टीम इंडियाने दक्षिण आफ्रिकेविरुद्धचा सामना जिंकला, रोहित-विराटचं अर्धशतक अन् खेळ ‘यशस्वी’
दक्षिण आफ्रिकेने भारतासमोर 271 धावांचं आव्हान ठेवलं होतं. भारताने हे आव्हान 61 बॉलआधी 1 विकेट्स गमावून पूर्ण केलं.
टीम इंडियाने दक्षिण आफ्रिकेविरुद्धच्या तिसऱ्या अंतिम (IND vs SA) एकदिवसीय सामन्यात 9 विकेट्सने दणदणीत विजय मिळवला आहे. यशस्वी जैस्वाल याचं शतक आणि रोहित शर्मा तसंच विराट कोहली या अनुभवी जोडीने केलेल्या अर्धशतकी खेळीच्या जोरावर हा विजय मिळाला आहे.
दक्षिण आफ्रिकेने भारतासमोर 271 धावांचं आव्हान ठेवलं होतं. भारताने हे आव्हान 61 बॉलआधी 1 विकेट्स गमावून पूर्ण केलं. टीम इंडियाने 39.5 ओव्हरमध्ये विजयी आव्हान पूर्ण केलं. भारताने अशाप्रकारे हा सामना जिंकला. भारताने यासह ही मालिका 2-1 अशा फरकाने जिंकली.
टीम इंडियाने मालिकेत विजयी सलामी दिली होती. भारताने रांचीत विजयी सुरुवात केली. तर रायपूरमध्ये दक्षिण आफ्रिकेने कमबॅक करत मालिकेत बरोबरी साधली. त्यामुळे तिसरा सामना हा निर्णायक असा होता. मात्र भारताने दक्षिण आफ्रिकेला लोळवत कसोटी मालिकेतील पराभवाची परतफेड केली.
रोहित शर्मा आणि यशस्वी जैस्वाल या दोघांनी दीडशतकी भागीदारी करत भारताचा विजय निश्चित केला. दोघांनी संयमी सुरुवात केली. दोघांनी ठराविक धावांनंतर गिअर बदलला. रोहितने या भागीदारी दरम्यान अर्धशतक झळकावलं. रोहितला शतक करण्याची संधी होती. मात्र, रोहित फटकेबाजी करताना आऊट झाला. रोहितने 75 रन्स केल्या. रोहित आऊट होताच धावांची सलामी जोडी फुटली. या दोघांनी पहिल्या विकेटसाठी 155 धावांची भागीदारी केली.
नंतर विराट कोहली मैदानात आला. यशस्वीने विराटसह फटकेबाजी करत अर्धशतकानंतर शतकही झळकावलं. यशस्वीच्या एकदिवसीय कारकीर्दीतील हे पहिलंवहिलं शतक ठरलं. तसेच विराटनेही अर्धशतक ठोकलं. याच जोडीने भारताला विजयापर्यंत पोहचवलं. या दोघांनी दुसऱ्या विकेटसाठी नॉट आऊट 84 बॉलमध्ये 116 रन्सची पार्टनरशीप केली. यशस्वीने 116 तर विराटने 65 धावांची खेळी साकारली.
