शिंदे-फडणवीस सरकारच्या मंत्रिमंडळाचा विस्तार होणारच नाही

शिंदे-फडणवीस सरकारच्या मंत्रिमंडळाचा विस्तार होणारच नाही

मुंबई : शिंदे-फडणवीस सरकार स्थापन होऊन सहा महिन्याहून अधिक कालावधी लोटला आहे. अद्याप मंत्रीमंडळ विस्तार झाला नाही. सत्ताधारी पक्षातील नेत्यांकडून दररोज मंत्रीमंडळ विस्ताराच्या नवनवीन तारखा दिल्या जात आहेत.

अशात शिंदे-फडणवीस सरकारला पाठिंबा देणारे प्रहार संघटनेचे आमदार बच्चू कडू यांनी मोठं विधान केलं आहे. शिंदे फडणवीस सरकारच्या या कार्यकाळात मंत्रीमंडळ विस्तार होणारच नाही, अशा प्रकारचं सूचक विधान बच्चू कडू यांनी केलं.

आपण जेव्हा सत्ताधारी पक्षातील आमदारांशी बोलत असतो, तेव्हा २०२४ नंतरच मंत्रीमंडळ विस्तार होईल, असं सांगत असतो, असंही बच्चू कडू म्हणाले. ते एका वृत्तवाहिनीशी बोलत होते.

दिव्यांग मंत्रालयाचं मंत्रीपद तुमच्याकडे कधी येणार आहे? असं विचारलं असता बच्चू कडू म्हणाले, ‘मला वाटतं, हा प्रश्न तुम्ही एकनाथ शिंदे आणि देवेंद्र फडणवीसांना विचारायला हवा. आम्ही सर्व आमदार जेव्हा एकत्र बसत असतो. तेव्हा मी त्यांना सांगत असतो की, २०२४ नंतरच आपल्या मंत्रिमंडळाचा विस्तार होईल’, असं सूचक विधान बच्चू कडूंनी केलं.

मंत्रिमंडळाचा लवकरच विस्तार होईल या मुख्यमंत्री एकनाथ शिंदेंच्या विधानाबाबत विचारलं असता बच्चू कडू मिश्किलपणे म्हणाले की, ‘एवढ्यात मंत्रीमंडळ विस्तार झाला तर आम्ही तुम्हाला पेढे भरवू…. पण आम्ही सगळ्या आमदारांनी आता आमची मानसिकता तयार करून ठेवली आहे. मंत्रीमंडळ विस्तारात तुम्ही डोकं नका लावू, काहीतरी काम करा,’ असंही बच्चू कडू म्हणाले.

Tags

follow us
  • fb
  • instagram
  • youtube