“भारताने पाकिस्तानला सन्मान द्यावा, त्यांच्याकडे अणुबॉम्ब”; काँग्रेस नेत्याचं वादग्रस्त वक्तव्य
![“भारताने पाकिस्तानला सन्मान द्यावा, त्यांच्याकडे अणुबॉम्ब”; काँग्रेस नेत्याचं वादग्रस्त वक्तव्य “भारताने पाकिस्तानला सन्मान द्यावा, त्यांच्याकडे अणुबॉम्ब”; काँग्रेस नेत्याचं वादग्रस्त वक्तव्य](https://dvmep2zap7gv4.cloudfront.net/wp-content/uploads/2024/05/aiyar.jpg)
Mani Shankar Aiyar Statement : ऐन लोकसभा निवडणुकीच्या काळात वादग्रस्त वक्तव्ये करण्याची स्पर्धाच काँग्रेस नेत्यात सुरू झाली आहे. आधी आक्षेपार्ह वक्तव्य करून काँग्रेसची फजिती करणाऱ्या सॅम पित्रोदा यांच्यानंतर मणिशंकर अय्यर यांनी पाकिस्तानबाबत वक्तव्य करून काँग्रेसला अडचणीत आणले आहे. एका युट्यूब चॅनलला दिलेल्या मुलाखतीत काँग्रेस नेते मणिशंकर अय्यर यांनी भारताने पाकिस्तानशी चर्चा करावी असे म्हटले आहे. भारताने पाकिस्तानशी चर्चा करून त्यांचा सन्मान करायला हवा. पाकिस्तानकडे अणुबॉम्ब आहे. जर आपण पाकिस्तानचा आदर केला नाही तर तिथं कुणीतरी वेडा नेता आला आणि त्याने अणुबॉम्ब बाहेर काढला तर आपण काय करणार असा सवालही अय्यर यांनी या मुलाखतीत विचारला.
कॉंग्रेस पाकिस्तानचा अजेंडा पुढे नेतंय , ते राम मंदिरालाही कुलूप…; अमित शाहांचा मोठा दावा
अय्यर पुढे म्हणाले, पाकिस्तान हा असा देश आहे ज्याचा भारताने आदर केला पाहिजे. तो आदर राखून तुम्ही हवं तसं कठोर बोलू शकता पण तुम्ही हातात बंदूक घेऊन फिरत असाल तर त्यामुळे काहीच होणार नाही. या गोष्टीने फक्त तणाव वाढेल. आपल्याकडे अणुबॉम्ब आहे. जर याचा वापर केला तर लाहोरपर्यंत पोहोचायला फक्त आठ सेकंद लागतील पण त्याची रेडिओ अॅक्टिव्हिटी अमृतसरपर्यंत पोहोचेल. जर आपल्याला विश्वगुरू व्हायचे असेल तर कोणत्याही मोठ्या समस्येवर मार्ग काढण्यासाठी कठोर परिश्रम घेण्याची गरज आहे. पण, मागील दहा वर्षात सगळं काही थांबलं आहे अशी खोचक टीका अय्यर यांनी मोदी सरकारवर केली.
दहशतवाद नष्ट करण्यासाठी चर्चा करणे खूप गरजेचे आहे. अन्यथा भारत आपल्या अहंकारापायी पाकिस्तानला कमीपणा देतोय असं पाकिस्तानला वाटू शकतं. अशावेळी जर एखादा माथेफिरू पाकिस्तानात सत्तेत आला आणि त्याने अणुबॉम्बचा वापर केला तर आपण काय करणार असा सवाल अय्यर यांनी उपस्थित केला.
Navneet Rana : काँग्रेसला मत देणं म्हणजे थेट पाकिस्तानला मत देणं; राणा ‘हे’ काय बोलल्या?
आम्ही ज्यावेळी सत्तेत होतो त्यावेळी आम्ह पाकिस्तानसोबत संबंध दृढ करण्यासाठी खूप प्रयत्न केले. परंतु, आता मागील दहा वर्षांपासून सगळे प्रयत्न थांबले आहेत. ज्यावेळी पाकिस्तानबरोबर युद्ध होण्याची चिन्हे निर्माण झाली होती तेव्हा राजीव गांधींनी शांततेचा मार्ग निवडला होता. आताही शांतता प्रस्थापित होऊ शकते परंतु, पंतप्रधान नरेंद्र मोदी युद्धाचा मार्ग शोधत आहेत अशी टीका मणिशंकर अय्यर यांनी केली. आता त्यांच्या या टीकेवर भाजपकडून काय उत्तर दिले जाते हे पाहणे महत्वाचे ठरणार आहे.