एमआयटी स्कूल ऑफ गव्हर्नमेंट पुणेतर्फे १५वी भारतीय छात्र संसद, कुलगुरू डॉ. आर.एम.चिटणीस यांची माहिती

कुलगुरू डॉ. आर.एम.चिटणीस यांनी पत्रकार परिषदेत दिली. यावेळी विद्यापीठाचे सीएओ डॉ. प्रसाद खांडेकर उपस्थित होते.

  • Written By: Published:
News Photo   2026 02 16T185519.821

एमआयटी वर्ल्ड पीस युनिव्हर्सिटी, पुणे आणि एमआयटी स्कूल ऑफ गव्हर्नमेंट यांच्या संयुक्त विद्यमाने तीन दिवसीय १५वी ‘भारतीय छात्र संसद’ दि.२१ ते २३ फेब्रुवारी २०२६ रोजी कोथरूड येथील एमआयटी वर्ल्ड पीस युनिव्हर्सिटीच्या विवेकानंद सभामंडप, येथे होणार असल्याची माहिती एमआयटी वर्ल्ड पीस युनिव्हर्सिटीचे कुलगुरू डॉ. आर.एम.चिटणीस यांनी पत्रकार परिषदेत दिली. यावेळी विद्यापीठाचे सीएओ डॉ. प्रसाद खांडेकर, एसओजीचे असोसिएट प्रोफेसर डॉ. परिमल माया सुधाकर, डॉ. हितेश जोशी, प्रोग्रॅम डायरेक्टर डॉ. अभिजित ढेरे, प्रा. गोपाळ वामने व विद्यार्थी प्रतिनिधी उपस्थित होते.

१५ व्या भारतीय छात्र संसदेचे उद्घाटन, शनिवार, २१ फेब्रुवारी रोजी दुपारी ४.३० वा. होईल. याप्रसंगी वरिष्ठ पत्रकार आणि लेखक पद्मश्री राजदीप सरदेसाई आणि मध्य प्रदेशचे माजी मुख्यमंत्री व राज्यसभेचे खासदार दिग्विजय सिंह हे प्रमुख पाहुणे म्हणून उपस्थित राहणार आहेत. एमआयटी वर्ल्ड पीस युनिव्हर्सिटीचे संस्थापक अध्यक्ष विश्वधर्मी प्रा.डॉ. विश्वनाथ दा. कराड हे अध्यक्षस्थानी असतील.

त्याचबरोबर, सोमवार, दि.२३ फेब्रुवारी रोजी दुपारी ४.३० वा. होणार्‍या समारोप प्रसंगी लोकसभा खासदार अनुराग सिंह ठाकूर, खासदार डॉ. संदीप कुमार पाठक, माजी राज्यसभा सदस्य श्री. शाहिद सिद्दिकी उपस्थित राहणार आहेत.
छात्र संसदेच्या उद्घाटन व समारोप समारंभाखेरीज चार सत्रे आयोजित करण्यात आली आहेत.

संसदेतील सत्रे खालीलप्रमाणे

सत्र १ : लोकशाही (डेमोक्रसी)
सत्र २ : नेतृत्व विकास (लीडरशीप)
सत्र ३ : शासन (गर्व्हनन्स)
सत्र ४ : सार्वजनिक धोरण (पब्लिक पॉलिसी)

विद्यार्थ्यांच्या नेतृत्वगुणांना वाव देण्यासाठी या वर्षापासून भारतीय छात्र संसदेत सहभागी विद्यार्थ्यांना मोठी संधी उपलब्ध करुन देण्यात येणार आहे. विद्यापीठाच्या १०० क्लास रुममध्ये ३ दिवसात एकूण ४०० तज्ञांच्या माध्यमातून वरील विषयांवर विचार मांडले जातील. तसेच प्रत्येक क्लास मध्ये ५-५ विद्यार्थ्यांना बोलण्याची संधी उपलब्ध करुन देण्यात येणार आहे.

तीन दिवस चालणार्‍या १५व्या भारतीय छात्र संसदेमध्ये राजकीय, सामाजिक, प्रसारमाध्यमे, अभिनय व उद्योग क्षेत्रातील अनेक मान्यवर संबोधित करणार आहेत. त्याच प्रमाणे दि. २२ फेब्रुवारी२०२६ रोजी वाद-विवाद स्पर्धेचे आयोजन करण्यात येणार आहे. या अंतर्गत ‘भारताची परीक्षा-केंद्रित शिक्षण व्यवस्थेमुळे सर्जनशीलतेला मर्यादा’ ( India’s Exam-Centric Education System Limits Creativity’) आणि ‘५० टक्के पेक्षा जास्त आरक्षणामुळे समानतेला येणारा कमकुवतपणा’ ( Reservation Beyond 50% Undermines Equality’ ) या दोन समकालीन विषयांवर प्रत्येकी ५ विद्यार्थ्यांचे दोन संघ (एकूण २० सहभागी आणि ४ संघ) सहभागी होणार आहेत.

Pune Traffic : काय सांगता? 2025 मध्ये प्रत्येक पुणेकरांचे वाया गेले 152 तास

यावर्षापासून एमआयटी डब्ल्यूपीयूच्या पृथ्वी ग्लोब पासून चाणक्य बिल्डिंगपर्यंत पॅव्हेलियनची नवी संकल्पना रूजविण्यात येत आहे. देशाला स्वातंत्र्य मिळून ७५ वर्षे पूर्ण झाली. त्यानिमित्ताने ७५ वर्षातील प्रगतीचा आलेख आणि आढावा यामध्ये दाखविण्यात येणार आहे. विद्यापीठाच्या विविध स्कूल व विभागांच्या माध्यमातून हे प्रदर्शन दाखविण्यात येईल.

लोकशाही मूल्ये, संविधानिक तत्त्वे आणि नैतिक व सार्वजनिक नेतृत्व वाढविणे, शासन संरचना आणि सार्वजनिक धोरण प्रक्रियांबद्दल जागरुकता विकसित करणे, ज्यामुळे विद्यार्थ्यांना शैक्षणिक, प्रशासन आणि धोरणात्मक पद्धतींमधील दृष्टिकोनांची ओळख करुन देणे, सामाजिक आव्हाने आणि प्रशासनाच्या मुद्यांवर माहितीपूर्ण चर्चांना प्रोत्साहन देणे, विद्यार्थ्यांमध्ये विश्लेषणात्मक विचारसरणी, नागरी जबाबदारी आणि सहभागी नेतृत्व मजबूत करणे व अनुभवात्मक आणि चर्चा आधारित शिक्षण पद्धतीद्वारे सिद्धांत आणि व्यवहार यांना जोडणे हे १५ व्या भारतीय छात्र संसदेचे मुख्य उद्दिष्टे आहेत.

महाराष्ट्र राज्याचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस हे छात्रसंसदेचे पॅट्रन आहेत. तसेच, जगविख्यात शास्त्रज्ञ पद्मविभूषण डॉ. रघुनाथ माशेलकर, प्रा.डॉ. विश्वनाथ दा. कराड, अनू आगा, अभय फिरोदिया, लोबसांग सांग्ये, जस्टिस एन. संतोष हेगडे, डॉ. विजय भटकर आणि नानिक रुपानी हे या छात्रसंसदेचे मार्गदर्शक आहेत. केंद्रीय क्रीडा व युवक कल्याण मंत्रालय, महाराष्ट्र राज्याचे उच्च व तंत्रशिक्षण मंत्रालय, महाराष्ट्र राज्याचे क्रीडा व युवा कल्याण मंत्रालय आणि मानवाधिकार, लोकशाही, शांतता आणि सहिष्णुतासाठीचे युनेस्को अध्यासन यांच्या सहकार्याने ही छात्र संसद होत आहे. तसेच राष्ट्रसेवा योजना आणि नेहरु युवा केंद्र ह्यांचा सक्रीय सहभाग या उमक्रमात असतो.

नॅशनल टीचर्स काँग्रेस फाउंडेशन, नॅशनल विमेन्स पार्लमेंट, सरपंच संसद आणि भारत अस्मिता राष्ट्रीय पुरस्कार, असोशिएशन ऑफ इंडियन युनिव्हर्सिटीज यांच्या सहकार्याने ही संसद भरविण्यात येणार असून अनेक राष्ट्रीय संस्थांनीही या विद्यार्थी संसदेला पाठिंबा दिला आहे.

follow us