Balasaheb Thorat एकहाती मैदानात उतरून लढण्याच्या मनःस्थितीत, सामनाच्या अग्रलेखातून काँग्रेसवर टीका

Balasaheb Thorat एकहाती मैदानात उतरून लढण्याच्या मनःस्थितीत, सामनाच्या अग्रलेखातून काँग्रेसवर टीका

मुंबई : मागील काही दिवसात राज्यात काँग्रेसमधला वाद चव्हाट्यावर आल्याचं बघायला मिळत आहे. बाळासाहेब थोरात (Balasaheb Thorat) यांनी नाना पटोलेंबरोबर (Nana Patole) काम करणं कठीण झालंय, असं म्हणत विधिमंडळ पक्षनेतेपदाचा राजीनामा दिला. या पार्श्वभूमीवर काँग्रेसमध्ये (Congress) सर्वकाही बिघाड होत असल्याचं दिसून येत आहे. यामध्ये सत्यजीत तांबेंच्या बंडखोरीमुळे काँग्रेसची चिंता वाढण्याची लक्षणं दिसत असतानात बाळासाहेब थोरातांनी राजीनामा देत बंडाचा झेंडा उगारला. यामुळे पक्षाची पंचाईत झाल्याचे दिसून येत आहे. या सर्व पार्श्वभूमीवर आता महाविकास आघाडीतील (Mahavikas Aghadi) ठाकरे गटाने काँग्रेसवर जोरदार हल्लाबोल केला. थोरातांच्या आरोपांत तथ्य असल्याचा मुद्दा उपस्थित करत शिवसेनेने काँग्रेसला सावरून घेण्याचा सल्ला सामनाच्या अग्रलेखातून केला.

सामनातील अग्रलेखातून शिवसेनेनं राज्यातील काँग्रेसमधील अंतर्गत हालचालीवर नाराजी व्यक्त केली. बाळासाहेब थोरातांच्या संयमाचा बांध फुटल्याने हे सर्व काही घडले का ? याचा विचार आता त्यांच्या हायकमांडने करायला हवा. बाळासाहेब थोरात हे गेल्या काही दिवसांपासून आजारी आहेत. त्यांचा खांदा एका अपघातामुळे निखळला आहे व हात गळ्यात बांधला आहे. तरी ते एकहाती मैदानात उतरून लढण्याच्या मनःस्थितीत आहेत. याचा अर्थ ते खूप दुखावले आहेत व आरपारच्या लढाईस सिद्ध आहेत, असं अग्रलेखात त्यांनी यावेळी सांगितलं आहे.

सत्यजीत तांबे हे काँग्रेसचे युवा नेते व बाळासाहेब थोरातांचे भाचे आहेत. तांबे- थोरात कुटुंबाचे संगमनेरमध्ये वर्चस्व आहे. तांबे प्रकरणात आपल्याला विश्वासात घेतले नाही व ज्येष्ठता असून देखील अपमानित केले, असा संताप बाळासाहेब थोरातांचा आहे,. त्यात तथ्य असू शकते. बाळासाहेब थोरात यांच्यासारख्या नेत्यांचा सन्मान नाही राखायचा, तर कोणाचा राखायचा ? असा सवाल सामनाच्या अग्रलेखात उपस्थित करण्यात आला.

बाळासाहेब थोरांताच्या धमन्यांत काँग्रेस विचारांचे रक्त आहे, पण आज ते का संतापले आहेत. सत्यजीत तांबे हे पदवीधर मतदारसंघात निवडून आले व म्हणाले, मी कोणत्याच पक्षात जाणार नाही. काँग्रेसकडे शहाणपण असते तर विधान परिषद निवडणुकीत सत्यजीत तांबे यांच्या विजयावर त्यांनी थोरातांशी चर्चा केली असल्याच्या प्रकरणावर पडदा टाकला असता. पण वाडा पडला तरी अहंकाराचा झेंडा फडकत ठेवायचा हे धोरण दिसून येत आहे. राहुल गांधी यांच्या ‘भारत जोडो’ यात्रेच्या यशानंतर काँग्रेसला अनेक राज्यात संजीवनी मिळत असल्याचे दिसत आहे. पण राज्यात काँग्रेसमध्ये आज जे घडत आहे, ते याच्या अगदी विपरीत आहे आणि यामुळेच काँग्रेस पक्षाचेच मोठे नुकसान होऊ शकते’, अशी भीती अग्रलेखातून व्यक्त करण्यात आली.

नाना पटोले हे काँग्रेसचे मेहनती नेते आहेत व भारतीय जनता पक्षात बंड करून ते काँग्रेस पक्षात आले. ते पक्षवाढीसाठी कष्ट घेतात, पण कठीण काळात ज्यांनी राज्यात काँग्रेस पक्षाचे अस्तित्व टिकवून ठेवले अशा ‘घराण्यां’शी पंगा घेऊन राज्यात त्यांचा पक्ष कसा वाढणार ? नाना पटोले यांनी वाद न वाढवता पक्ष पुढे नेला तर २०२४ साली महाविकास आघाडीला नक्कीच याचा फायदा राहणार आहे. नाहीतर २०२४ अगोदर कमळाबाईवरील भुंगे काँग्रेसच्या उरलेल्या मधाच्या पोळय़ावर बसणार. सत्यजीत तांबे यांच्यावर आमचे लक्ष आहे, असे एक विधान देवेंद्र फडणवीस यांनी केले आहे’, अशा खोचक शब्दांत अग्रलेखातून काँग्रेसला इशारा दिला.

दरम्यान, सामनाच्या अग्रलेखातून ठाकरे गटाने भाजपाला टोला लगावला. भारतीय जनता पक्षाने कार्यकर्ते घडविण्यासाठी रामभाऊ म्हाळगी संस्थेची स्थापना केली, पण भाजप इतरांनी घडवलेले व तयार केलेलं कार्यकर्ते उचलूनच स्वतःच्या इमारतीचे मजल भरत आहे. नगर जिल्हय़ात त्यांनी अगोदरच विखे- पाटलांना ‘मेकअप’ करून भाजपमध्ये आणले आणि आता त्यांचा सत्यजीत तांबेंवर डोळा आहे. बाळासाहेब थोरातांसारख्या बड्या नेत्याने बंडाचे दंड थोपटल्याने भाजपच्या मनात उकळ्याच फुटल्या असणार आहेत. म्हणून बाळासाहेब थोरात प्रकरणी काँग्रेसने सावध राहायला हवे’, असं अग्रलेखातून ठाकरे गटानं काँग्रेसचे कान टोचले.

Tags

follow us
  • fb
  • instagram
  • youtube