माझी नैतिक जबाबदारी असल्याने…, आझाद मैदानावरील घटनेवर सुप्रिया सुळेंची पहिली प्रतिक्रिया

Supriya Sule On Manoj Jarange Patil : मनोज जरांगे पाटील यांनी पुन्हा एकदा मराठा आरक्षणासाठी आंदोलन सुरु केले आहे. मुंबईतील आझाद मैदानात ओबीसीमधून (OBC) मराठा समाजाला आरक्षण द्या या मागणीसाठी मनोज जरांगे पाटील (Manoj Jarange Patil) आंदोनल करत आहे. या आंदोलनाला समर्थन देण्यासाठी सत्ताधारी आणि विरोधी पक्षातील अनेक आमदार, खासदार आझाद मैदानात (Azad Maidan) पोहचत आहे. रविवारी 31 ऑगस्ट रोजी राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्षाच्या (NCPSP) खासदार सुप्रिया सुळे (Supriya Sule) देखील आझाद मैदानात जरांगे पाटील यांची भेट घेण्यासाठी पोहचल्या होत्या मात्र यावेळी काही आंदोलकांनी त्यांच्या गाडीवर हल्ला करण्याचा प्रयत्न केला तसेच त्यांच्या विरोधात जोरदार घोषणाबाजी देखील केली. तर आता या सर्व प्रकरणात खासदार सुप्रिया सुळे यांनी पहिली प्रतिक्रिया दिली.
माध्यमांशी बोलताना मराठा आरक्षणावरुन सुप्रिया सुळे यांनी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस (Devendra Fadnavis) यांच्यावर जोरदार हल्लाबोल करत सर्व पक्षांना एकत्र बोलावून मराठा आरक्षणासंदर्भात सरकारने बैठक घ्यावी अशी मागणी केली आहे.
पुण्यात माध्यमांशी बोलताना खासदार सुप्रिया सुळे म्हणाल्या, आझाद मैदानात इतके मोठे आंदोलन सुरु आहे. त्यामुळे साहजिक काही घटना घडू शकतात. तरुण मुलांच्या मनात काही भावना असतात. माझी नैतिक जबाबदारी असल्याने मी काल जरांगे पाटील यांना भेटायला गेले त्यांच्या तब्येतीची चौकशी केली आणि थोडक्यात चर्चा देखील केली असं माध्यमांशी बोलताना खासदार सुप्रिया सुळे म्हणाल्या. तसेच आंदोलनास्थळी काही ठिकाणी वीज नाही, त्यामुळे आंदोलकांची गैरसोय होत आहे. असं देखील यावेळी खासदार सुप्रिया सुळे म्हणाल्या.
2018 मध्ये देवेंद्र फडणवीस यांनी आरक्षणाचा मार्ग सांगितला होता
तर यावेळी खासदार सुळे यांनी माध्यमांशी बोलताना आरक्षणावरुन राज्य सरकारवर देखील जोरदार हल्लाबोल केला. यावेळी खासदार सुप्रिया सुळे म्हणाल्या की, 2018 मध्ये देवेंद्र फडणवीस यांनी आरक्षणाचा जो मार्ग सांगितला होता त्याची अंमलबजावणी करा. सलग अकरा वर्ष भाजपचे सरकार असून देखील प्रश्न सुटलेला नाही. आज ज्या पक्षाकडे सर्वात जास्त आमदार- खासदार जास्त आहे त्यांच्याकडूनच अपेक्षा आहे. असं म्हणत त्यांनी सर्व पक्षांना एकत्र बोलावून मराठा आरक्षणासंदर्भात सरकारने बैठक घ्यावी अशी मागणी केली आहे.
आंदोलनाला रसद पुरवणाऱ्यांची यादी तातडीने जाहीर करा, गृहखात्याला माहिती आहे तर आम्हाला पण कळू द्या. गृहखाते नाही तर सरकार फेल ठरले आहे,जबाबदारी सगळी घ्यायची असते. कायदा सुव्यवस्था सरकार करत आहे का असं देखील सुप्रिया सुळे म्हणाल्या.