यंदा वाद नाही, थेट परवानगी! 20 ऑक्टोबरला शिवाजी पार्कवरच होणार ठाकरेंचा दसरा मेळावा
20 ऑक्टोबर रोजी होणाऱ्या या मेळाव्यासाठी मुंबई महापालिकेने परवानगी दिली असून त्यामुळे ठाकरे गटाच्या दसरा मेळाव्याच मार्ग मोकळा झाला आहे.
Thackeray’s Dussehra rally to be held at Shivaji Park itself : उद्धव बाळासाहेब ठाकरेंच्या शिवसेनेचा पारंपरिक दसरा मेळावा यंदा देखील दादर येथील ऐतिहासिक शिवाजी पार्कवर होणार आहे. 20 ऑक्टोबर रोजी होणाऱ्या या मेळाव्यासाठी मुंबई महापालिकेने परवानगी दिली असून त्यामुळे ठाकरे गटाच्या दसरा मेळाव्याच मार्ग मोकळा झाला आहे. महापालिकेच्या जी-ऊत्तर विभागाने ही परवानगी दिली असून आता पक्षाकडून मेळाव्याच्य तयारीला सुरूवात केली जाणार आहे.
शिवसेनेच्या स्थापनेपासून शिवाजी पार्कवर दसरा मेळावा घेण्याची प्रदीर्घ परंपरा आहे. त्यामुळे या मेळाव्याला राजकीयदृष्ट्या देखील विशेष महत्व आहे. यंदाच्या दसरा मेळाव्यासाठी शिवसेना उबाठाणे सुमारे दोन महिन्यांपूर्वीच महापालिकेच्या जी-उत्तर विभागाकडे रीतसर अर्ज दाखल केला होता. विशेष म्हणजे, यंदा शिवाजी पार्क मैदानासाठी ठाकरे गटाव्यतिरिक्त अन्य कोणत्याही राजकीय पक्षाने किंवा संघटनेने अर्ज केलेला नाही. मैदानासाठी अन्य कोणताही दावा समोर न आल्याने प्रशासकीय नियमांनुसार महापालिकेने ठाकरे गटाला मेळाव्यासाठी परवानगी दिली आहे.
मोदी-जिनपिंग यांची ऐतिहासिक भेट; सात वर्षांनंतर भारत-चीन संबंधांत नवे पर्व, ‘या’ 7 मुद्द्यांवर शिक्कामोर्तब
शिवसेनेत फूट पडल्यानंतर गेल्या काही वर्षांत शिवाजी पार्कवरील दसरा मेळाव्यावरून मोठा राजकीय संघर्ष पाहायला मिळाला होता. शिवसेनेच्या दोन्ही गटांकडून या ऐतिहासिक मैदानावर दावा करण्यात आल्याने परवानगीचा वाद न्यायालयापर्यंत पोहोचला होता. त्यातच काही अन्य संघटनांकडूनही मैदानासाठी अर्ज करण्यात आल्याने राजकीय वातावरण चांगलेच तापले होते. मात्र, यंदा मैदानासाठी कोणताही प्रतिस्पर्धी अर्ज नसल्याने राजकीय संघर्ष किंवा कायदेशीर वादाविना ठाकरे गटाला थेट परवानगी मिळाली आहे.
महापालिकेच्या मंजुरीनंतर आता 20 ऑक्टोबर रोजी शिवाजी पार्कवर ठाकरे गटाचा दसरा मेळावा होणार असल्याचे स्पष्ट झाले आहे. त्यामुळे आगामी काळात मेळाव्याच्या तयारीला वेग येणार असून, या मेळाव्यात पक्षप्रमुख उद्धव ठाकरे राज्यातील राजकीय घडामोडींवर काय भूमिका मांडतात आणि कार्यकर्त्यांना कोणता संदेश देतात, याकडे राज्याच्या राजकीय वर्तुळाचे लक्ष लागले आहे.