आशुतोष काळे जनतेविषयी प्रेम व जिव्हाळा असलेला लोकप्रतिनिधी; कृषीमंत्री दत्तामामा भरणेंचे गौरउद्गार
कर्मवीर शंकररावजी काळे यांच्या १३ व्या पुण्यस्मरणा निमित्त आयोजित करण्यात आलेल्या ‘कर्मवीर कृषी महोत्सव २०२५’ चे उद्घाटन
माझ्या कॉलेज जीवनापासून मला अहिल्यानगर जिल्ह्याबद्दल एक वेगळेच आकर्षण असून या (Nagar) जिल्ह्याचे वैशिष्ठ म्हणजे या जिल्ह्यातील मुलांमध्ये जेवढा विनम्रपणा आहे तेवढा विनम्रपणा कुठेही नाही. केंद्र शासनाच्या तसेच राज्याच्या योजना मतदार संघाला मिळाल्या पाहिजे. त्याचा लाभ सर्वसामान्य, गोरगरीब माणसाला झाला पाहिजे असं राज्याचे कृषी मंत्री दत्तात्रय भरणे यांनी व्यक्त केलं.
मागासवर्गीय असेल, अल्पसंख्यांक असेल अशा प्रत्येक समाजाला शासनाच्या विविध योजनांचा लाभ कसा मिळवून देता येईल याबाबतची तळमळ व जनतेविषयी अत्यंत प्रेम व जिव्हाळा असलेला लोकप्रतिनिधी आशुतोष काळेंच्या रूपाने तुम्हाला मिळाला असल्याचंही भरणे यावेळी म्हणाले. कोपरगाव तालुक्यातील कोळपेवाडी येथे माजी खासदार कर्मवीर शंकररावजी काळे यांच्या १३ व्या पुण्यस्मरणा निमित्त आयोजित करण्यात आलेल्या ‘कर्मवीर कृषी महोत्सव २०२५’ चे उद्घाटन कृषी मंत्री ना.दत्तात्रय भरणे यांच्या हस्ते करण्यात आले याप्रसंगी ते बोलत होते. २०१९ पासून मी आशुतोषच्या कामाची पद्धत पाहत आहे. एखाद्या कामासाठी चिकाटी किती असावी हे आशुतोषकडून शिकण्यासारखे आहे असंही ते म्हणाले.
मतदार संघाच्या एखाद्या कामाच्या बाबतीत त्या मंत्र्यांना तर तो भेटणारच परंतु त्याचबरोबर त्या मंत्र्याचा पी.एस.,पी.ए. यांनाही भेटणार, त्यानंतर संबंधित विभागाचा एसीएस, सेक्रेटरी दर्जाचा अधिकारी यांनाही भेटणार.तरी त्याचे समाधान झाले नाही तर, तो त्या अधिकाऱ्याच्या शेवटच्या अधिकाऱ्यालाही भेटून ते काम पूर्ण करून घेणारा आमदार जर कोणी असेल तर तो आशुतोष असून त्यामुळेच मतदार संघाच्या विकासासाठी तो एवढा मोठा निधी मिळवू शकला आहे.
कर्मवीर शंकररावजी काळे यांच्या पुण्यस्मरणानिमित्त तीन दिवस कर्मवीर कृषी महोत्सव अन् शेतकरी मेळावा
राज्याच्या व केंद्र सरकारच्या कोणत्या योजना आहेत. कोणती कामे कोणत्या योजनेत बसतील व त्यासाठी निधी उपलब्ध होतो त्या योजना जाहीर व्हायच्या अगोदरच आशुतोषच्या कामाची यादी तयार असते. उपमुख्यमंत्री अजीतदादा पवार साहेबांचा तो लाडका आमदार असून त्यांच्याकडे गेल्यानंतर त्यांच्या कानाला लागल्याशिवाय आणि ते काम करून घेतल्याशिवाय तो येतच नाही इतका हुशार आहे.आजपर्यंत एकाही नवीन आमदाराकडून जे काम शक्य नव्हतं ते त्याने २०१९ ला नवीन आमदार असतांना करून दाखवले.
मंत्री असो वा आमदार ज्या लोकांमुळे आपण मोठे आहोत, ज्यांनी आपल्याला आशीर्वाद दिले, संकटाच्या काळात, दुःखाच्या काळात, अडचणीमध्ये ज्या माणसांनी आपल्याला मदत केली त्या माणसांना मदत करणे, सहकार्य करणं हे त्या लोकप्रतिनिधीच कर्तव्य असतं. ते कर्तव्य आशुतोष चांगल्या प्रकारे पार पाडतोय. जनतेला कुठंतरी आपल्याबद्दल हा माझा माणूस आहे, हा आपला नेता आहे असं वाटलं पाहिजे असं काम आशुतोष करीत आहे.
या गोष्टींचा निश्चितपणे पक्षाला अभिमान असून कोपरगाव मतदार संघाचा तो सक्षम कुटुंब प्रमुख झाला आहे. त्यामुळे येणारा भविष्यकाळ आशुतोषसाठी खूप उज्वल असल्याचे कृषी मंत्री ना.दत्तात्रय भरणे यांनी यावेळी सांगितले. मतदार संघाच्या विकासाबाबत आशुतोष काळजी करू नको, उपमुख्यमंत्री अजीतदादांचा तू लाडका आमदार आहे मतदार संघाच्या विकासासाठी तुला जी काही मदत लागेल ती मिळेल. माझी वाशिमला तीन-चार जिल्ह्याची पक्षाची बैठक असतांना मला उपमुख्यमंत्री अजीतदादांनी फोन करून सांगितलं त्या पक्षाच्या मिटींगला तू आला नाही तरी चालेल पण आशुतोषच्या कार्यक्रमाला जा एवढं अजीतदादांचे आशुतोषवर प्रेम असंही ते म्हणाले.
