2 वर्षाची शिक्षा, मंत्रीपद वाचवण्यासाठी माणिकराव कोकाटेंसमोर आता कोणते पर्याय? जाणून घ्या सर्वकाही

Manikrao Kokate : राज्यात दुसऱ्यांदा महायुतीचं (Mahayuti) सरकार स्थापन झाले असून मात्र महायुतीमध्ये धुसफूस सुरु असल्याच्या बातम्या समोर येत आहे. कधी मंत्रिपदावरून तर कधी पालकमंत्रीपदावरून महायुतीमध्ये धुसफूस सुरु असल्याची चर्चा राजकीय वर्तुळात सुरु आहे. तर दुसरीकडे मस्साजोगचे सरपंच संतोष देशमुख हत्या प्रकरणात (Santosh Deshmukh Murder Case) राज्याचे मंत्री धनंजय मुंडे (Dhananjay Munde) यांच्यावर देखील गंभीर आरोप करण्यात आले आहे.
विरोधकांकडून त्यांच्या राजीनाम्याची मागणी करण्यात येत आहे. तर आता आणखी एक मंत्र्याच्या अडचणीत वाढ होताना दिसत आहे. राष्ट्रवादी काॅंग्रेसचे नेते (NCP) आणि राज्याचे कृषीमंत्री माणिकराव कोकाटे (Manikrao Kokate) आणि त्यांचे भाऊ विजय कोकाटे यांना नाशिक जिल्हा न्यायालयाने 2 वर्षांची तुरुंगवासाची शिक्षा सुनावत 50,000 रुपयांचा दंड देखील ठोठावला आहे.
नाशिक न्यायालयाने दिलेल्या या निर्णयानंतर माणिकराव कोकाटे यांच्या अडचणीत वाढ झाली आहे. या निर्णयानंतर त्यांचे मंत्रीपद आणि आमदारकी धोक्यात आली आहे. कायद्यानुसार ज्या लोकप्रतिनिधीला दोन वर्षे किंवा त्यापेक्षा जास्त काळासाठी शिक्षा होते, त्या लोकप्रतिनिधीला पदावर राहता येत नाही. त्यामुळे आता पद वाचवण्यासाठी माणिकराव कोकाटे यांच्याकडे कोणते पर्याय उपलब्ध आहे. याबाबात विधिमंडळाचे माजी सचिव अनंत कळसे यांनी सविस्तर माहिती दिली आहे.
उपलब्ध पर्याय कोणते?
या प्रकरणात बोलताना अनंत कळसे (Anant Kalse) म्हणाले की, माणिकराव कोकाटे यांना सत्र न्यायालयाने दोन वर्षांची शिक्षा सुनावली आहे. त्यामुळे माणिकराव कोकाटे या शिक्षेविरोधात उच्च न्यायालयात आपील करु शकते. त्यानंतर जर उच्च न्यायालयाने त्यांच्या शिक्षेला स्थगिती दिली तर काहीच प्रश्न नाही. पण जर उच्च न्यायालयाने स्थगिती दिली नाहीतर त्यांच्या विधिमंडळ सदस्यत्वाला धोका असू शकतो किंवा जाऊही शकतो. असं अनंत कळसे म्हणाले.
पुढे बोलताना ते म्हणाले की, सत्र न्यायलयाने दोन वर्षे किंवा त्यापेक्षा जास्त वर्षांची शिक्षा सुनावल्यामुळे आता त्यांना तातडीने उच्च न्यायालयात जावे लागणार आहे आणि तिथे या शिक्षेला स्थगिती मिळाली तर शिक्षेची अंमलबजावणी होणार नाही. पण जर उच्च न्यायालयाने स्थगिती दिली नाही तर त्यांना पुढे सर्वोच्च न्यायालयात जावे लागेल. अशी माहिती देखील त्यांनी यावेळी दिली.
पहिल्याच सामन्यात लाजिरवाणा पराभव, पाकिस्तान उपांत्य फेरीत कसा पोहचणार? जाणून घ्या समीकरण
नेमकं प्रकरण काय?
आज सत्र न्यायालयाने कृषीमंत्री माणिकराव कोकाटे आणि त्यांचे भाऊ विजय कोकाटे यांच्या विरोधातील 1995 मध्ये दाखल झालेल्या खटल्यात निकाल दिला आहे. माजी मंत्री तुकाराम दिघोळे यांनी कोकाटे यांच्याविरुद्ध कागदपत्रांमध्ये छेडछाड केल्याचा आरोप करुन फसवणुकीचा गुन्हा दाखल केला होता.