राज्यात लवकरच धर्मांतरविरोधी कायदा; कॉंग्रेस, ठाकरेंवर नितेश राणेंचा हल्लाबोल

राज्यात लवकरच धर्मांतरविरोधी कायदा; कॉंग्रेस, ठाकरेंवर नितेश राणेंचा हल्लाबोल

Nitesh Rane : सकल हिंदू समाजाच्या वतीने आज अहमदनगरमधील राहुरी येथे जनआक्रोश मोर्चाचे आयोजन करण्यात आले. गेल्या काही दिवसांपासून लव्ह जिहाद आणि धर्मांतराचा आरोप करत हिंदू संघटनांनी या मोर्चाचं आयोजन केलं. या मोर्चामध्ये भाजप आमदार नितेश राणे यांनी देखील सहभाग घेतला. या मोर्चाला नितेश राणे यांनी संबोधित केले. यावेळी राणे यांनी सांगितले की, लवकरच राज्यात धर्मांतरविरोधी कायदा येणार आहे, त्याचं 90 टक्के काम पूर्ण झालं आहे. हे काय पाकिस्तान आहे का? हे कॉंग्रेसचं राज्य आहे का? मुख्यमंत्री काय उद्धव ठाकरे आहेत का? असाही सवाल यावेळी नितेश राणे यांनी केला.(ahmednagar rahuri nitesh rane criticize on congress uddhav thackeray law against conversion )

‘भाजपमध्ये येण्यासाठी रांग पण, फडणवीसांनी नो रूम अॅव्हेलेबलचा बोर्ड लावलाय ‘

त्याचवेळी राणे म्हणाले की, राज्याचे मुख्यमंत्री कोण आहेत, गृहमंत्री कोण आहेत? नगरचे पालकमंत्री कोण आहेत माहित नाही का? असा सवाल पोलीस प्रशासनाला केला. ते म्हणाले की, माहित नसेल तर मी रोज सकाळी गुड मॉर्निंगच्या नावाने करतो तुम्हाला फोन असेही यावेळी नितेश राणे म्हणाले.

अंबादास दानवेंची खुर्ची धोक्यात; विधानपरिषदेच्या विरोधी पक्ष नेतेपदावरही काँग्रेसचा दावा

यावेळी आमदार नितेश राणे म्हणाले की, प्रत्येकाने आपला धर्म सांभाळावा. आणि आम्हाला हिंदू म्हणून देशामध्ये राज्यामध्ये, या राहुरीमध्ये जगू द्यावं एवढाच आमचा मुद्दा आहे. आम्ही तुम्हाला आडवे येत नाही पण आम्हाला जर तुम्ही आडवे आला तर दोन पायावर घरी जाणार नाही, असेही यावेळी ठणकावून सांगितले.

आम्ही कधीच पहिलं पाऊल टाकत नाही. आमचा कुठलाही सण आला तर प्रदुषणाचे नियम निघतात, दिवाळी आली तर एवढ्या वेळापर्यंतच फटाके वाजवा. सगळ्या नियमावली आमच्यासाठीच निघते. यांचे काही पहाटेचे भोंगे वाजतात. पाच-पाचवेळा ते भोंगे वाजतात. आम्ही आमची महाआरती, गणेशोत्सव कधी दुसऱ्यांना त्रास देण्यासाठी करतो का? असेही राणे म्हणाले.

राणे म्हणाले की, हिंदू राष्ट्राला सुरक्षित ठेवायचं काम आम्ही करत आहोत. हिंदू समाजाला सुरक्षित ठेवण्यासाठी जे-जे करायला लागेल ते कायदे सगळे येणार असल्याचेही राणे यांनी सांगितले. इथे जो राहतो, तो वंदे मातरम् म्हणतो.

अबू आझमीला हिंदू धर्मात यायचे असेल तर त्याचे स्वागत करु पण आमच्या देशात राहायचे असेल तर तुम्हाला वंदे मातरम् म्हणावेच लागणार असल्याचा नितेश राणे यांनी थेट दम दिला आहे.

Tags

follow us
  • fb
  • instagram
  • youtube