आमच्या अधिकारांवर गदा येतीये काहीतरी मार्ग काढा; शिंदे गटाच्या मंत्र्यांनी सीएम फडणवीसांसमोरच…
![आमच्या अधिकारांवर गदा येतीये काहीतरी मार्ग काढा; शिंदे गटाच्या मंत्र्यांनी सीएम फडणवीसांसमोरच… आमच्या अधिकारांवर गदा येतीये काहीतरी मार्ग काढा; शिंदे गटाच्या मंत्र्यांनी सीएम फडणवीसांसमोरच…](https://images.letsupp.com/wp-content/uploads/2025/02/News-Photo-2025-02-12T081632.217_V_jpg--1280x720-4g.webp)
Shiv Sena Ministers Express Displeasure CM Fadnavis : मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्याकडे मंगळवारी मंत्रिमंडळ बैठकीत मंत्र्यांच्या अधिकारांवर गदा येत आहे अशी शिवसेना (शिंदे गट) मंत्र्यांनी तीव्र नाराजी व्यक्त केली आहे. (Fadnavis) उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदेही या वेळी उपस्थित होते. याखेरीज नाशिक तसंच, रायगडच्या पालकमंत्रीपदाचा वाद मिटलेला नाही. याबाबतच्या वार्षिक योजना मंजुरीच्या बैठकांना शिंदे गटाचे मंत्री गैरहजर राहिले होते.
एसटीच्या अध्यक्षपदाचा राजीनामा
मंत्रिमंडळाचे नियोजित मुद्द्यांचे कामकाज आटोपल्यावर अधिकारी बैठकीतून बाहेर पडल्यावर हा मुद्दा उपस्थित करण्यात आला. भरत गोगावले यांचा मंत्रिमंडळात समावेश झाल्यानंतर त्यांनी एसटीच्या अध्यक्षपदाचा राजीनामा दिला होता. या रिक्त पदाचा कार्यभार परिवहनमंत्री प्रताप सरनाईक यांच्याकडे न देता अतिरिक्त मुख्य सचिव संजय सेठी यांच्याकडे सोपविण्याचे आदेश सरनाईक यांना अंधारात ठेवून काढण्यात आले.
एकवेळ फडणवीस-ठाकरे एकत्र येतील; पण तटकरे-गोगावलेंचे सूर जुळणे अशक्य!
उद्योगमंत्री उदय सामंत यांच्यापुढे अनेक विषय न ठेवता परस्पर त्यास मंजुऱ्या देण्यात येत आहेत. सामंत यांनी यासंदर्भात उद्योग खात्याचे प्रधान सचिव आणि एमआयडीसीच्या मुख्य कार्यकारी अधिकाऱ्यांना पत्रही पाठविले असून सर्व महत्त्वाचे विषय मंजुरीसाठी आपल्यापुढे ठेवण्याच्या सूचना दिल्या आहेत. यासंदर्भातही मुख्यमंत्र्यांपुढे मंगळवारी मुद्दा उपस्थित करण्यात आला. प्रशासकीय अधिकाऱ्यांकडून मंत्र्यांच्या अधिकारांवर गदा येत असल्याने नाराजी व चिंता व्यक्त करण्यात आली.
पालकमंत्रीपदाच्या वाद
रायगड जिल्ह्याची वार्षिक योजना मंजूर करण्यासाठी उपमुख्यमंत्री तथा अर्थमंत्री अजित पवार यांनी आयोजित केलेल्या बैठकीला रोजगार हमीमंत्री भरत गोगावले हे अनुपस्थित असल्याने बैठक लांबणीवर टाकावी लागली. रायगड जिल्ह्यात राष्ट्रवादीच्या आदिती तटकरे आणि शिवसेनेचे भरत गोगावले असे दोन मंत्री आहेत. आदिती तटकरे बैठकीला उपस्थित होत्या. तर भरत गोगावले यांनी रायगडवरील किल्ले धारातीर्थ मोहिमेच्या सांगता कार्यक्रमामुळे उपस्थित राहू शकलो नाही असे सांगितले.