Supriya Sule : शेतकऱ्यांना जात विचारण्यामागे केंद्र सरकारचं कटकारस्थान; सुप्रिया सुळेंचा घणाघात

Supriya Sule :  शेतकऱ्यांना जात विचारण्यामागे केंद्र सरकारचं कटकारस्थान; सुप्रिया सुळेंचा घणाघात

Supriya Sule Attack On Central Goverment : सांगलीत शेतकऱ्यांना खत खरेदी करण्यासाठी शेतकऱ्यांना जात विचारण्यात आल्याचा संतापजनक प्रकार समोर आला. यावरून विधानसभेत विरोधकांनी शिंदे-फडणवीस सरकारला चांगलेच धारेवर धरले आहे. यावरुन आता राष्ट्रवादीच्या ( NCP ) खासदार सुप्रिया सुळे ( Supriya Sule ) यांनी देखील यावरून भाजपला चांगलेच सुनावले आहे.

सुप्रिया सुळे म्हणाल्या, या देशात कोणत्याही सरकारने आजपर्यंत शेतकऱ्याला जात विचारली नाही. पण याचा प्रसार आणि प्रचार हे केंद्र सरकार करत आहे. त्याचा मी जाहीर निषेध करते. केंद्र सरकारने हा निर्णय तातडीने मागे घ्यावा. यामागे केंद्र सरकारचे काहीतरी कटकारस्थान आहे, अशी घणाघाती टीका सुळे यांनी केला. त्यांनी आज पुणे महानगर पालिकेत शहरातील समस्याबाबत महापालिका आयुक्त विक्रम कुमार यांच्या सोबत झालेल्या बैठकीनंतर माध्यमांशी त्यांनी संवाद साधला.

दुसरीकडे अवकाळी पावसाने राज्यातील शेतकऱ्यांचा तोंडचा घास हिरवला आहे. मात्र, याचे पंचनामे होण्यासाठी उशीर होत असल्याने शेतकऱ्यांनी संताप व्यक्त केला आहे. अशातच अचानक राज्यभरातील 36 तहसीलदारांच्या बदल्या करण्यात आल्या आहेत. त्यामुळे नुकसानग्रस्त शेतीचे पंचनामे होण्यास आणखी विलंब होण्याची शक्यता असल्याचे सांगत सुळे यांनी राज्य सरकारला फटकारले.

सुळे पुढे म्हणाल्या, सरकारचे सगळे प्रतिनिधी होळी खेळण्यात व्यस्त होते. होळी खेळण्याचे सोडून हे फिल्डवर गेले असते तर आज पंचनामे रखडले नसते. या सरकारला याचे अजिबात गांभीर्य आणि शेतकाऱ्यांबद्दल दया नाही. सरकारचे सगळे मोठे नेते होळी खेळण्यात व्यस्त होते. यावरून हे सरकार शेतकऱ्यांच्या बाबतीत किती असंवेदनशील आहे हे स्पष्ट दिसत आहे, असाही टोला सुळे यांनी लगावला.

‘हिंमत असेल तर भाजपने नागालँड सरकारचा पाठिंबा काढावाच’; अंधारेंनी दिले हिंदुत्व सिद्ध करण्याचे चॅलेंज

दरम्यान, नागालँडमध्ये राष्ट्रवादी काँग्रेसच्या सात आमदारांनी भाजप सरकारला पाठिंबा देत सरकारमध्ये सहभागी होण्याचा निर्णय घेतला आहे. यावर देखील सुळेंनी स्पष्टीकरण दिलं. ‘नागालँडमध्ये आम्ही भाजपला पाठिंबा दिला नाही तर तिथल्या मुख्यमंत्र्यांना दिला आहे. अशा पद्धतीच्या सरकारची ही नागालँडमध्ये दुसरी वेळ आहे. शेवटी मुख्यमंत्री हा मुख्यमंत्री असतो. तुम्ही देवेंद्र फडणवीस यांना विचारू शकता तुमच्या सरकारमध्ये 105 आमदारांचे चालते की एकनाथ शिंदे यांचे?, शेवटी मुख्यमंत्र्यांची सही ही अंतिम असते.’ असा सवाल करत त्यांनी फडणवीसांना टोला लगावला.

सामान्य जनतेला बजेटमधून काय मिळालं? ऐका…

पुण्याचे पालकमंत्री बैठक घेत नाहीत

अजितदादा जेव्हा पालकमंत्री होते तेव्हा त्या अडीच वर्षात अजितदादांनी एक पद्धत पाडून ठेवली होती. दर शुक्रवारी पालकमंत्री सकाळपासून शेवटचा प्रश्न सुटेपर्यंत बैठक घेत होते. आता ती पद्धतच बंद पडली आहे. त्यामुळे आम्हालाच दर महिन्याला अशा बैठका घ्याव्या लागतात. एकतर शहरात नगरसेवक नाहीत, जिल्हापरिषद सदस्य नाहीत पालकमंत्री देखील बैठक घेत नाहीत. त्यामुळे आम्हा खासदारांना महापालिकेत येऊन कामाचा पाठपुरावा करावा लागत आहे. शहरात कचऱ्याचा, वाहतूककोंडी, पाणी असे अनेक प्रश्न आहेत. तत्कालीन पालकमंत्री अजित पवारांनी मंजूर केलेल्या कामांना स्थगिती देण्यात आली आहे. त्यामुळे पुणेकरांना प्रचंड अडचणींचा सामना करावा लागत आहे. त्यामुळे आता आमचे प्रश्न सुटले नाही तर आंदोलनाशिवाय दुसरा मार्ग आमच्याकडे राहणार नाही, असेही त्या म्हणाल्या.

Tags

follow us
  • fb
  • instagram
  • twitter
  • youtube