माघार घेतल्यानंतरही वाढलं कुतूहल; तनपुरेंचा पुढील राजकीय निर्णय 20 एप्रिलच्या मेळाव्यात होणार जाहीर
सर्व चर्चांवर पूर्णविराम देत तनपुरे यांनी स्पष्ट केलं की 20 एप्रिल रोजीच ते आपली अंतिम भूमिका जाहीर करणार आहेत.
Tanpure’s next political decision is April 20th : राहुरी पोटनिवडणुकीच्या पार्श्वभूमीवर राजकीय वातावरण तापलेलं असतानाच, तनपुरे यांनी घेतलेल्या भूमिकेमुळे आता चर्चांना आणखी वेग आला आहे. मात्र, या सर्व चर्चांवर पूर्णविराम देत तनपुरे यांनी स्पष्ट केलं की 20 एप्रिल रोजीच ते आपली अंतिम भूमिका जाहीर करणार आहेत, आणि तोपर्यंत कोणत्याही तर्क-वितरकांना अर्थ नाही. तनपुरेंनी सांगितलं की, त्यांनी आपली प्राथमिक भूमिका यापूर्वीच 6 तारखेला स्पष्ट केली होती आणि त्याच भूमिकेवर ते आज देखील ठाम आहेत. बेरोजगारी, जमीन हस्तांतरण आणि स्थानिक विकास यांसारख्या महत्वाच्या प्रश्नांवर सत्ताधारी पक्षांसोबत सकारात्मक चर्चा झाल्याचं त्यांनी नमूद केलं.
मात्र, अंतिम निर्णय घेताना केवळ पक्षहिय राजकारण न पाहता स्थानिक प्रश्न आणि जनतेच्या हिताला प्राधान्य दिलं जाणार असल्याचं त्यांनी ठामपणे सांगितलं. या सगळ्या घडामोडींमध्ये सर्वात महत्वाची बाब म्हणजे 20 एप्रिलला होणार कार्यकर्त्यांचा मेळावा. याच मेळाव्यात तनपुरे आपली पुढील राजकीय दिशा स्पष्ट करणार आहेत. माझा ओढा माझया पक्षाकडेच असेल, पण अंतिम निर्णय कार्यकर्त्यांशी चर्चा करूनच घेतला जाईल, असं त्यांनी स्पष्ट केलं. त्यामुळे या मेळाव्याकडे आता संपूर्ण जिल्ह्याचं लक्ष लागलं आहे.
दरम्यान, भाजपच्या नेत्यांनी आपल्या मंचावर तनपुरेंच नाव घेतल्याबद्दल त्यांनी आभार मानत, त्याला मोठेपणाचं उदाहरण म्हटलं. तसेच राष्ट्रवादीच्या नेत्यांनीही त्यांची भेट घेतल्याचं त्यांनी सांगितलं, ज्यामुळे त्यांच्या निर्णयाभोवती राजकीय हालचाली वाढल्याचं दिसून येत आहे. तनपुरेंनी सोशल मीडियावर चालणाऱ्या चर्चांनाही फेटाळल. व्हाट्सअँप युनिव्हर्सिटीमधल्या चर्चांना काही अर्थ नाही, असं स्पष्टपणे सांगत त्यांनी अफवांपासून दूर राहण्याचं आवाहन केलं. पुढचं काहीही बोलणं सध्या योग्य नसून, सर्व प्रश्नांची उत्तरे 20 तारखेलाच मिळतील, असं त्यांनी ठामपणे सांगितलं.
त्यांच्या या निर्णयामागे भावनिक आणि सामंजस्याची पार्श्वभूमी देखील असल्याचं त्यांनी नमूद केलं. दिवंगत आमदार शिवाजीराव कर्डीले यांच्या निधनानंतरची परिस्थिती आणि महायुतीकडून अक्षय कर्डीले यांना दिलेली उमेदवारी, या दोन्ही गोष्टी लक्षात घेता त्यांनी माघार घेतल्याचं स्पष्ट केलं. ही माघार वैयक्तिक किंवा राजकीय दबावामुळे नसून, परिस्थितीचा विचार करून घेतलेला निर्णय असल्याचं त्यांनी सांगितलं. तसंच, निवडणूक लादल्यास मतदारसंघातील विकासकामांना अडथळा निर्माण होईल, अशी देखील भीती त्यांनी व्यक्त केली.
त्यामुळे सध्या थांबण्याची भूमिका घेतल्याचं त्यांनी स्पष्ट केलं आहे. एकूणच, तनपुरेंच्या भूमिकेमुळे राहुरी पोटनिवडणुकीत नवीन समीकरणं तयार होण्याची शक्यता निर्माण झाली आहे. मात्र, या सर्व राजकीय घडामोडींवर अंतिम शिक्कामोर्तब 20 एप्रिलच्या कार्यकर्त्यांच्या मेळाव्यातच होणार आहे. त्यामुळे आता सर्वांचेच लक्ष त्या एका तारखेकडे लागले आहे, जिथे तनपुरे आपल्या पुढील राजकीय वाटचालीचा मोठा निर्णय जाहीर करणार आहेत.