ब्रेकिंग : रखरखत्या उन्हात बाज टाकून करणार उपोषण, जरांगेंची आंदोलनाबाबत मोठी घोषणा
सरकारवर टीका करताना जरांगे पाटील म्हणाले की, सरकारला जर मराठा समाजाची खरंच काळजी असती तर आतापर्यंत आरक्षण दिलं असतं.
Jarange’s big announcement regarding the movement : मराठा आरक्षणाच्या मागणीसाठी आंदोलन छेडणारे मराठा आंदोलक नेते मनोज जरांगे यांनी पुन्हा एकदा राज्य सरकारविरोधात आक्रमक भूमिका घेत मोठी घोषणा केली आहे. येत्या 30 मे पासून आपण कडक आमरण उपोषणाला बसणार असल्याचा इशारा जरांगेंनी दिला असून, हे उपोषण रखरखत्या उन्हात कोणत्याही सुविधांशिवाय करण्यात येणार असल्याचे त्यांनी स्पष्ट केले आहे. त्यामुळे राज्यातील राजकीय आणि सामाजिक वातावरण पुन्हा तापण्याची चिन्हे दिसत आहेत.
राज्य सरकारला आपण तब्बल दहा महिने वेळ दिला. प्रेमाने बैठक घेतल्या, मोर्चे काढले, आंदोलनं केली, पण मराठा समाजाला अद्याप आरक्षण मिळालं नाही. त्यामुळे आता माझ्याकडे आमरण उपोषणाशिवाय पर्याय उरलेला नाही, असं सांगत जरांगेंनी सरकारवर तीव्र नाराजी व्यक्त केली. उपोषणादरम्यान कोणताही मंडप किंवा विशेष सुविधा नसेल, असं देखील त्यांनी स्पष्ट केलं. मी रखरखत्या उन्हात बाज टाकून उपोषण करणार आहे. माझया जीवाची लाहीलाही झाली तरी चालेल. उष्माघाताने माझा जीव गेला तर त्याला राज्य सरकार जबाबदार असेल, असा गंभीर इशारा त्यांनी दिला.
यावेळी जरांगेंनी सरकारवर अत्यंत कठोर शब्दांत टीका केली. इतकं क्रूर सरकार महाराष्ट्राने कधी पाहिलं नसेल. तुम्हीच आमच्यावर हल्ले करायचे आणि तुम्हीच गुन्हे दाखल करायचे, ही दुटप्पी भूमिका कशासाठी? मराठवाड्यात आम्हाला पाणी नाही, आरक्षण नाही, मग आम्ही काय चूक केली? असा सवाल त्यांनी उपस्थित केला.
मराठा आरक्षनाच्य प्रश्नावर सरकार गंभीर नसल्याचा आरोप करत त्यांनी 58 लाख कुणबी प्रमाणपत्रांची मुद्दा देखील उपस्थित केला. 58 लाख कुणबी प्रमाणपत्रं कधी देणारं? सरकारला फक्त मराठा समाजाची मतं हवी आहेत का? असा थेट प्रश्न त्यांनी विचारला. आता एकतर माझा किंवा सरकारचा तुकडा पडेल. एवढं कठोर आमरण उपोषण देशात कुठेच झालं नसेल, असा निर्वाणीचा इशारा देत त्यांनी आंदोलन अधिक तीव्र करण्याचे संकेत दिले आहेत.
सीएनजी वाहनधारकांनाही महागाईचा झटका! पुणे-नाशिकमध्ये दरवाढ, पेट्रोल-डिझेलनंतर आता गॅसही महाग
दरम्यान, भाजप नेते प्रसाद लाड यांच्याबाबत बोलताना जरांगेंनी संयमी भूमिका घेतली. प्रसाद लाड यांना मला दोष द्यायचा नाही. मात्र भाजपमधील मराठा आमदार आणि मंत्र्यांनी समजून घेतलं पाहिजे की तुमची मुलंसुद्धा मोठी होणार आहेत, असा अप्रत्यक्ष इशारा त्यांनी दिला.