विकासासाठी शिवाजीराव कर्डिलेंची धडपड होती, त्यांचे स्वप्न पूर्ण करण्यासाठी ही निवडणूक- राधाकृष्ण विखे
विकसित भारताचे स्वप्न पूर्ण करण्यासाठी राज्याची भूमिका महत्वाची ठरणार आहे. महायुती सरकार घेत असलेले निर्णय महत्वाचे आहेत.
Rahuri Assembly by Election : नगर : राहुरी विधनासभा (Rahuri Legislative Assembly) मतदार संघाची निवडणूक स्व.शिवाजीराव कर्डिले (Shivajirao Kardile) यांच्या आठवणींना उजाळा देणारी आहे. जनता महायुतीच्या पाठीशी खंबीरपणे उभी असली तरी प्रत्येक कार्यकर्त्याने सकारात्मक दृष्टीकोन ठेवून मतदारापर्यंत पोहचविण्याची जबाबदारी घेण्याचे आवाहन जलसंपदा तथा पालक मंत्री डॉ. राधाकृष्ण विखे पाटील (Dr. Radhakrishna Vikhe Patil) यांनी केले. सोमवारी (ता.६) एप्रिल भाजपाचे प्रदेशाध्यक्ष आमदार रविंद्र चव्हाण यांच्या उपस्थितीत उमेदवारी अर्ज दाखल केला जाणार असल्याचे त्यांनी सांगितले.
विखे पाटील यांचा शेतकऱ्यांच्या वतीने सत्कार
राहुरी विधानसभा पोटनिवडणुकीच्या पार्श्वभूमीवर तालुक्यातील प्रमुख पदाधिकारी आणि कार्यकर्त्यांची बैठक मंत्री राधाकृष्ण विखे पाटील यांच्या उपस्थितीत संपन्न झाली. यावेळी आमदार मोनिका राजळे, उमेदवार अक्षय कर्डिले उपस्थित होते. साकळाई योजनेच्या कामाला एक हजार २३४ कोटी रुपयांचा निधी उपलब्ध करून दिल्याबद्दल मंत्री राधाकृष्ण विखे पाटील यांचा लाभक्षेत्रातील शेतकऱ्यांच्या वतीने सत्कार करण्यात आला.
मंत्री विखे पाटील म्हणाले की, राहुरी मतदारसंघाच्या विकासासाठी स्व.शिवाजीराव कर्डिले यांची धडपड होती. त्यांचे स्वप्न पूर्ण करण्याच्या दृष्टीने ही निवडणुक महत्वाची आहे. त्यामुळे गावात एकमेकांबद्दल हेवेदावे करण्यापेक्षा सकारात्मक दृष्टीकोन ठेवून आपल्याला निवडणुकीला सामोरे जायचे आहे. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या नेतृत्वाखाली देश सर्व क्षेत्रात प्रगती करीत आहे. जागतिक स्तरावर अस्थिरतेचे वातावरण आहे. कोरोना महामारीनंतर अशा वातावरणात सुध्दा देश यशस्वीपणे वाटचाल करतो हे प्रधानमंत्र्यांच्या धोरणाचे यश आहे. परंतू इंधन आणि गॅसच्या टंचाईवरून सरकारला बदनाम करण्यासाठी होणाऱ्या प्रयत्नांना कार्यकर्त्यांनी उत्तर देण्याचे मंत्री विखे पाटील यांनी सूचित केले.
सिंचन प्रकल्पांसाठी मोठा निधी उपलब्ध
विकसित भारताचे स्वप्न पूर्ण करण्यासाठी राज्याची भूमिका महत्वाची ठरणार असल्याने मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या नेतृत्वाखाली महायुती सरकार घेत असलेले निर्णय महत्वाचे आहेत. केंद्र आणि राज्य सरकारच्या योजनांची माहीती प्रचाराच्या दरम्यान मतदारापर्यंत घेवून जाण्याचे आवाहन त्यांनी केले. महायुती सरकारच्या माध्यमातून जिल्हयातील सिंचन प्रकल्पांसाठी मोठा निधी उपलब्ध होत आहे. वांबोरी चारी साकळाई योजनेचे स्व.शिवाजीराव कर्डिले यांचे स्वप्न पूर्ण करण्याच्या दृष्टीने झालेले निर्णय महत्वाचे आहेत. वर्षानुवर्ष दुष्काळ पाहीलेल्या भागाला पाणी देण्याचे काम मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या माध्यामातून होत आहे. भविष्यात राहुरी तालुक्यातील औद्योगिक विकासासाठी काम करून रोजगार निर्मिती करण्याच्या दृष्टीने होणाऱ्या निवडणूकीला सकारात्मकतेने सामोरे जाण्याचे आवाहन मंत्री विखे पाटील केले.
स्व. कर्डिले यांच्या कार्याचा उजाळा
आमदार मोनिका राजळे यांनी आपल्या भाषणात स्व. कर्डिले यांच्या कार्याचा उजाळा देवून प्रत्येकाने स्वत: अक्षय कर्डिले समजून निवडणुकीला सामोरे जाण्याचे आवाहन केले. तालुक्यातील दुष्काळी भागातील शेतकऱ्यांसाठी साकळाई योजनेचा झालेला निर्णय निवडणुकीसाठी शुभसंकेत असल्याचे सांगितले. यावेळी सुभाष पाटील दिलीप भालसिंग, अक्षय कर्डिले यांची भाषण झाले. जेष्ठ नेते सुभाष पाटील, भाजपाचे जिल्हाध्यक्ष दिलीप भालसिंग, सुरसिंग पवार, नामदेव ढोकणे, आरपीआयचे सुरेंद्र थोरात, काशिनाथ लवांडे यांच्यासह पदाधिकारी कार्यकर्ते उपस्थित होते.