ठाकरे गटाचे अंबादास दानवे महायुतीच्या पॅनेलमधून विजयी; छत्रपती संभाजीनगरच्या राजकारणाला नवी दिशा?
अंबादास दानवे यांनी महायुतीच्या पॅनेलमधून निवडणूक लढवणं आणि त्यानंतर विजय मिळवणं हा केवळ वैयक्तिक राजकीय यशाचा विषय नाही.
छत्रपती संभाजीनगर जिल्हा मध्यवर्ती सहकारी (Bank) बँकेच्या निवडणुकीकडे सगळ्यांचे लक्ष लागले होते. या निवडणुकीत महायुतीने दणदणीत विजय मिळवला आहे.20 पैकी 19 जागा महायुतीने जिंकल्या आहेत. महाविकास आघाडीला अवघी 1 जागा मिळाली आहे. यामध्ये विशेष आहे ते शिवसेना ठाकरे गटाचे विधान परिषद आमदार अंबादास दानवे हे महायुतीतून निवडणूक लढले आणि जिंकले आहेत. आत्या त्यांच्या या निर्णयाची जिल्ह्यातच नाही तर राज्यभरात मोठी चर्चा झाल्याचं पाहायला मिळालं.
राज्याच्या राजकारणात महाविकास आघाडी आणि महायुती हे कट्टर राजकीय प्रतिस्पर्धी असताना, जिल्हा बँकेच्या निवडणुकीत घडलेले हे चित्र स्थानिक राजकारणातील बदलत्या समीकरणांचे द्योतक मानले जात आहे. जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँका या केवळ आर्थिक संस्था नसून ग्रामीण भागातील राजकीय प्रभावाचे केंद्र मानल्या जातात. शेतकरी, सहकारी संस्था, पतसंस्था आणि ग्रामीण नेतृत्वाशी थेट संबंध असल्यामुळे या बँकांवरील नियंत्रणाला मोठे राजकीय महत्त्व असते. त्यामुळं या निवडणुकीतील प्रत्येक निकालाचा प्रभाव भविष्यातील स्थानिक राजकारणावरही पडत असतो.
आम्हाला भाजपमुक्त प्रभु श्रीराम पाहिजे; चोरांचा नायनाट करणार; उद्धव ठाकरे कडाडले
अंबादास दानवे यांनी महायुतीच्या पॅनेलमधून निवडणूक लढवणं आणि त्यानंतर विजय मिळवणं हा केवळ वैयक्तिक राजकीय यशाचा विषय नाही. या निकालातून स्थानिक पातळीवर पक्षीय विचारांपेक्षा सहकार क्षेत्रातील संबंध, परस्पर समन्वय आणि व्यवहार्य राजकारण अधिक प्रभावी ठरत असल्याचं स्पष्ट झालं आहे. राज्यातील आघाड्यांचे गणित आणि जिल्ह्यातील सहकार क्षेत्रातील राजकारण हे अनेकदा स्वतंत्रपणे चालत असल्याचं या निवडणुकीने पुन्हा अधोरेखित केलं आहे. परंतु, दुसरी बाजू पाहता शिवसेना ठाकरे पक्षामध्ये सध्या जे काही सुरू आहे ते पाहता दानवे यांच्या या निर्णयाने अनेकांच्या भुवया उंचावल्या होत्या. कारण रोज खासदार आमदार फुटला अशी बातमी ज्या पक्षातून येते त्याच पक्षातून नुकतेच आमदार झालेले एकमेव दानवे हेही महायुतीत गेली की काय अशी चर्चा सुरू झाली.
या निकालानंतर महाविकास आघाडीतील स्थानिक नेत्यांमध्ये समन्वय, तसंच महायुतीतील नेतृत्वाच्या भूमिकेबाबत विविध राजकीय चर्चा सुरू झाल्या आहेत. विरोधी पक्षातील एका वरिष्ठ नेत्याला महायुतीच्या पॅनेलकडून पाठिंबा मिळणे हा स्थानिक राजकारणातील व्यवहारिकतेचा भाग मानला जात असला, तरी त्याचे दूरगामी राजकीय अर्थही काढले जात आहेत. सहा खासदार फुटले, विधान परिषदेचे आमदार सचिन अहिर फुटले आता त्यांच्यानंतर दानवेही हळुहळु महायुतीकडं चालले की काय या चर्चेने जोर पकडला आहे. तसंच, आगामी जिल्हा परिषद, पंचायत समिती, नगरपालिका आणि महानगरपालिका निवडणुकांच्या पार्श्वभूमीवर या घडामोडीकडे विशेष लक्ष दिले जात आहे.
राजकीय विश्लेषकांच्या मते, सहकारी संस्थांच्या निवडणुकांमध्ये पक्षीय भूमिका अनेकदा दुय्यम ठरते आणि स्थानिक नेतृत्व, वैयक्तिक विश्वासार्हता, मतदारांशी असलेला संपर्क आणि सामाजिक समीकरणे निर्णायक ठरतात. अंबादास दानवे यांच्या विजयाने ही बाब पुन्हा एकदा अधोरेखित झाली आहे. मात्र या निकालाचा अर्थ राज्य पातळीवर महाविकास आघाडी किंवा महायुतीच्या राजकीय आघाड्यांमध्ये बदल झाला, असा होत नाही. हा निर्णय प्रामुख्याने स्थानिक सहकार राजकारणाच्या संदर्भात पाहिला जात आहे असंही बोललं जात आहे.
त्याचबरोबर जिल्हा बँकेच्या निवडणुकीत सर्वाधिक प्रतिष्ठेच्या आणि चर्चेच्या ठरलेल्या बिगर शेती मतदारसंघात काँग्रेसचे खासदार कल्याण काळे यांनी प्रतिस्पर्ध्यांना धूळ चारली. या चुरशीच्या लढतीत कल्याण काळे यांना तब्बल ४८ मते मिळाली, तर त्यांचे प्रतिस्पर्धी उमेदवार अभिजीत देशमुख यांना केवळ २६ मतांवर समाधान मानावे लागले. या मोठ्या विजयामुळे काँग्रेस आणि महाविकास आघाडीच्या गोटात प्रचंड जल्लोष सुरू आहे.
संजना जाधव यांनी तब्बल ९८ मते घेत विजय मिळवला, विशेष म्हणजे त्यांच्या विरोधात उभ्या असलेल्या इतर चारही उमेदवारांना ‘शून्य’ मते मिळाली! असाच काहीसा चमत्कार शिवसेनेच्या प्रभाकर काळे यांच्या बाबतीतही घडला. त्यांना ३६ पैकी ३६ मते मिळवत शंभर टक्के ‘क्लीन स्वीप’ दिला.
तसंच, इतर मतदारसंघातून मंत्री अतुल सावे (२६१ मते), रामराव शेळके (२३७ मते), अर्जुन नितीन पाटील (२२४ मते), अंबादास दानवे (२१० मते) आणि रवींद्र काळे (१८९ मते) घेत विजयी झाले आहेत. तर भाजपचे शेषराव जाधव ४९ मते घेत विजयी झाले. ओबीसी मतदारसंघातून सुवर्णा संजय जाधव यांनी ७० मते मिळवत विजयाला गवसणी घातली