मुंबईत दोन वर्षांनंतर टाटा मॅरेथॉन स्पर्धेला सुरुवात, नागरिकांचा मोठा सहभाग

मुंबईत दोन वर्षांनंतर टाटा मॅरेथॉन स्पर्धेला सुरुवात, नागरिकांचा मोठा सहभाग

मुंबई : दोन वर्षांनंतर मुंबईत टाटा मॅरेथॉन स्पर्धेचं आयोजन करण्यात आलंय. आज पहाटे 5 वाजून 15 मिनीटांनी टाटा मॅरेथॉन स्पर्धेला सुरूवात झालीय. या मॅरेथॉन स्पर्धेत नागरिकांनी मोठ्या संख्येनं सहभाग घेतल्याचं पाहायला मिळतंय. या मॅरेथॉनला मुख्यमंत्री एकनाथ शिंदे, उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्यासह विविध मान्यवरांची उपस्थिती असणार आहे.

आज होत असलेल्या टाटा मॅरेथॉन स्पर्धेत सहभागी होण्यासाठी गाड्यांची व्यवस्था देखील केली होती. बोरीवलीहून पहाटे 3 वाजून 45 मिनिटांनी लोकल सुटली. या स्पर्धेत कोणताही अडथळा न येण्यासाठी या मार्गावरील वाहतुकीत काही बदल करण्यात आले आहेत. वाहतूक पर्यायी मार्गानं वळवली आहे. आज पहाटे 3 ते दुपारी 1 वाजून 15 मिनीटांपर्यंत वाहतुकीत हे बदल केले आहेत.

टाटा मॅरेथॉन स्पर्धेत सहभागी होणाऱ्या खेळाडूंचं ढोल ताशांच्या गजरात स्वागत करण्यात आलं. यावेळी स्पर्धकांमध्ये मोठा उत्साह पाहायला मिळाला. टाटाकडून आयोजित हाफ मॅरेथॉनला देखील सुरुवात झालीय. माहीम येथून या स्पर्धेला सुरुवात झाली. हाफ मॅरेथॉनला मुंबई भाजप अध्यक्ष आशिष शेलार यांनी हिरवा झेंडा दाखवला.

मुंबईमध्ये कोरोनाच्या दोन वर्षानंतर मॅरेथॉन होतेय. त्यामुळं लोकांमध्ये मोठा उत्साह असल्याचं भाजप नेते आशिष शेलार यांनी सांगितलं. टाटांकडून आयोजित मुंबई मॅरेथॉनमध्ये माहीमच्या हाफ मॅरेथॉन पोलीस कपमध्ये 14 हजार मुंबईकर सहभागी झालेत.

मुंबई महानगरपालिकेसोबत मुंबई पोलिसांनी आणि आयोजकांनी जागोजागी लोकांसाठी पाण्याची सुविधा दिल्याचं पाहायला मिळालं. त्याचबरोबर मेडिकलची व्यवस्था देखील केली आहे.

Tags

follow us
  • fb
  • instagram
  • youtube