live now
Gram Panchayat Election Result :विवेक कोल्हेंचा विखेंना आणखी एक धक्का ! मोठी ग्रामपंचायत हिसकाविली
Maharashtra Gram Panchayat Election Result Update : आगामी काळात होणाऱ्या विधानसभा आणि लोकसभेच्या निवडणुकांपूर्वी आज (दि.6) हाती येणाऱ्या 2 हजार 300 ग्रामपंचायतींच्या निकालाकडे (Maharashtra Gram panchayat Election Result) सर्वांचे लक्ष लागले असून, आतापर्यंत हाती आलेल्या निकालांनुसार राज्यातील प्रमुख ग्रामपंचायतींवर भाजपचे वर्चस्व असल्याचे चित्र समोर आले आहे. तर, आमदार रोहित पवार (Rohit Pawar), खासदार डॉ. अमोल कोल्हे (Amol Kolhe), डॉ.संजय कुटे, शहाजी बापू पाटील या प्रस्थापितांना त्यांच्या मतदारसंघात मोठा धक्का बसला आहे. नेमका राज्यातील ग्रामपंचायतींच्या निकालात कोणचा पराभव झाला कोणाचा विजय झाला हे सांगणारा लाईव्ह ब्लॉग…
LIVE NEWS & UPDATES
-
विवेक कोल्हेंचा विखेंना आणखी एक धक्का ! मोठी ग्रामपंचायत हिसकाविली
अहमदनगरः महसूलमंत्री राधाकृष्ण विखे पाटील गटाचे राहाता तालुक्यातील नऊ ग्रामपंचायतींवर वर्चस्व. पण पुणतांबा, वाकडी, चितळी ग्रामपंचायती भाजपचे विवेक कोल्हे गटाने हिसकावल्या. महत्त्वाच्या गावांमध्येही कोल्हेंचा शिरकाव.
-
बीआरएसचा एंट्री, दहा ग्रामपंचायती घेतल्या ताब्यात
तेलंगणाच्या भारत राष्ट्र समिती (बीआरएस) पक्षाने दहा ग्रामपंचायती जिंकत महाराष्ट्राच्या राजकारणात एंट्री केली आहे. भंडाऱ्यातील नऊ ग्रामपंचायतीवर बीआरएसने झेंड फडकावला आहे. विदर्भबरोबर मराठवाड्यातील बीड जिल्ह्यातील रेवकी ग्रामपंचायतही जिंकली आहे.
काटेबाम्हणी, उसरा, सालई बु, धुसाळा या भंडारा जिल्ह्यातील ग्रामपंचायतीत बीआरएसचे सरपंच झाले आहेत.
-
इगतपुरी तालुक्यात काँग्रेसची बाजी, पण चार अपक्ष सरपंच
नाशिक जिल्ह्यातील इगतपुरी तालुक्यात ग्रामपंचायत सार्वत्रिक निवडणुकीत भाजपला एकाही जागेवर विजय मिळवता आलेला नाही. अजित पवार गट आणि शरद पवार गटालाही इथे चांगलाच धक्का बसलाय. या दोन्ही गटाला मागे टाकत काँग्रेसने तीन जागांवर बाजी मारली आहे. तर मनसेने दोन जागांवर खाते उघडले आहे. यात विशेष गोष्ट म्हणजे इतर सर्व पक्षांना मागे टाकत चार अपक्ष उमेदवार सरपंच म्हणून निवडून आले आहेत.
निवडून आलेले सरपंच
1 ओंडली - प्रकाश वाळू खडके - शिंदे गट
2 दौडत - पांडू मामा शिंदे - काँग्रेस
3 कृष्ण नगर - वैशाली सचिन आंबावणे - अपक्ष
4 कुशेगाव- एकनाथ गुलाब कातोरे - अपक्ष
5 मोगरे - प्रताब विठ्ठल जाखेरे - मनसे
6 लक्ष्मी नगर - सावित्री सोमनाथ जोशी - ठाकरे गट
7 घोटी खुर्द - माणिक निवृत्ती बिन्नर - काँग्रेस (पोट निवडणूक)
8 आडवंन - निकिता किशोर आघान - काँग्रेस
9 धारगाव - रेश्मा पांडुरंग पुंजरा - अपक्ष
10 नागोसली - काशिनाथ साखरू होले - शिंदे गट
11 उंबरकोन - आत्मराम नामदेव सारुकते - अपक्ष
12 सोमज - जिजाबाई काशिनाथ कुंदे - मनसे
13 टाकी घोटी - माधुरी आडोळे - ठाकरे गट
14 शिरसाठे - सुनीता दत्तू सदगीर - शरद पवार गट
15 मोडाळे - शिल्पा दत्तू आहेर - अजित पवार गट
16 नांदगाव सदो - अनिता राक्षे - ठाकरे गट (बिनविरोध)
-
काटेवाडी अजित पवार गटाकडे पण भाजपचा प्रवेश
बारामतीमधील काटेवाडीत झालेल्या ग्रामपंचायत निवडणुकीमध्ये अजितदादा गटाला मोठं यश मिळालं आहे. काटेवाडीमध्ये अजित पवार गटाला 13 जागा मिळाल्या आहेत. एका जागेवर अपक्ष आणि दुसऱ्या एका जागेवर भाजपला यश मिळालं आहे. तसेच अजित पवार गटाचा सरपंच विजयी झाला आहे.
-
जळगावात ग्रामपंचायत निवडणुकीत पालकमंत्री गुलाबराव पाटील यांचे वर्चस्व
जळगावात ग्रामपंचायत निवडणुकीत पालकमंत्री गुलाबराव पाटील यांचे वर्चस्व राखण्यात यश आले असून, जळगाव ग्रामीण मतदारसंघात 32 पैकी 28 जागांवर शिंदे गटाची सत्ता आली आहे. तर पाळधी या पालकमंत्री गुलाबराव पाटील यांचे मूळगाव असलेल्या पाळधी गावच्या ग्रामपंचायतीवर गुलाबराव पाटील यांचे समर्थक विजय रूपसिंग पाटील सरपंच पदी विराजमान झाले आहेत.
-
भोरमध्ये काँग्रेस आमदार आमदार संग्राम थोपटे यांचं वर्चस्व कायम
भोरमध्ये 27 पैकी 14 ग्रामपंचायत बिनविरोध झाल्या होत्या तर 13 ग्राम पंचायतींसाठी ही निवडणूक पार पडली होती. भोरमध्ये काँग्रेस आमदार आमदार संग्राम थोपटे यांचं वर्चस्व कायम राहिले असून, एकूण 27 ग्रामपंचायतींच्या निकालात काँग्रेसला 22, राष्ट्रवादी अजित पवार गटाला 01, राष्ट्रवादी शरद पवार गटाला 02, शिवसेना ठाकरे गटाला एका जागेवर विजय मिळाला आहे.
-
आटपाडी तालुक्यातील 9 ग्रामपंचायतीवर भाजपची एकहाती सत्ता
आटपाडी तालुक्यातील 9 ग्रामपंचायतीवर आमदार गोपीचंद पडळकर म्हणजेच भाजपची एकहाती सत्ता. तालुक्यातील करगणी, नेलकरंजी या मोठ्या ग्रामपंचायतवर भाजपाचा झेंडा याशिवाय करगणी, मानेवाडी, वाक्षेवाडी, कानकात्रेवाडी, चिंचाळे, आंबेवाडी, मिटकी, काळेवाडी या ग्रामपंचायतींवरदेखील भाजपचा विजय झाला आहे. तर, शिवसेनेचा विभुतवाडी, मासाळवाडी, निंबवडे, पिंपरी खुर्द तर, अमरसिंह देशमुख गटाने बनपुरी ग्रामपंचायतीवर विजय मिळवला आहे.
-
संगमनेरमधील आश्वी खुर्द ग्रामपंचायतीवर विखे पाटील गटाचा कब्जा
नगर जिल्ह्यातील 178 ग्रामपंचायतीसाठी आज मतमोजणी पार पडली. यातच जिल्ह्याचा राजकीय केंद्रबिंदू मानला जाणारा तालुका संगमनेरमधील आश्वी खुर्द ग्रामपंचायतीवर विखे पाटील गटाने सत्ता काबीज केली आहे. विखे पाटील यांच्या स्वीय सहाय्यकाच्या पत्नीचा विजय झाला आहे. तर दुसरीकडे राहाता तालुक्यातील वाकडी ग्रामपंचायतीत धक्कादायक निकाल लागला आहे. वाकडी ग्रामपंचायतीत सत्तांत्तर झाले असून विखे पाटील गटाला या ठिकाणी पराभवाला सामोरे जावे लागले आहे. भाजपचे विवेक कोल्हे गटाचा विजय झाला असून सरपंचपदी रोहिणी बाळासाहेब आहेर यांचा विजय झाला आहे.
-
बारामती ग्रामपंचायतींवर अजित पवार गटाचं वर्चस्व
राष्ट्रवादीचे अध्यक्ष शरद पवार यांचे मुळगाव असलेल्या काटेवाडी ग्रामपंचायतीच्या निकालाकडे आज सर्व राज्याचे लक्ष लागल आहे. येथे 16 जागांसाठी मतदान पार पडलं असून काटेवाडी ग्रामपंचायत अजित पवारांना की शरद पवारांना कौल देते. याकडे सर्वांच्या नजरा लागल्या आहेत.
याआधी काटेवाडी गावात गेल्या अनेक वर्षापासून ग्रामपंचायतीवर राष्ट्रवादीची एकहाती सत्ता होती. मात्र, राष्ट्रवादी आणि शरद पवारांशी बंड करून भाजपची युती केलेल्या अजित पवार गटाचे वर्चस्व या निवडणुकीमध्ये दिसत असून तेरा जागांवर अजित पवार गटाने मुसंडी घेतली आहे
-
रावेरमध्ये रक्षा खडसेंकडून एकनाथ खडसे यांना धक्का
रावेरच्या खासदार रक्षा खडसे यांच्या रावेर येथे 13 पैकी सात ग्रामपंचायतीवर भाजाने वर्चस्व कायम ठेवत आहे. एक प्रकारे भाजपाच्या रावेर लोकसभेच्या खासदार रक्षा खडसे यांनी एकनाथ खडसेंनाच धक्का दिला आहे.
-
खासदार अमोल कोल्हे यांच्या नारायणगावात राष्ट्रवादी काँग्रेसचा पराभव
जुन्नर तालुक्यातील खासदार अमोल कोल्हे यांच्या नारायणगावात राष्ट्रवादी काँग्रेसचा पराभव झाला आहे. नारायणगाव ग्रामपंचयातीमध्ये उद्धव बाळासाहेब ठाकरे गटाने सत्ता कायम राखली असून, 17 पैकी 16 उमेदवार विजयी झाल्याने येथील ग्रामपंचायतीचे सरपंचपद ठाकरे गटाकडे कायम राहणार आहे.
-
शिरसगाव लौकी आणि लौकी शिरस ग्रामपंचायतीने राखली छगन भुजबळांनी प्रतिष्ठा
येवला तालुक्यातील शिरसगाव लौकी आणि लौकी शिरस ग्रामपंचायतीवर अजित पवार गटाची सत्ता आली आहे. भुजबळ समर्थक सरपंच आणि सदस्य विजयी झाले आहेत. यामुळे ओबीसी नेते आणि मंत्री छगन भुजबळांनी प्रतिष्ठा राखण्यात यश आले आहे.
शिरसगाव लौकी ग्रामपंचायतीत ज्ञानेश्वर रामदास शेवाळे ८८२ मते मिळवून सरपंच पदी विजयी झाले आहेत.तर, सदस्य पदांच्या नऊचा नऊ जागेवर देखील राष्ट्रवादी अजित पवार गटाचे कार्यकर्ते विजयी झाले आहेत. लौकी शिरस ग्रामपंचायतीवर प्रदीप रमेश कानडे सरपंच पदी विजयी झाले आहेत. तर, सदस्य पदांच्या सात जागांपैकी पाच सदस्य अजित पवार गटाचे विजयी झाले आहेत.
-
सहकार मंत्री दिलीप वळसे पाटलांची निरगुडसर गावातील ४० वर्षांची सत्ता संपुष्टात!
महाराष्ट्र राज्याचे सहकार मंत्री दिलीप वळसे पाटील यांची निरगुडसर गावातील ४० वर्षांची सत्ता संपुष्टात आली आहे. येथे शिवसेनेचे रविंद्रशेठ वळसे पाटील विक्रमी मतांनी विजय झाले आहेत. वळसे पाटील यांचे गाव असलेल्या निरगुडसर ग्रामपंचायतीचे सरपंचपद शिंदे गटाकडे.. ग्रामपंचायत स्थापनेपासून असलेली सत्ता वळसे पाटील गटाकडून प्रथमच गेली आहे.
वळसे पाटलांच गाव हे काँग्रेसनंतर राष्ट्रवादीचा गड होता. मात्र, रविवारी झालेल्या ग्रामपंचायतीच्या मतमोजणीत वळसे पाटील यांना गावातचं पहिल्यांदाच धक्का बसला आहे.वळसे पाटलांच्या बालेकिल्ल्यात शिंदे गटाने झेंडा फडकावला.. शिंदे गटाचे रवींद्र जनार्दन वळसे यांनी तब्बल १३५ मतांनी सरपंचपदाच्या निवडणुकीत बाजी मारली आहे. राष्ट्रवादी काँग्रेस सोडून अजित पवारांसोबत महायुतीत सहभाग झाल्यानंतर वळसे पाटलांना पहिल्याच निवडणुकीत धक्का बसला आहे.
-
अरणगाव ग्रामपंचायतीवर निलेश लंकेचे पॅनल विजयी
आमदार लंके यांच्या गटाचे पुंड विजयी नगर तालुक्यातील संवेदनशील मानल्या जाणाऱ्या अरणगाव ग्रामपंचायतीत आमदार निलेश लंके यांच्या नेतृत्वाखालील पॅनल विजयी झाला आहे. सरपंच पदी पोपट पुंड विजयी झाले आहे.
-
संगमनेर तालुक्यातील गुंजाळवाडी ग्रामपंचायतीवर बाळासाहेब थोरात गटाची सत्ता
संगमनेर तालुक्यातील गुंजाळवाडी ग्रामपंचायतीवर काँग्रेस नेते बाळासाहेब थोरात यांच्या गटाने सत्ता काबीज केली आहे. नरेंद्र उर्फ अमोल गुंजाळ हे सरपंचपदी विजयी झाले आहेत. तर विखेपाटील गटाचा पराभव झाला आहे.
-
राम शिंदेंचा रोहित पवारानां दे धक्का! कर्जतमध्ये एकहाती विजय तर जामखेडमध्ये...
कर्जतमध्ये सहा तर जामखेडमध्ये तीन अशा नऊ ग्रामपंचायतीसाठी निवडणुका झाल्या. यामध्ये कर्जतमध्ये आमदार रोहित पवार यांना मोठा धक्का बसला आहे. कर्जतमध्ये भाजपला सहा जागांवर विजय मिळाला असून कर्जतमध्ये भाजपच्या राम शिंदे यांचे वर्चस्व दिसून आल्याचे दिसते आहे.
जामखेडमध्ये तीन जागांसाठी झालेल्या निवडणुकीत राष्ट्रवादीला दोन जागांवर विजय मिळाला तर भाजपला एका जागांवर विजय मिळाला आहे. दरम्यान कर्जत जामखेड यांच्या नऊ ग्रामपंचायत निवडणुकीत भाजपला मोठे यश मिळाले आहे.
आगामी निवडणूक पाहता रोहित पवारसांठी हा मोठा धक्का मानला जातो आहे. तर राम शिंदे यांनी आगामी निवडणुकांपूर्वी आपले राजकीय वजन पुन्हा एकदा सिद्ध केले आहे.
जामखेड - 3
राष्ट्रवादी शरद पवार गट - 2
भाजप -01कर्जत -06
राष्ट्रवादी (आमदार रोहित पवार गट) - 0