हर्षवर्धन जाधव पुन्हा विवाहबद्ध; दोन महिन्यांपूर्वी विषय संपलेल्या ‘ईशा झा’ सोबतच बांधली लग्नगाठ

हर्षवर्धन जाधव पुन्हा विवाहबद्ध; दोन महिन्यांपूर्वी विषय संपलेल्या ‘ईशा झा’ सोबतच बांधली लग्नगाठ

छत्रपती संभाजीनगर : कन्नड-सोयगाव मतदारसंघाचे माजी आमदार आणि भारत राष्ट्र समितीचे (BRS) नेते हर्षवर्धन जाधव (Harshvardhan Jadhav) दुसऱ्यांदा विवाहबद्ध झाले आहेत. त्यांच्या जोडीदार ईशा झा यांच्याशी त्यांनी नुकतीच लग्नगाठ बांधली. या विवाहाचे फोटो त्यांनी सोशल मिडीयावर शेअर केले आहेत. मागील दोन वर्षांपासून हर्षवर्धन जाधव आणि ईशा झा एकत्र आहेत. आता त्यांनी या नात्याला लग्नाचे नाव दिले आहे. दरम्यान, दोन महिन्यांपूर्वीच जाधव यांनी ईशा झा यांचा विषय आपल्यासाठी संपला असल्याचे जाहीर केले होते. त्यानंतर आता अवघ्या दोन महिन्यातच ते विवाहबद्ध झाले आहेत. (Former MLA Harshvardhan Jadhav got married for the second time)

काय म्हणाले होते हर्षवर्धन जाधव?

जाधव म्हणाले होते, ईशा झा यांना मी माझा साथीदार म्हणून घोषित केलं होतं. मात्र सातत्याने आमचं यमक अजिबातच जुळत नाही असं जाणवलं. त्यामुळे माझ्यासाठी ईशा झा हा विषय संपला असं जाहीर करतो. एकदिवशी तर त्यांचा एक व्हिडीओ आला आणि महाराष्ट्रभर व्हायरल झाला. मला अत्यंत वाईट वाटले. माझी मनस्थिती खराब झाली. मीही काही ठिकाणी काही बडबड केली. पण मी स्वतःला सावरत हा गाडा सुरळीत करण्याचा प्रयत्न सुरू केला. तर माला जेव्हा हार्ट अॅटॅक आला जेव्हा माझं दिल्लीत कोणी नव्हतं. त्यामुळे मी त्यांच्या भावाला फोन केल. त्यांना ती चेष्ट वाटली. दिल्ली पोलिसांचा फोनही त्यांना खोटा वाटला, असा आरोप त्यांनी केला होता.

हर्षवर्धन जाधव कोण आहेत?

हर्षवर्धन जाधव हे छत्रपती संभाजीनगरमधील कन्नडचे माजी आमदार आहेत. माजी आमदार आणि वडील रायभान जाधव यांच्या अकाली निधनानंतर त्यांनी राजकारणात प्रवेश केला. 1999 साली ते जिल्हा परिषद सदस्य म्हणून निवडून आले.  त्याच दरम्यान ते कन्नड सहकारी साखर कारखान्याचे चेअरमन म्हणूनही निवडून आले होते. पुढे 2004 साली त्यांनी कन्नड विधानसभा मतदारसंघातून अपक्ष विधानसभा निवडणूक लढवली, पण त्यांना पराभव स्वीकारावा लागला.

याच काळात राज ठाकरे यांनी आपल्या नव्या पक्षाची महाराष्ट्र नवनिर्माण सेनेची स्थापना केली होती. हर्षवर्धन जाधव यांनी मनसेत प्रवेश केला आणि 2009 ची विधानसभा त्यांनी मनसेच्या तिकिटावर लढवली आणि ते निवडूनही आले. पण 2011 साली मुख्यमंत्री पृथ्वीराज चव्हाण यांच्या ताफ्यात गाडी घुसवल्यानंतर त्यांना पोलिसांनी मारहाण केली. त्यावरून मोठा वाद झाला होता.

‘अन्’ चिडलेल्या अजितदादांनी नकाशा फेकला… : माजी IPS मीरा बोरवणकर यांचे गंभीर आरोप

पोलिसांनी मारहाण केल्याचा प्रकरणात पक्षप्रमुख राज ठाकरे यांनी सहकार्य केले नाही, त्यामुळे नाराज होऊन त्यांनी मनसेला राम राम ठोकला आणि शिवसेनेमध्ये प्रवेश केला. जाधव यांनी 2014 ची विधानसभा शिवसेनेच्या तिकिटावर लढवली. ते आमदार म्हणून निवडून आले. पण स्थानिक राजकारण चंद्रकांत खैरे यांच्या हातात होत, त्यांच्याशी त्यांचे खटके उडू लागले. यातूनच वाद निर्माण होऊ लागले. त्यातच या काळात राज्यभर मराठा आरक्षणाचे आंदोलन सुरु झाले होते. जाधव यांनी आपल्या आमदारकीचा राजीनामा देत नव्या पक्षाची स्थापना केली.

शिवसेनेची साथ सोडल्यानंतर त्यांनी स्वत:चा शिवस्वराज्य बहुजन पक्ष स्थापन केला होता. 2019 च्या लोकसभा निवडणुकीत ते अपक्ष म्हणून रिंगणात उतरले होते. मात्र निवडणुकीत त्यांचा पराभव झाला पण त्याच्या उमेदवारीमुळे शिवसेनेचे उमेदवार चंद्रकांत खैरे यांना पराभव स्वीकारावा लागला. त्यानंतरची विधानसभा त्यांनी शिवस्वराज्य बहुजन पक्षाच्या तिकिटावर लढवली. पण त्यांना तिथेही पराभव स्वीकारावा लागला.

शहीद अग्निवीरच्या ‘गार्ड ऑफ ऑनर’चा वाद चिघळला; सैन्याचं स्पष्टीकरण पण, CM मान जाब विचारणारच

2019 साली आधी लोकसभा आणि नंतर विधानसभा असे सलग दोन पराभव जाधव याना स्वीकारावे लागले. त्यानंतर पुन्हा त्यांनी मनसेमध्ये प्रवेश केला. त्यांची जिल्हाध्यक्ष पदी नियुक्ती करण्यात आली. पण तिथेही त्यांनी जास्त काळ काम केलं नाही. काही दिवसातच त्यांनी आपल्या सोशल मीडियावर एक व्हिडीओ पब्लिश करून राजकीय संन्यास घेणार असल्याची घोषणा केली आणि आपल्या पत्नीला राजकीय वारसदार म्हणून घोषित केलं.

पण त्यानंतर जाधव यांनी त्यांच्या तेव्हाच्या पत्नी संजना जाधव आणि सासरे रावसाहेब दानवे यांच्यावर आरोप केले. त्यानंतर त्यांनी घटस्फोटासाठीही अर्ज केला. त्यानंतर जाधव यांनी राजकीय संन्यासाचा निर्णय गुंडाळून ठेवत तेलंगणाचे मुख्यमंत्री केसीआर यांच्या बीआरएस पक्षात प्रवेश केला आहे. सध्या ते याच पक्षात आहेत. ते आता 2024 च्या विधानसभा निवडणुकीसाठी कन्नडमधून निवडणूक लढविणार असल्याचे सांगितले जात आहे.

Tags

follow us
  • fb
  • instagram
  • youtube