700 रुपये उसने घेऊन भरला पीक विमा… परत मिळाले फक्त 211 रुपये, अपंग शेतकऱ्याची व्यथा
धाराशिवमधील अपंग शेतकरी दाम्पत्याला नुकसान भरपाई म्हणून मिळाले फक्त 211 रुपये. या प्रकरणामुळे पीक विमा योजनेच्या अंमलबजावणीवर प्रश्नचिन्ह...
dharashiv disabled farmer crop insurance compensation 211 rupees: संकटाच्या काळात शेतकऱ्याला आर्थिक आधार मिळावा, या उद्देशाने पीक विमा योजना (Crop Insurance) राबवली जाते. नैसर्गिक आपत्तीमुळे झालेल्या नुकसानीची काही प्रमाणात भरपाई व्हावी, ही या योजनेमागची भावना आहे. मात्र याबाबत धाराशिव (Dharashiv) जिल्ह्यातील एका अपंग आणि निराधार शेतकरी (Farmer) दाम्पत्याच्या वाट्याला आलेला अनुभव या योजनेच्या अंमलबजावणीवर गंभीर प्रश्न उपस्थित करणारा ठरत आहे.
ब्रिज भूषण शरण सिंहांना मोठा दिलासा! महिला कुस्तीपटू लैंगिक अत्याचार प्रकरणी निर्दोष मुक्तता
वाशी तालुक्यातील वडजी येथील बबन कांबळे आणि राधा कांबळे यांचा संसार अत्यंत हलाखीच्या परिस्थितीत सुरू आहे. पोलिओमुळे बबन कांबळे चालण्यात अडचण असलेले दिव्यांग आहेत, तर त्यांची पत्नी राधा कांबळे दृष्टीहीन आहेत. मुलबाळ नसलेल्या या दाम्पत्याचा उदरनिर्वाह दीड एकर शेती आणि अनियमित मिळणाऱ्या निराधार पेन्शनवर अवलंबून आहे. दोन पत्र्याच्या छोट्याशा घरात राहणाऱ्या या कुटुंबाकडे स्वतःचे वीजमीटरही नाही. शेजाऱ्यांच्या घरातून मिळणाऱ्या एका बल्बच्या उजेडात ते त्यांचे आयुष्य जगतात.
जिल्ह्यात 2025 मध्ये झालेल्या अतिवृष्टी आणि पुरामुळे (heavy rains and floods 2025) त्यांच्या शेतातील सोयाबीनचे पीक पूर्णपणे नष्ट झाले होते. त्यांच्या वर्षभराच्या कष्टांवर पाणी फिरले. तरीही संकटाच्या वेळी पीक विमा मदतीला धावून येईल, या आशेने त्यांनी 700 रुपये उसने घेऊन पीक विम्याचा हप्ता भरला. मात्र एक महिन्यानंतर त्यांच्या खात्यात पीक विम्याचे फक्त 211 रुपये जमा झाले. भरलेल्या प्रीमियमपेक्षाही कमी भरपाई पाहून या दाम्पत्याच्या अपेक्षांचा पूर्णपणे भ्रमनिरास झाला. ज्याच्याकडून संकटात आधाराची अपेक्षा होती, त्याच योजनेतून मिळालेली ही तुटपुंजी मदत त्यांच्या जखमेवर मीठ चोळणारी ठरल्याची भावना व्यक्त होत आहे. या अनुभवामुळे कांबळे दाम्पत्याने यंदा पीक विमाच भरलेला नाही. “ज्या योजनेवर विश्वास ठेवून उसने पैसे काढले, त्यातूनच निराशा मिळाली,” अशी त्यांची भावना आहे.
माझ्या विचारांशी राजकारण जुळलं नाही तर एक्झिट घेईन; पंकजा मुंडे यांचे राजकारणातून निवृत्तीचे संकेत
दरम्यान, खरीप 2025 च्या पीक विमा वितरणादरम्यान धाराशिव जिल्ह्यातील अनेक शेतकऱ्यांच्या खात्यावर अत्यल्प भरपाई जमा झाल्याच्या तक्रारी समोर येत आहेत. काही महसूल मंडळांचा समावेश न होणे, भरपाईच्या निकषांबाबत संभ्रम आणि नुकसानाच्या तुलनेत मिळालेली कमी रक्कम यामुळे अनेक शेतकरी नाराजी व्यक्त करत आहेत.
बबन आणि राधा कांबळे यांची ही गोष्ट केवळ एका कुटुंबाची व्यथा नाही; ती संकटात असलेल्या अनेक शेतकऱ्यांच्या अपेक्षा, संघर्ष आणि व्यवस्थेकडून असलेल्या आधाराच्या आशेचे प्रतिनिधित्व करते. पीक विमा योजनेचा उद्देश शेतकऱ्याला दिलासा देण्याचा असला, तरी अशा घटनांमुळे त्या योजनेची प्रभावी अंमलबजावणी, पारदर्शकता आणि भरपाईच्या प्रक्रियेबाबत प्रश्न उपस्थित होणे स्वाभाविक आहे.
जंतर-मंतर आंदोलनप्रकरणी दिल्ली पोलिसांची समाजमाध्यमांवर करडी नजर; १८० हून अधिक खात्यांची चौकशी