माझ्या हातून फक्त एक हत्या झाली; माजी भाजप खासदाराच्या कबुलीने नव्या वादाला तोंड फुटणार?
बृजभूषण यांनी आपल्या आयुष्यातील एका गंभीर घटनेचा उल्लेख करत माझ्या हातून आयुष्यात फक्त एक हत्या झाली आहे. असा दावा केला आहे.
BJP MP’s confession sparks fresh controversy : माजी भाजप खासदार बृजभूषण शरण सिंह यांनी नुकत्याच दिलेल्या एका विशेष मुलाखतीत केलेल्या वक्तव्यामुळे राजकीय वर्तुळात मोठी खळबळ उडाली आहे. विविध वादांमुळे यापूर्वी देखील चर्चेत राहिलेले बृजभूषण यांनी आपल्या आयुष्यातील एका गंभीर घटनेचा उल्लेख करत माझ्या हातून आयुष्यात फक्त एक हत्या झाली आहे. असा दावा केला आहे.
माझ्या हातून फक्त एक हत्या झाली
एका वृत्तवाहिनीला दिलेल्या मुलाखतीत त्यांचा विचारण्यात आले की, त्यांनी कधी गोळी झाडली आहे का? त्यावर उत्तर देताना त्यांनी सांगितले की, त्यांच्या आयुष्यात एकदाच असा प्रसंग आला. त्यांच्या म्हणण्यानुसार, त्यांच्या समोर त्यांच्या एका मित्रावर गोळीबार करण्यात आला. त्यानंतर संबंधित आरोपीने त्यांच्यावर देखील बंदूक रोखली.
या परिस्थितीत आत्मरक्षणासाठी आणि मित्राच्या हत्येनंतर प्रतिकार म्हणून त्यांनी गोळी झाडल्याचे सांगितले. या घटनेनंतर दोन्ही बाजूंनी गोळीबार झाला. म्हणजेच क्रॉस फायरिंग झाली आणि त्यात दोन्ही बाजूंचे लोक मृत्युमुखी पडल्याचा दावा त्यांनी केला. पोलिसांनी त्यावेळी गुन्हा दाखल केला होता. मात्र पुढे तो निकाली निघाल्याचंही त्यांनी यावेळी स्पष्ट केलं. या प्रकरणात त्यांना कोणतीही शिक्षा झाली नसल्याचं त्यांनी नमूद केलं.
या प्रकरणाच्या पश्चातापाबाबत विचारलं असता त्यांनी स्पष्ट शब्दांत सांगितलं की, माझ्या कुटुंबातील किंवा मित्राला कोणी मारले तर मी त्याला का मारणार नाही? या वक्तव्यामुळे त्यांच्या भूमिकेबाबत नव्याने चर्चा सुरू झाली आहे.
राज्यसभा निवडणुक – आघाडीत ‘सीट शेअरिंग’ची चुरस; ठाकरेंची थेट काँग्रेसच्या हायकमांडशी चर्चा
छेडछाडीच्या आरोपांवर भूमिका
बृजभूषण सिंह यांच्यावर महिला कुस्तीपटूंनी छेडछाडीचे गंभीर आरोप केले होते. या संदर्भात विचारले असता त्यांनी आरोप फेटाळून लावले. संबंधित घटनांच्या तारखांबाबत विसंगती असल्याचा दावा करत, काही वेळा आपण परदेशात किंवा माध्यमांसमोर उपस्थित होतो, असे त्यांनी सांगितले. साक्षीदार पुढे का येत नाहीत, आसा सवाल देखील यावेळी त्यांनी उपस्थित केला.
विनेश फोगाटवर टीका
कुस्तीपटू विनेश फोगट यांच्यावर देखील त्यांनी टीका केली. ट्रायलदरम्यान वजनगट बदलल्याचा आणि नियमांचे उल्लंघन केल्याचा आरोप त्यांनी केला. त्यांच्या मते, नियमभंग केल्यामुळे संबंधित कारवाईला सामोरे जावे लागले. बृजभूषण सिंह यांच्या या मुलाखतीनंतर राजकीय आणि कायदेशीर वर्तुळात विविध प्रतिक्रिया उमटण्याची शक्यता आहे. त्यांच्या वक्तव्यामुळे नव्याने वाद निर्माण होण्याची चिन्हे दिसत असून, विरोधकांची भूमिका काय असेल याकडे सर्वांचे लक्ष लागले आहे.
