Video : देशात नरेंद्र, राज्यात देवेंद्र असं मुंडेंच म्हणाले होते…, मुख्यमंत्री फडणवीसांनी सांगितली ‘ती’ आठवण

CM Devendra Fadnavis on Gopinath Munde Statue : आपल्या सर्वाचे लोकनेते स्व. गोपीनाथराव मुंडे साहेबांच्या पावनस्मृतींना अभिवादन करतो. मी माझे भाग्य समजतो की, येथील पुतळा अनावरण सोहळा माझ्या हस्ते झाला. (Munde) विलासराव देशमुख यांचा पुतळा त्याच ठिकाणी आहे, स्व गोपीनाथ मुंडे आणि विलासराव देशमुख यांची मैत्री संपूर्ण राज्याला माहिती आहे. आज त्यांचे पुतळे एकमेकांच्या आजुबाजूस आहेत, हे वेगळेपण आहे असे प्रतिपादन मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी केले. ते लातूरमध्ये गोपीनाथ मुंडे यांच्या स्मारकाच्या अनावरन प्रसंगी बोलत होते.
पंतप्रधान नरेंद्र मोदी यांना मी म्हणायचो की तुम्हला मुंडे साहेबांना उधारीवर दिलंय. आम्ही त्यांना परत आणणार आणि मुख्यमंत्री पदावर बसवणार. पण, दुर्दैवाने ते शक्य होऊ शकलं नाही अशी खंतही मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी यावेळी बोलून दाखवली. राज्यात काम केलेले नेते दिल्ली गेले तर हरवुन जातात. मात्र, लोकसभेत अवघ्या काही दिवसात मुंडेसाहेबांनी त्यांचे काम दाखवले होते. पण, त्यांना तेथे काम करण्याची संधी मिळाली नाही. गोपीनाथ मुंडेंनीच देशात नरेंद्र, राज्यात देवेंद्र असा उल्लेख केला होता. मात्र, सत्ता आल्यावर आम्ही त्यांनाच मुख्यमंत्री करणार होतो असंही फडणवीस यावेळी म्हणाले.
लातुरमध्ये गोपीनाथ मुंडेंच्या पुर्णाकृती पुतळ्याचं अनावरण; मंत्री पंकजा मुंडेंना अश्रू अनावर
आपण थोरपुरुषांचा पुतळा का बांधतो तर, त्यांच्या दाखवलेल्या मार्गांवर चालण्यासाठी प्रेरणा मिळाली पाहिजे म्हणूण. वर्षानुवर्षे मराठवड्याला तहानलेलं ठेवण्याचं काम हे आधीच्या सरकारने केलं. पण, आपण सत्तेत आल्यानंतर बीडपर्यंत आता पाणी पोहोचलेलं आहे. मराठवाडा दुष्काळमुक्त करण्याचे मुंडे साहेबांचे स्वप्न आम्ही पूर्ण करणार आहोत. मराठवाड्याच्या हक्काचे पाणी पळवून नेण्यात आलं होते, ते आपण वापस घेतलं.
गोदावरी परिक्रमाही गोपीनाथ मुंडेंनी केली होती. आता, त्यांचे स्वप्न आम्ही पूर्ण करणार आहोत. रेल्वेचे ही काम सुरू आहे. एक एक करून मुंडे साहेबांचे जे जे स्वप्न आहेत ते आम्ही पूर्ण करू असंही फडणवीस यावेळी म्हणाले. रेणापूर हा आता लातूर ग्रामीण झालाय, त्यामुळे तुमची सेवा म्हणजे मुंडे साहेबांची सेवा आहे. लातूरची पाणीपुरवठा योजना आणि सामान्य रुग्णालय यांना आजच मी मान्यता देतो, अशी घोषणाच मुख्यमंत्र्यांनी यावेळी केली.