हा विद्यार्थ्यांच्या भविष्यावर गंभीर अन्याय, नीट परीक्षा लीक प्रकरणावरून राहुल गांधींचा मोदी सरकारवर घणाघात
ही केवळ प्रशासकीय चूक नसून देशातील प्रामाणिक विद्यार्थ्यांच्या भविष्याशी केलेला गंभीर अन्याय आहे.
लोकसभेचे विरोधी पक्षनेते राहुल गांधी यांनी नीट (NEET) परीक्षा रद्द झाल्यानंतर केंद्र सरकार आणि भाजपवर घणाघाती शब्दांत थेट वार केले आहेत. पेपर लीक प्रकरणामुळं 22 लाखांहून अधिक विद्यार्थ्यांचं स्वप्न उद्ध्वस्त झाल्याचा आरोप करत त्यांनी या संपूर्ण प्रकाराला ‘तरुणांच्या भविष्यासोबतचा गुन्हा’ असं म्हटलं आहे.
देशभरातील लाखो विद्यार्थ्यांनी रात्रंदिवस अभ्यास करून, कुटुंबांनी कर्ज काढून आणि आई-वडिलांनी दागिने विकून मुलांच्या शिक्षणासाठी प्रयत्न केले. मात्र त्यांना बदल्यात मिळाले ते पेपर लीक, भ्रष्टाचार आणि प्रशासनिक गोंधळ. ही केवळ प्रशासकीय चूक नसून देशातील प्रामाणिक विद्यार्थ्यांच्या भविष्याशी केलेला गंभीर अन्याय आहे, असा आरोप राहुल गांधी यांनी केला आहे.
NEET Exam : हेच प्रश्न उद्या परिक्षेत येतील ते नाशिक कनेक्शन; नीट परिक्षेचा पेपर नेमका कसा फुटला?
प्रत्येक वेळी पेपर लीक प्रकरणात ‘पेपर माफिया’ सुटून जातात आणि त्याची शिक्षा मात्र मेहनती विद्यार्थ्यांना भोगावी लागते. अशा घटनांमुळे देशातील शिक्षण व्यवस्थेवरील विश्वास सतत ढासळत असल्याचे त्यांनी नमूद केलं. परीक्षा रद्द झाल्यामुळं आता विद्यार्थ्यांना परीक्षेची पुन्हा तयारी करावी लागणार, मानसिक तणाव सहन करावा लागणार आहे.
त्याचबरोबर त्यांच्यावरील आर्थिक भार वाढणार असून भविष्यासंदर्भात अनिश्चितता निर्माण होणार असल्याचं राहुल गांधी म्हणाले. जर शिक्षणात मेहनतीपेक्षा पैसा आणि प्रभाव अधिक महत्त्वाचा ठरत असेल, तर गुणवत्तेचे महत्त्वच संपुष्टात येईल, असं म्हणत राहुल गांधींनी अनेक प्रश्न उपस्थित केले.