बाटल्या-कॅनचा साठा मर्यादित; युद्धाच्या पार्श्वभूमीवर मद्यनिर्मिती कंपन्यांसमोर उत्पादन थांबवण्याचे संकट
नवीन पुरवठा उपलब्ध झाला नाही, तर उत्पादन कमी करण्याची किंवा काही काळासाठी थांबवण्याची वेळ येऊ शकते, अशी भीती व्यक्त केली जात आहे.
Distillery companies face the crisis of stopping production : जागतिक पातळीवर निर्माण झालेल्या तणावपूर्ण परिस्थितीचा परिणाम आता विविध उद्योगांवर दिसू लागला आहे. मध्यपूर्वेत सुरू असलेल्या संघर्षामुळे आधीच इंधन आणि गॅसच्या पुरवठ्यावर परिणाम झाला आहे. आता या परिस्थितीचा फटका मद्यउद्योगाला देखील बसण्याची शक्यता व्यक्त केली जात आहे. विशेषतः काचेच्या बाटल्या आणि अल्युमिनियम कॅनच्या तुटवड्यामुळे काही ठिकाणी उत्पादनांवर संकट ओढवू शकते, अशी चिंता उद्योग क्षेत्रातून व्यक्त होत आहे.
अलीकडच्या काळात आखाती देशांमधील अस्थिरतेमुळे आंतरराष्ट्रीय पुरवठा साखळी विस्कळीत झाली आहे. या प्रदेशातून विविध प्रकारचे कच्चे साहित्य तसेच पॅकेजिंगसाठी लागणारे साहित्य जगभर पाठवले जाते. मात्र साध्याच्य संघर्षाच्या पार्श्वभूमीवर वाहतूक व्यवस्था आणि लॉजिस्टिक साखळीवर परिणाम झाल्याने अनेक उद्योगांना अडचणींचा सामना करावा लागत आहे.
याचा परिणाम मद्यनिर्मिती उद्योगावर देखील होण्याची शक्यता वर्तवली जात आहे. काही भागांतील उत्पादक कंपन्यांकडे काचेच्या बाटल्या आणि अल्युमिनियम कॅनचा साठा अत्यंत मर्यादित असल्याची माहिती समोर आली आहे. काही ठिकाणी हा साठा केवळ दोन आठवड्यांसाठी पुरेल इतकाच उरला असल्याचं सांगितलं जात आहे. वेळेत नवीन पुरवठा उपलब्ध झाला नाही, तर उत्पादन कमी करण्याची किंवा काही काळासाठी थांबवण्याची वेळ येऊ शकते, अशी भीती व्यक्त केली जात आहे.
महाराष्ट्रापेक्षा सुनील प्रभू यांच्यावर जास्त कर्ज? प्रभूंचा दाखला देत फडणवीसांचा विरोधकांना सवाल
उद्योग तज्ज्ञांच्या मते, मद्यनिर्मिती प्रक्रियेत पॅकेजिंग साहित्याला अत्यंत महत्व असते. तयार झालेल्या उत्पादनाचे साठवण, वाहतूक आणि बाजारात वितरण यासाठी बाटल्या आणि कॅन आवश्यक असतात. त्यामुळे या साहित्याचा पुरवठा खंडित झाल्यास संपूर्ण उत्पादन साखळीवर त्याचा थेट परिणाम होतो. विशेषतः महाराष्ट्रातील काही भागांमध्ये मद्यनिर्मिती उद्योग मोठ्या प्रमाणावर कार्यरत आहे. या उद्योगाशी हजारो कामगार तसेच वाहतूक, पॅकेजिंग आणि वितरणाशी संबंधित अनेक लहान-मोठे व्यवसाय जोडलेले आहेत. उत्पादनावर परिणाम झाल्यास त्याचा आर्थिक फटका केवळ उद्योगालाच नव्हे तर संबंधित व्यवसायांना देखील बसू शकतो. उद्योग क्षेत्रातील अंदाजानुसार, उत्पादन थांबले तर दरमहा कोट्यवधी रुपयांचे नुकसान होण्याची शक्यता आहे.
दरम्यान युद्धामुळे निर्माण झालेल्या जागतिक परिस्थितीचा परिणाम केवळ मद्यउद्योगापुरता मर्यादित नसून इंधन, गॅस आणि इतर वस्तूंच्या पुरवठ्यावर देखील त्याचा परिणाम दिसू लागला आहे. त्यामुळे अनेक क्षेत्रांमध्ये महागाई आणि तुटाड्याची शक्यता व्यक्त केली जात आहे. तज्ज्ञांच्या मते, आंतरराष्ट्रीय परिस्थिती लवकर स्थिर झाली तर पुरवठा साखळी पुन्हा सुरळीत होऊ शकते. मात्र संघर्ष दीर्घकाळ सुरू राहिला, तर त्याचा परिणाम आणखी अनेक उद्योगांवर होण्याची शक्यता नाकारता येत नाही. त्यामुळे सध्या मद्यउद्योगासमोर उभे राहिलेले हे संकट पुढे कितपत वाढते, याकडे उद्योग क्षेत्रासह बाजारपेठेचे लक्ष लागले आहे.
