world economic forum davos 2023 : दावोसावरून शिंदे-फडणवीस सरकार आत्मचिंतन करावे; अजित पवार यांचा टोला

  • Written By: Published:
world economic forum davos 2023 : दावोसावरून शिंदे-फडणवीस सरकार आत्मचिंतन करावे; अजित पवार यांचा टोला

मुंबई: कॉंग्रेसने नाशिक पदवीधर मतदारसंघातील दोन्ही उमेदवारांवर कारवाई केल्याने आघाडीचा उमेदवार कोण याबाबत चर्चा निर्माण झाली आहे. दरम्यान अपक्ष महिला उमेदवार शुभांगी पाटील यांनी उध्दव ठाकरे आणि माझ्याशी संपर्क साधला आहे. त्यामुळे यावर उद्या अंतिम निर्णय होणार अशी माहिती विरोधी पक्षनेते अजित पवार यांनी माध्यमांशी बोलताना यावेळी दिली आहे.

कॉंग्रेसचे डॉ. सुधीर तांबे यांनी अधिकृत उमेदवारी जाहीर झालेली असताना अर्ज दाखल न केल्याने नाशिकमध्ये पेच निर्माण झाला आहे. आघाडी म्हणून जागा वाटप करताना औरंगाबाद (विक्रम काळे) ही जागा राष्ट्रवादीकडे तर नाशिक कॉंग्रेसकडून डॉ. सुधीर तांबे यांना उमेदवारी देण्यात आली मात्र त्यांनी अर्ज भरला नाही. हा अर्ज न भरण्यामागे काय कारण आहे. हे फक्त डॉ. सुधीर तांबेच सांगू शकतील, असेही अजित पवार म्हणाले.

तीन टर्म आमदार असल्याने या जागा वाटपावर चर्चा झाली नाही. महाविकास आघाडीतील नेते एकमेकांशी चर्चा करत होते. आमचे प्रदेशाध्यक्ष जयंत पाटील यांच्याशीही चर्चा झाली होती. आताही ते सतत फोनव्दारे संपर्कात आहेत. मात्र नाशिक येथे काहीतरी गडबड आहे, याची कुणकुण लागली होती आणि याची कल्पना कॉंग्रेसच्या वरीष्ठांना दिली होती, असेही अजित पवार यांनी यावेळी सांगितले आहे.

या जागा वाटपावर भाजप बोलत आहे. भाजपला संधी मिळाली आहे, म्हणून बोलत आहेत मात्र त्यांच्या बोलण्याला काही अर्थ नाही. आम्ही बसून योग्य तो मार्ग काढला होता. मात्र अर्ज न भरल्याने प्रश्न निर्माण झाला आहे असेही अजित पवार यांनी स्पष्ट केले आहे.

हा कॉंग्रेसचा अंतर्गत प्रश्न आहे, त्यात महाविकास आघाडीला गोवण्यात काही अर्थ नाही. तिन्ही पक्षाच्या नेत्यांनी बसून निर्णय घेतला होता. त्याला मी साक्षीदार आहे, असे सांगतानाच महाविकास आघाडीत समन्वय नव्हता. हे मी मान्य करणार नाही, असे अजित पवार यांनी ठणकावून सांगितले आहे.

दावोसला गेले आहेत, तर जास्तीत जास्त निधी आणावा व आत्मचिंतन आणि आत्मपरीक्षण करावे. कारण काही लाख कोटी रुपये गुंतवणूक असणारे प्रकल्प बाहेर जाऊ देणे आणि काही लाख तरुणांना रोजगारापासून वंचित ठेवले, हे घडलेले हे त्रिवार सत्य असल्याचे अजित पवार यांनी स्पष्ट केले आहे.

४५ हजार कोटींचा करार होणे आणि प्रत्यक्षात गुंतवणूक होणे हे पहावे लागणार आहे. महाराष्ट्राच्या भल्यासाठी गुंतवणूक येणार असेल तर आम्हाला आनंद आहे आणि त्याचे स्वागतच करु असे यावेळी सांगितले आहे. हिंदी राष्ट्रभाषेविषयी देशपातळीवर चर्चा झाली होती. आपण बोलत असताना जागतिक भाषा म्हणून इंग्रजीचा तर राष्ट्रीय भाषा म्हणून हिंदी आणि मातृभाषा म्हणून मराठी भाषेचा उल्लेख करतो. पण मराठी – इंग्रजीबद्दल दूमत असण्याचे कारण नाही. या दोन्ही भाषा मोठ्या प्रमाणावर बोलल्या जातात.

मात्र राष्ट्रभाषेबद्दल तशाप्रकारे केंद्रसरकारने हिंदी राष्ट्रभाषा जाहीर केलेली नाही. केरळ, तामिळनाडू, कर्नाटक, आंध्रप्रदेश या राज्यांची याबाबत वेगळी भूमिका आहे. परंतु महाराष्ट्राचा नागरीक या नात्याने विचारले तर हिंदी राष्ट्रभाषा करायला हरकत नाही, तसा केंद्रसरकारने प्रयत्न करावा अशी मागणीही अजित पवार यांनी केली आहे.

Tags

follow us
  • fb
  • instagram
  • youtube