देवेंद्र फडणवीस आणि उद्धव ठाकरेंची भेट झालीच नाही, आंबेडकरांचा दावा भाजपने फेटाळला!
मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आणि उद्धव ठाकरे यांच्या कथित भेटीच्या बातम्या पूर्णतः निराधार, बिनबुडाच्या आणि धादांत खोट्या आहे.
BJP rejected Ambedkar’s claim! : आगामी विधान परिषद निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर महाराष्ट्राच्या राजकारणात नवा ट्विस्ट निर्माण झाला आहे. शिवसेना (उद्धव बाळासाहेब ठाकरे) गटाचे प्रमुख उद्धव ठाकरे यांनी काल मध्यरात्री सुमारे दोन वाजता राज्याचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या ‘वर्षा’ निवासस्थानी भेट घेतल्याचा दावा करण्यात आला आहे. वंचित बहुजन आघाडीचे प्रमुख प्रकाश आंबेडकर यांचे संपादक असलेल्या ‘प्रबुद्ध भारत’ या वृत्तपत्राच्या अधिकृत ट्विटर हँडलवरून ही माहिती देण्यात अली असून सूत्रांच्या हवाल्याने सांगण्यात आले की, उद्धव ठाकरे यांनी मध्यरात्री ‘वर्षा’ बंगल्यावर भेट दिली. या भेटीत नेमके काय चर्चा झाली, याबाबत अद्याप अधिकृत माहिती उपलब्ध नाही.
काही दिवसांपूर्वी विधान परिषदेतील निवृत्त आमदारांच्या कार्यक्रमात दोन्ही नेत्यांमध्ये शेरोशायरीच्या माध्यमातून हलकाफुलका संवाद झाला होता. त्यानंतर आता मध्यरात्रीच्या कथित भेटीमुळे राजकीय वर्तुळात चर्चांना उधाण आले आहे. महाविकास आघाडीकडून उद्धव ठाकरेंना विधान परिषदेवर पाठवण्याच्या हालचाली सुरू असल्याच्या चर्चांमध्ये ही भेटीचा दावा वेगळ्या गणिताची चाहूल ठरू शकते, असे राजकीय निरीक्षकांचे मत आहे. दरम्यान, या दाव्यावर भारतीय जनता पक्षाकडून प्रतिक्रिया समोर आली आहे.
लपून छपून भेटणार नाही; उद्धव ठाकरे भेटीवर मुख्यमंत्री फडणवीस थेट बोलले
भाजपचे प्रवक्ते नवनाथ बन यांनी स्पष्ट सांगितले की,मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आणि उद्धव ठाकरे यांच्या कथित भेटीच्या बातम्या पूर्णतः निराधार, बिनबुडाच्या आणि धादांत खोट्या आहे.ज्या सोशल मीडिया हँडलवरून अशा अफवा पसरवल्या जात आहेत, त्यांच्याविरुद्ध कायदेशीर नोटीस बजावून कारवाई करण्यात येईल, असा इशाराही त्यांनी दिला आहे. सध्या विधान परिषद निवडणुकीच्या तयारीत महाराष्ट्रातील सर्वच पक्ष सक्रिय आहेत.
महाविकास आघाडीकडून कोणत्या नेत्यांना उमेदवारी मिळणार, याबाबतचा सस्पेन्स कायम असताना ही चर्चा राजकीय समीकरणे बदलण्याची शक्यता वर्तवत आहे. मात्र, भेट झाल्याचा दावा सध्या केवळ एका माध्यमाच्या ट्विटपुरता मर्यादित असून, दोन्ही बाजूंकडून भेटीची अधिकृत पुष्टी मिळालेली नाही. त्यामुळे अशा प्रकारच्या बातम्या कोणत्या संकेताकडे घेऊन जात आहे हे पहाने महत्त्वाचा असणार आहे.