भाजपकडून आयारामांना संधी; पक्षात प्रवेश करताच उमेदवारी, निष्ठावंतांची नाराजी उघड

विधान परिषदेच्या १७ जागांपैकी भाजप ११ जागांवर लढत आहे. दरम्यान, महायुतीत जागावाटपावरून प्रचंड रस्सीखेच सुरू होती.

News Photo   2026 06 01T161506.260

स्थानिक स्वराज्य संस्था विधान परिषद निवडणुकीसाठी (Election) भारतीय जनता पक्षाकडून 11 नावांची काल यादी जाहीर करण्यात आली. आज उमेदवारी दाखल करण्याचा शेवटचा दिवस आहे. दरम्यान, यादीमध्ये काही नावांवर चांगलीच चर्चा सुरू झाली आहे. भाजपात इतर पक्षातून आयात केलेल्या उमेदवारांनाच भाजपने जास्त प्रमाणात संधी दिल्याचं पुढं आलं आहे.

यामध्ये राष्ट्रवादी शरद पवार गटाचे प्राजक्त तनपुरे यांना पक्ष प्रवेशाच्या अवघ्या २४ तासात उमेदवारी दिल्याने आश्चर्य व्यक्त केलं जात आहे. विधान परिषदेच्या १७ जागांपैकी भाजप ११ जागांवर लढत आहे. दरम्यान, महायुतीत जागावाटपावरून प्रचंड रस्सीखेच सुरू होती. भाजपने जाहीर केलेल्या यादीवरून कोणत्या जागा कोणत्या पक्षाकडे गेल्याचे आता स्पष्ट झाले आहे.

भाजपचं निष्ठावंतांनो अजून वाट पहा; हे सूत्र कायम; मराठवाड्यात सर्व आयात उमेदवार, जातीय समिकरणावर जोर

सोलापूरमध्ये आधी शिवसेना आणि नंतर काँग्रेस असा राजकीय प्रवास केलेले माजी आमदार राजेंद्र राऊत यांनाही भाजपने उमेदवारी दिली आहे. विधानसभा निवडणुकीत फार कमी मतांच्या अंतराने राऊत यांचा ठाकरे गटाचे आमदार सोपल यांनी पराभव केला होता. तर दुसरीकडं, नांदेडमध्ये ज्येष्ठ नेते अशोक चव्हाण यांचे अत्यंत निकटवर्तीय आणि काँग्रेसचे माजी आमदार अमर राजूरकर यांना भाजपकडून तिकीट मिळालं आहे.

त्याचबरोबर धाराशिव-लातूर-बीड या अत्यंत महत्त्वाच्या जागेवर भाजपने काँग्रेसचे माजी आमदार बसवराज पाटील यांना रिंगणात उतरवलं आहे. छत्रपती संभाजीनगरमध्ये सुहास शिरसाट यांना भाजपने उमेदवारी दिली आहे. शिरसाट हे राष्ट्रवादी काँग्रेसमधून भाजपमध्ये आले आहेत.ही सगळी उमेदवारी पाहता भाजपमध्ये फक्त आयारामांनाच महत्वं आहे का? निष्ठावंतांचं काय असा प्रश्न आता भाजपमधीलच काही लोक दबक्या आवाजात विचारत आहेत.

सांगली साताऱ्यातून भाजपने उमेदवारी दिलेले धैर्यशील कदम हे मुळचे काँग्रेसची पार्श्वभूमी असलेले नेते. २०१४ ची विधानसभा निवडणूक त्यांनी काँग्रेसच्या तिकिटावर लढवली होती. त्यानंतर त्यांनी शिवसेनेत प्रवेश केला आणि २०१९ ची विधानसभा निवडणूक शिवसेनेकडून लढवली. काँग्रेस-शिवसेना प्रवास करत ते अखेर भाजपवासी झाले. सातारा भाजपचे जिल्हाध्यक्षपद त्यांना देण्यात आलं. जयकुमार गोरे यांच्याशी त्यांची जवळीक असल्याचे सांगितले जातं.

भाजपचे विधान परिषद निवडणुकीसाठीचे ११ उमेदवार

वर्धा-चंद्रपूर-गडचिरोली : अरुण लखाणी
भंडारा-गोंदिया : अविनाश ब्राह्मणकर
अमरावती : प्रवीण पोटे पाटील
सांगली-सातारा : धैर्यशील कदम
सोलापूर : राजेंद्र राऊत
अहिल्यानगर : प्राजक्त तनपुरे
छत्रपती संभाजीनगर-जालना : सुहास शिरसाट
नांदेड उमेदवार: अमर राजूरकर
धाराशिव-लातूर-बीड: बसवराज पाटील
जळगाव : नंदकिशोर महाजन

follow us