एकनाथ शिंदे यांनाही आनंद दिघेंप्रमाणे संपवणारं होते; शिंदे गटाच्या नेत्याने केला खळबळजनक दावा

  • Written By: Published:
एकनाथ शिंदे यांनाही आनंद दिघेंप्रमाणे संपवणारं होते; शिंदे गटाच्या नेत्याने केला खळबळजनक दावा

Sanjay Shirsath : सिडको महामंडळाचे अध्यक्ष आणि शिंदे गटाचे नेते संजय शिरसाट यांनी खळबळजनक वक्तव्य केलं आहे. राज्याचे विद्यमान मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांचाही स्वर्गीय आनंद दिघे यांच्याप्रमाणे घात करण्याचा कट आखण्यात आला होता, असा मोठा आरोप शिरसाट यांनी केला आहे. ते छत्रपती संभाजीनगर येथे पत्रकार परिषदेत बोलत होते.

सुरक्षा नाकारली

महाविकास आघाडी सरकारच्या काळात एकनाथ शिंदे यांना नक्षलवाद्यांच्या माध्यमातून धमक्या दिल्या जात होत्या. त्यांना झेड प्लस सुरक्षा दिली पाहिजे, अशी शिफारस पोलिसांनी स्वत:हून केली होती. तरी त्या फाईलवर सही करण्यात आली नाही. याचा अर्थ एकनाथ शिंदे यांना शहीद करण्याच्या मार्गावर उभं करणं, असा होतो. एकनाथ शिंदे हे सर्व डावपेच ओळखून होते. या परिस्थितीमध्येही एकनाथ शिंदे हे खंबीर होते. एकनाथ शिंदे यांच्यासोबत दिघे पॅटर्न वापरला जाणार, अशी चर्चा त्यावेळी सुरु असल्याचंही शिरसाट यांनी म्हटलं आहे

“आनंद दिघे असते तर चाबकाने फोडले असते त्या प्रकारावर राऊतांचा संताप

आनंद दिघे यांची हत्या झाली होती असा आणखी एक गंभीर आरोप शिरसाठ यांनी पत्रकार परिषदेत बोलताना केला आहे. ठाण्यातील सर्वांना याची माहिती आहे. आनंद दिघे यांचा अपघात झाला होता. त्यांना कोणतीही गंभीर दुखापत झाली नव्हती. त्यांचा रक्तदाब आणि शुगर व्यवस्थित होती. अशावेळी त्यांना अचानक हृदयविकाराचा झटका कसा आला? असा सवाल शिरसाट यांनी उपस्थित केला. आनंद दिघे यांची वाढती ताकद काहींना खटकत होती. शिवसेनेत आनंद दिघे यांना मोठ्या पदावर आणून बसवले तर गोची होईल, हे ज्या नेत्यांच्या लक्षात आले होते, त्यांनीच आनंद दिघे यांचा काटा काढला असावा. आपल्यापेक्षा कोणीही मोठे होता कामा नये, ही रणनीती आखणारे लोक त्या पक्षात आहेत, असंही संजय शिरसाट यांनी म्हटलं आहे

जिल्हाध्यक्षपदाचा राजीनामा घेतला

आनंद दिघे तरुण पिढीला कळणे गरजेचे होते. पण त्यांच्या मृत्यूचे निवडणुकीच्या तोंडावर राजकारण नको, अशी प्रतिक्रिया शिंदे गटाचे ज्येष्ठ नेते रामदास कदम यांनी व्यक्त केली. आनंद दिघे हे बाळासाहेब यांना सदैव दैवत मानत, त्यांचे पाय धुवायचे. पण दिघेंच्या मृत्यूच्या काही दिवस आधी उद्धव ठाकरेंनी त्यांचा जिल्हाध्यक्षपदाचा राजीनामा घेतला होता, असा आरोप रामदास कदम यांनी केला. उद्धव ठाकरे यांना आपल्यापेक्षा कोणी मोठा होईल याची भीती वाटत होती. धर्मवीर आनंद दिघे लोकांपर्यंत पोहोचवण्यासाठी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांचे प्रयत्न कौतुकास्पद आहेत, असेही रामदास कदम यांनी म्हटलं आहे.

follow us
  • fb
  • instagram
  • youtube