भारताला तोडण्याचा मोठा कट; मोहन भागवतांचा रोख नेमका कुणाकडे ?
![भारताला तोडण्याचा मोठा कट; मोहन भागवतांचा रोख नेमका कुणाकडे ? भारताला तोडण्याचा मोठा कट; मोहन भागवतांचा रोख नेमका कुणाकडे ?](https://dvmep2zap7gv4.cloudfront.net/wp-content/uploads/2023/02/important-update-regarding-Shreyas-Iyer-fitness-has-come-out-8.jpg)
RSS Chief Mohan Bhagwat : राष्ट्रीय स्वयंसेवक संघाचे सरसंघचालक मोहन भागवत (Mohan Bhagwat) यांनी देशात सध्या सुरू असलेल्या एका कटाचा उल्लेख केला. भागवत म्हणाले, भारत पुढे चालला आहे मात्र असुरी शक्तींना ते काही पसंत पडलेले नाही. भारताला तोडण्याचे त्यांचे प्रयत्न आहेत. भागवत यांनी कुणाचेही नाव न घेता हे वक्तव्य केले त्यामुळे त्यांचा रोख नेमका कुणाकडे होता, याबाबत अनेक तर्क व्यक्त केले जात आहेत.
नागपूर येथे भगवान जगन्नाथ पुरी दर्शनानंतर आयोजित समारोहात त्यांनी हे वक्तव्य केले. ते पुढे म्हणाले, भारतातील सर्वच लोक पुढे चालले आहेत. मात्र काही दानवी शक्तींना याचा त्रास होत आहे. हे लोक वेगवेगळे मुद्दे उपस्थित करून भांडणे लावण्याचे काम करत आहेत. यासाठी त्यांच्याकडे विविध प्रकारचे प्लॅन तयार आहेत.
‘भारताच्या चौक्यांवर चीनचा कब्जा, मोदी सरकार उत्तर देणार का? राऊतांचा सवाल
भारतातील नागरिक जोपर्यंत मिळून मिसळून राहतील तोपर्यंत जगातील कोणतीही शक्ती भारताचा पराभव करू शकत नाही. त्यामुळेच या शक्तींचे भारताला तोडण्याचे प्रयत्न आहेत. लोकांना सांगितले जाते की तुम्ही वेगळे आहात. तुम्हाला हे मिळत नाही तुम्हाला ते मिळत नाही असे सांगून समाजाला तोडण्याचे प्रयत्न केल जात आहेत. हे सगळे प्रकार देशाच्या बाहेरून होत आहेत. मात्र असे असताना आपले दुर्भाग्यच म्हणावे लागेल की त्यांना काही लोक देशातही मिळतात. या लोकांपासून सावध राहून आपल्याला पुढे जायचे आहे, असे भागवत म्हणाले.
दरम्यान, मोहन भागवत यांनी याच महिन्यात देशातील नागरिकांना एकजुटीने राहण्याचे आवाहन केले होते. सीमारेषेवर शत्रूविरोधात आपली शक्ती प्रदर्शन करण्याऐवजी आपण आपसातच लढत आहोत. देशाची अखंडता टिकवून ठेवण्यासाठी प्रत्येकाला प्रयत्न करण्याची गरज आहे.