशावर सामूहिक बलात्कार करून तिची हत्या झाल्याचा गंभीर आरोप करण्यात आला आहे. यात आदित्य ठाकरे यांच्यावर आरोप होत आहेत. या पार्श्वभूमीवर नितेश राणे यांनी आक्रमक भूमिका घेत आदित्य ठाकरेंना अटक करून चौकशीची मागणी केली आहे.

नितेश राणे यांनी या प्रकरणावरून ठाकरे गटाला कोंडीत पकडण्याचा प्रयत्न केला. ते म्हणाले, “ही फार सोपी आणि सरळ केस आहे. जर ही आत्महत्येचीच घटना होती तर मग ८ जून २०२० पासून आतापर्यंत इतकी पळापळ का सुरू आहे? लपवालपवी का चालली आहे? आदित्य ठाकरेंना यातून का वाचवावे लागते आहे? जर त्यांचा काहीच संबंध नसेल तर मग त्यांची एवढी धडपड का दिसते?”

त्यांनी पुढे सुप्रीम कोर्टाच्या एका निकालाचा हवाला देत म्हटले “सर्वोच्च न्यायालयाने स्पष्ट सांगितले आहे की बलात्काराचा आरोप असेल तर सर्वप्रथम त्या व्यक्तीविरोधात गुन्हा दाखल करून कारवाई करावी. त्याच नियमानुसार आदित्य ठाकरेंवर केस दाखल करून त्यांना अटक करावी आणि चौकशी करावी. ज्या न्यायाची अपेक्षा इतरांना असते तोच न्याय ठाकरेंनाही लागू करावा.”

याचिकेतील गंभीर आरोप

दिशा सालियनचे वडील सतीश सालियन यांनी मुंबई उच्च न्यायालयात दाखल केलेल्या याचिकेत आदित्य ठाकरे, किशोरी पेडणेकर यांच्यासह इतरांवर आरोप केले आहेत. याचिकेत असा दावा करण्यात आला आहे की दिशा सालियनच्या मृत्यूनंतर मालवणी पोलिसांनी चुकीचे अहवाल तयार करून पुरावे नष्ट करण्याचा प्रयत्न केला. ज्यामागे ठाकरे गटाचा दबाव होता. या याचिकेत केंद्रीय तपास यंत्रणेकडे (सीबीआय) स्वतंत्र तपासाची मागणीही करण्यात आली आहे. या आरोपांमुळे ठाकरे गटावर प्रचंड दबाव आला असून भाजपने हा मुद्दा पकडून राजकीय हल्ला तीव्र केला आहे.

दिशा सालियनच्या अंत्यविधीचे फोटो व्हायरल, शरिरावर कफन पण हत्या की, आत्महत्या?; चेहरा काय सांगतो?

नितेश राणेंचा ठाकरे गटावर पलटवार

शिवसेना (उबाठा) नेते संजय राऊत यांनी नुकत्याच झालेल्या पत्रकार परिषदेत या प्रकरणावरून भाजपवर टीका केली होती. त्यांच्या या टीकेला उत्तर देताना नितेश राणे म्हणाले, “संजय राऊत आणि ठाकरे गटाला सत्य समोर येण्याची भीती वाटते. त्यामुळे ते आक्षेप घेत आहेत. पण आता कायदा आपले काम करेल. ज्यांच्यावर आरोप आहेत त्यांच्यावर कारवाई झालीच पाहिजे. कोणालाही विशेष सवलत मिळता कामा नये.” राणे यांनी या प्रकरणाला निवडणूक काळातील राजकारणाशी जोडले जाण्याच्या शक्यतेलाही फेटाळून लावले आणि हे प्रकरण “निव्वळ सत्य आणि न्यायासाठी” असल्याचा दावा केला.

राजकीय घडामोडींना वेग

या प्रकरणामुळे महाराष्ट्राच्या राजकारणात नव्या वादाला तोंड फुटले आहे. एकीकडे महायुती सरकारमधील भाजप आणि शिंदे गट यांना ठाकरे गटाला कोंडीत पकडण्याची संधी मिळाली आहे, तर दुसरीकडे ठाकरे गटावर या आरोपांचे खंडन करण्याचे आणि आपली प्रतिमा सांभाळण्याचे आव्हान आहे. नितेश राणे यांनी यापूर्वीही दिशा सालियन प्रकरणात आदित्य ठाकरेंवर अनेकदा आरोप केले आहेत आणि आता या याचिकेमुळे त्यांचा हल्ला आणखी तीव्र झाला आहे. त्यांनी या प्रकरणात ठाकरे गटाच्या तत्कालीन सरकारवरही पुरावे दडपण्याचा आरोप केला आहे.

न्यायालयाचा निर्णय आणि पुढील दिशा

मुंबई उच्च न्यायालयात दिशा सालियन यांच्या वडिलांनी दाखल केलेली याचिका आजच सुनावणीसाठी येण्याची शक्यता आहे. या याचिकेतून ठाकरे गटाच्या नेत्यांवर गंभीर आरोप करण्यात आल्याने न्यायालय काय निर्णय घेते, याकडे सर्वांचे लक्ष लागले आहे. नितेश राणे यांनी या प्रकरणात तातडीने कारवाईची मागणी केली असून “आदित्य ठाकरेंना वाचवण्याचा प्रयत्न का होतो आहे, हे जनतेला कळले पाहिजे,” असे म्हटले आहे.

… तर न्यायालयात उत्तर देऊ, दिशा सालियन मृत्यू प्रकरणात आदित्य ठाकरे स्पष्टच बोलले

दिशा सालियन प्रकरणाने पुन्हा एकदा महाराष्ट्राच्या राजकारणात भूकंप आणला आहे. नितेश राणे यांच्या आक्रमक मागणीमुळे आणि याचिकेतील गंभीर आरोपांमुळे हे प्रकरण आता न्यायालयीन आणि राजकीय लढाईचे नवे केंद्र बनले आहे. ठाकरे गट या आरोपांचे खंडन कसे करणार आणि भाजप याचा राजकीय लाभ कसा उठवणार, हे पुढील काळात स्पष्ट होईल.

follow us
  • fb
  • instagram
  • youtube