निकाल लांबणीवर टाकण्याच्या न्यायालयाचा निर्देश; उद्धव ठाकरेंची एका वाक्यात प्रतिक्रिया
नागपूर खंडपीठाने नगरपालिका आणि नगरपरिषदेचे सर्व निकाल 21 डिसेंबरपर्यंत जाहीर करु नका, असे निर्देश दिले आहेत.
महाराष्ट्रातील २४६ नगरपालिका आणि ४२ नगरपंचायतींच्या निवडणुकीसाठी मतदान होत आहे. (Electon) या मतदानाचा निकाल उद्या ३ डिसेंबर रोजी जाहीर केला जाणार होता. परंतु, आता हा निकाल लांबणीवर पडला आहे. मुंबई उच्च न्यायालयाच्या नागपूर खंडपीठाने नगरपालिका आणि नगरपरिषदेचे सर्व निकाल 21 डिसेंबरपर्यंत जाहीर करु नका, असे निर्देश दिले आहेत. यावर माजी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी प्रतिक्रिया दिली आहे.
राज्यात एकीकडे निवडणुकीची धामधूम सुरु असताना दुसरीकडे शिवसेना ठाकरे गटात पक्षप्रवेशाचा कार्यक्रम पार पडला. यावेळी त्यांनी पत्रकारांशी संवाद साधला. यावेळी त्यांना निवडणुकांचे निकाल २१ डिसेंबरला जाहीर केला जाणार असल्याबद्दल विचारणा करण्यात आली. त्यावर त्यांनी एका वाक्यात प्रतिक्रिया दिली. निवडणूक आयोग आणि न्यायालय यावर न बोलेलंच चांगलं, असा खोचक टोला उद्धव ठाकरे यांनी लगावला.
सर्वात मोठी बातमी, सर्व नगरपरिषद आणि नगरपंचायतीसाठी मतमोजणी 21 डिसेंबरला
दरम्यान, अनेक कार्यकर्त्यांनी उद्धव बाळासाहेब ठाकरे गटामध्ये प्रवेश केला आहे. उद्धव ठाकरेंच्या हस्ते शिवबंधन बांधून या कार्यकर्त्यांच्या पक्षप्रवेशाचे स्वागत करण्यात आलं. यावेळी उद्धव ठाकरे म्हणाले पक्षात परत येणाऱ्यांचे स्वागत आहे असं म्हणत समाधान व्यक्त केलं आहे. गेल्या काही महिन्यांपासून पक्षप्रवेश सुरू आहे. धुळफेक केलेली आणि कट्टर शिवसैनिक हे परत येतात, असे उद्धव ठाकरे म्हणाले.
ठाणे शिवसेनेचा बालेकिल्ला आहे. हा बालेकिल्ला अबाधित राखण्याचे काम तुम्हाला करायचं आहे. भगव्यावर कोणतही चित्र छापू नका, तो शिवरायांचा आहे, तो पवित्र आहे, तो तसाच फडकला पाहिजे. मशाल घेऊन पुढे चला, मशालीच्या तेजाने सर्व जळमट जळून खाक होईल. इतरांनी जे केले ते तुम्ही करू नका, असंही उद्धव ठाकरे यावेळी उपस्थितांना म्हणाले.
