अजितदादांचा शिलेदार धनंजय मुंडे मौनात ! पण सध्या आहेत कुठे ?

Dhananjay Munde is active in Beed district again : मस्साजोगचे सरपंच संतोष देशमुख (Santosh Deshmukh) हत्याप्रकरणात राष्ट्रवादीचे नेते (NCP) धनंजय मुंडे (Dhananjay Munde) यांचे निकटवर्तीय वाल्मिक कराडचा सहभाग आढळला. कराडला अटक होताच, धनंजय मुंडेंच्या अडचणी वाढल्या. विरोधकांनी मुंडेंना घेरले होते. आमदार सुरेश धसांनी तर वाल्मिक कराड हा आका आहे. आकाचाही आकाही आहे असे म्हणत धनंजय मुंडेकडे बोट दाखवलं. त्यात संतोष देशमुख यांच्या निर्घृण हत्येच्या वेळेचे फोटोसमोर आले. ते फोटो बघून संपूर्ण महाराष्ट्र हळहळला. त्याचबरोबर धनंजय मुंडे यांना अन्न व नागरी पुरवठा मंत्रिपदावरून पायउतार व्हावे लागले. त्याआधी काही दिवस धनंजय मुंडे यांनी आपली बाजू सावरत विरोधकांना जशास तसे उत्तरही दिले होते. परंतु सध्या धनंजय मुंडे शांत आहेत त्यांनी मौन धारण केलंय ? पण सध्या ते बीडमध्ये काय करत आहेच हे या व्हिडिओतून पाहुया…
धनंजय मुंडेंच्या मौनाचा अर्थ काय ?
धनंजय मुंडे हे तसे आक्रमक नेते आहेत. ते विरोधकांना आपल्या फर्ड्या शैलीत जशास तसे उत्तर देतात. संतोष देशमुख हत्याप्रकरणावरून घेरल्यानंतर त्यांनी विरोधकांना उत्तर दिलेत. विरोधकांकडून रचलेल्या चक्रव्यूहात फसणारा अभिमन्यू आपण नाही तर चक्रव्यूह भेदून बाहेर पडणाऱ्यांपैकी एक आहोत, असे मुंडे म्हणाले होते. मंत्रिपद गेल्यानंतर त्यांना बेल्स पाल्सी आजार उद्भवला. त्यातून त्यांच्या डोळ्यांवर शस्त्रक्रियाही पार पडलीय. तेव्हा त्यांना बोलताना त्रास होत होता. आता त्यातून ते बरे झालेत. परंतु हेच मुंडे आता मौनात गेले आहेत. पक्षाचा कार्यक्रम असो किंवा मतदारसंघातील कार्यक्रम धनंजय मुंडे हे फारसे बोलत नाहीत. त्यांचे आताचेच उदाहरण घेऊया. नुकताच राष्ट्रवादीचा पुण्यात वर्धापनदिन झाला. पक्षातील अनेक नेत्यांनी व्यासपीठांवरून भाषणं झाडली. पण धनंजय मुंडे यांनी व्यासपीठावर असून, मात्र भाषण टाळले. त्यापूर्वी भाजप नेते गोपीनाथ मुंडे यांच्या अकराव्या स्मृतिदिनानिमित्त गोपीनाथ गडावर आयोजित कार्यक्रमातही त्यांनी भाषण टाळले. त्यामुळे त्यांचे मौन हा चर्चेचा विषय झालाय. तर मुंडे यांचे मौन म्हणजे ते पक्षशिस्तीचा नेते आहेत, असा अर्थ पदाधिकारी व कार्यकर्ते लावत आहे. (Dhananjay Munde is active in Beed district again)
विपश्यनेसाठी गेले अन् सक्रीय झाले
मंत्रिपद गेल्यानंतर धनंजय मुंडे काही दिवस हे मतदारसंघापासून दूर होते. परंतु ते पंधरा दिवसांपासून पुन्हा जनतेत सक्रीय झालेत. मुंडे हे इगतपुरी येथे विपश्यनेसाठी गेले होते. तब्बल दहा दिवस ते तेथे होते. तर तीन जूनला ते बीडला परतले. माजलगावचे दिवंगत माजी आमदार आर. टी. देशमुख यांच्या कुटुंबाची घेऊन त्यांचे सांत्वन केले होते
मतदारसंघात, बीड जिल्ह्यात पुन्हा सक्रीय
विपश्यनेनंतर मुंडे हे बीड जिल्ह्यात पुन्हा सक्रीय झालेत. ते लोकांच्या भेटीगाठी घेत आहेत. आपले कार्यकर्ते-पदाधिकारी यांच्या घरी जात आहेत. त्यांच्या सुख-दुखा:मध्ये सहभागी होत आहे. हरिनाम सप्ताहाच्या सांगता सोहळ्याला ते उपस्थित होते. तर नव्याने आलेले जिल्हाधिकारी विवेक जॉन्सन यांची भेट घेऊन परळी मतदारसंघातील कामांसाठी संदर्भात त्यांनी चर्चा केली. तर बीड शहरातील राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाच्या कार्यालयामध्ये जनता संवाद घेतलाय. संतोष देशमुख प्रकरणामुळे मुंडे हे बॅकफूटला गेले आहेत. तसेच त्यांची प्रतिमाही मलिन झालेली आहे. हे डॅमेज कंट्रोल करण्यासाठी मुंडे हे पुन्हा जनतेत मिसळत आहेत. त्याला आगामी स्थानिक स्वराज्य संस्थांचे निवडणुकीचे कारण आहे. जिल्हा परिषद, पंचायत समित्या, नगरपालिकांमध्ये त्यांनी ताकद दाखविल्यास पुन्हा त्यांचे पक्षात वजन वाढणार आहे. त्याची तयारी मुंडेकडून सुरू असल्याचे राजकीय विश्लेषक सांगतायत.