जयंत पाटलांचे शिंदे-फडणवीसांना खरमरीत पत्र; ‘त्या’ आठ घटनांचा केला उल्लेख

जयंत पाटलांचे शिंदे-फडणवीसांना खरमरीत पत्र; ‘त्या’ आठ घटनांचा केला उल्लेख

Jayant Patil On Ekanth Shinde and Devendra Fadanvis :  राष्ट्रवादी काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष जयंत पाटील यांनी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे आणि उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांना एक पत्र लिहले आहे. या पत्रातून त्यांनी राज्यातील परिस्थितीवर भाष्य केले आहे. महाराष्ट्रासारख्या पुरोगामी विचारांच्या राज्यात दंगली, दगडफेक, महिलांवर अत्याचार असे प्रकार वारंवार घडत आहेत. त्यामुळे पोलीस आणि गुप्तहेर खातं नक्की काय करतंय असा प्रश्न सामान्यांना पडल्याचा उल्लेख पत्रात करण्यात आला आहे.

जयंत पाटील यांनी पत्रात काय म्हटले आहे?

नुकतीच कोल्हापूर येथे समाजमाध्यमातील आक्षेपार्ह छायाचित्रावरून झालेला गोंधळ, जळगाव पाळधी येथील ३१ मार्च रोजीचा प्रकार, छत्रपती संभाजी नगर येथील राम नवमी मिरवणुकीवर झालेली दगडफेक, मुंबई (मालाड मालवणी) येथे रामनवमी मिरवणूक वेळी झालेला वाद, नगर शेवगाव येथे १४ मे रोजी छत्रपती संभाजी महाराज जयंती निमित्त निघालेल्या मिरवणुकीतील वाद, त्र्यंबकेश्वर येथे मंदिरासमोरील संदल प्रथेवरून वाद, संगमनेर येथील लव्ह जिहाद विरुद्ध निघालेल्या मोर्च्यानंतर समनापूर गावात झालेली दगडफेक या अलीकडील काळात घडलेल्या घटना पाहता यामागे विशिष्ट विचार धारेचे लोक कार्यरत असल्याचे लक्षात येत आहे.

राष्ट्रवादीसाठी संजय राऊतांची काय किंमत? प्रफुल्ल पटेलांनी स्पष्टच सांगितलं

यामागे महाराष्ट्रातील सामाजिक सलोखा बिघडविण्याचे काम जाणीवपूर्वक करण्याचा डाव असल्याचे निदर्शनास येत आहे. महाराष्ट्रासारख्या पुरोगामी विचारांच्या राज्यात असे प्रकार वारंवार घडत असताना राज्यातील पोलीस व गुप्तहेर खाते नक्की काय कारवाई करीत आहे, असा प्रश्न सामान्य लोकांच्या मनात निर्माण झाला आहे. महाराष्ट्रात कायदा व सुव्यवस्था अडचणीत आणून विविध समाजामध्ये द्वेष निर्माण करून आपली राजकीय पोळी भाजण्याचा प्रकार काही शक्ती करीत असताना त्यांच्यावर कारवाई न होणे ही बाब शासनाला निश्चितच भूषनावह नाही.

अयोध्या पोळ यांच्यावरील हल्ला नियोजित षडयंत्र, केदार दिघेंचा शिंदे गटावर आरोप

त्याचप्रमाणे मुंबई,चर्चगेट परिसरातील सावित्रीबाई फुले शासकीय वसतीगृहात घडलेली विद्यार्थिनीच्या हत्येची घटना दुर्दैवी आहे. राज्यात महिलांना सुरक्षित वाटले पाहिजे. महिलांवरील अत्याचार व त्यांचे गायब होण्याचे प्रमाण अलीकडील काळात मोठ्या प्रमाणात वाढले आहेत. या घटनांची सखोल चौकशी करून दोषींवर कडक कायदेशीर कारवाई करून सामान्य जनतेचे रक्षण करण्यात हे सरकार कटिबद्ध असल्याचे दाखवून द्यावे. अन्यथा फक्त ४० आमदारांच्या रक्षणासाठी हे सरकार कारभार करीत असल्याची सामान्य जनतेच्या मनातील भावनेस खतपाणी मिळेल. आपण ह्या घडत असलेल्या प्रकारांची गांभीर्याने दखल घेऊन तात्काळ कडक कारवाई करण्याचे निदेश संबंधितांना द्याल, अशी मला आशा आहे.

Tags

follow us
  • fb
  • instagram
  • youtube