‘tukaram_ias’ इंस्टाग्राम अकाउंटवर पाठवा माहिती; भेसळखोरांवर होणार थेट कारवाई

गैरव्यवहार सुरू असल्याची माहिती असल्यास नागरिकांनी थेट आयुक्त तुकाराम मुंढे यांना इन्स्टाग्रामवर मेसेज करण्याचे आवाहन करण्यात आले आहे.

  • Written By: Published:
Untitled Design 50 1

Direct action will be taken against adulterators : राज्यातील अन्न आणि औषधांमधील भेसळ रोखण्यासाठी आता प्रशासन अधिक आक्रमक झाले असून, नागरिकांनाही थेट कारवाई प्रक्रियेत सहभागी करून घेण्याचा मोठा निर्णय घेण्यात आला आहे. तुकाराम मुंढे यांनी अन्न व औषध प्रशासनाच्या आयुक्तपदाची सूत्रे हाती घेतल्यानंतर राज्यभरात भेसळ, गैरव्यवहार आणि बनावट उत्पादनांविरोधात धडक मोहीम सुरू केली आहे.

दरम्यान, आता सोशल मीडियाच्या माध्यमातून सर्वसामान्य नागरिक थेट प्रशासनाशी संपर्क साधू शकणार आहेत. आपल्या परिसरात भेसळयुक्त अन्नपदार्थ, बनावट औषधे, नकली कॉस्मेटिक्स किंवा इतर कोणत्याही प्रकारचा गैरव्यवहार सुरू असल्याची माहिती असल्यास नागरिकांनी थेट आयुक्त तुकाराम मुंढे यांना इन्स्टाग्रामवर मेसेज करण्याचे आवाहन करण्यात आले आहे.

यासाठी ‘tukaram_ias’ या अधिकृत इन्स्टाग्राम अकाउंटचा वापर करण्यात येणार आहे. नागरिकांनी तक्रार करताना संबंधित प्रकाराची संपूर्ण माहिती द्यायची आहे. नेमका गैरव्यवहार काय आहे, तो कुठे सुरू आहे, कोणत्या व्यक्ती किंवा संस्थेकडून केला जात आहे आणि कोणती उत्पादने तयार केली जात आहेत याचा तपशील पाठवावा लागणार आहे.

ब्रेकिंग : रखरखत्या उन्हात बाज टाकून करणार उपोषण, जरांगेंची आंदोलनाबाबत मोठी घोषणा

तसेच तक्रारीसोबत अचूक गुगल लोकेशन पाठवण्याचेही आवाहन करण्यात आले आहे, जेणेकरून प्रशासनाला संबंधित ठिकाणी तातडीने पोहोचता येईल. याशिवाय, फोटो किंवा व्हिडीओ स्वरूपातील पुरावे असल्यास तेही पाठवण्यास सांगण्यात आले आहे. गरज पडल्यास अधिक माहितीसाठी संपर्क साधता यावा म्हणून तक्रारदाराने आपला संपर्क क्रमांकही द्यावा, असे प्रशासनाने स्पष्ट केले आहे.

विशेष म्हणजे, नागरिकांनी दिलेली माहिती योग्य आणि नियमात आढळल्यास संबंधितांवर कठोर कारवाई करण्यात येणार असल्याचा इशाराही प्रशासनाकडून देण्यात आला आहे. त्यामुळे राज्यात भेसळमुक्त वातावरण निर्माण करण्यासाठी नागरिकांनी सजग राहून पुढाकार घ्यावा, असे आवाहन अन्न व औषध प्रशासनाकडून करण्यात येत आहे.

भेसळीविरोधातील ही मोहीम आता केवळ प्रशासनापुरती मर्यादित न राहता ‘जनतेच्या सहभागातून जनतेसाठी’ अशी लोकचळवळ बनत असल्याचे चित्र दिसून येत आहे.

follow us