क्रिकेट वर्तुळातून दु:खद बातमी; भारताचे माजी स्पिनर दिलीप दोशी यांचं ७७ व्या वर्षी निधन

Former Indian Cricketer Dilip Doshi Passes Away : क्रिकेट वर्तुळातून दु:खद बातमी समोर आली आहे. भारताचे माजी स्पिनर दिलीप दोशी यांचं हृदयविकाराने लंडनमध्ये निधन झालं. वयाच्या 77 व्या वर्षी त्यांनी अखेरचा श्वास घेतला. (Cricketer) दिलीप दोशी यांच्या निधनाने क्रिकेट विश्वावर शोककळा पसरली आहे. पीटीआय या वृत्तसंस्थेने याबाबतचं वृत्त दिलं आहे. बीसीसीआयने दोशींना श्रद्धांजली वाहिली आहे.
दिलीप दोशी यांनी वयाच्या 32 व्या वर्षी कसोटी पदार्पण केलं. दोशींनी अवघ्या 4 वर्षांमध्ये विकेट्सचं शतक पूर्ण केलं. त्यानंतर दोशी क्रिकेटपासून लांब गेले. दोशी यांनी त्यांच्या क्रिकेट कारकिर्दीवर आत्मचरित्रही लिहिलं. ‘स्पिन पंच’ असं दोशी यांच्या आत्मचरित्राचं नाव आहे. दिलीप दोशी यांनी 1979 साली 11 सप्टेंबर रोजी ऑस्ट्रेलिया विरुद्ध एमए चिदंबरम स्टेडियमधून कसोटी पदार्पण केलं. विशेष म्हणजे दोशींनी पदार्पणात 5 विकेट्स घेण्याची कामगिरी केली होती.
जबरदस्त, शानदार या संघाने रचला इतिहास; सलग पाच विजय अन् T20 World Cup 2026 साठी पात्र
दोशींनी पदार्पणात दोन्ही डावात एकूण 8 विकेट्स घेतल्या होत्या. तर दोशींनी एम चिन्नास्वामी स्टेडियममध्ये 14 सप्टेंबर 1983 रोजी कसोटी कारकीर्दीतील अखेरचा कसोटी सामना पाकिस्तान विरुद्ध खेळला. दोशींनी 33 कसोटी सामन्यांमधील 55 डावांमध्ये एकूण 114 विकेट्स मिळवल्या. दोशींनी 6 वेळा 5 विकेट्स घेतल्या होत्या. दोशींची एकदिवसीय कारकीर्द 3 वर्षांची राहिली. दोशींनी 6 डिसेंबर 1980 रोजी मेलबर्नमध्ये ऑस्ट्रेलिया विरुद्ध पदार्पण केलं. तर पाकिस्तान विरुद्ध 17 डिसेंबर 1982 साली अखेरचा एकदिवसीय सामना खेळला.
दिलीप दोशी यांच्या पश्चात त्यांची पत्नी कालिंदी, मुलगा नयन आणि मुलगी विशाखा असा परिवार आहे. नयन यानेही फर्स्ट क्लास क्रिकेटमध्ये वडिलांप्रमाणे सौराष्ट्र आणि सरेचं प्रतिनिधित्व केलं. दोशी गेल्या 1 दशकापेक्षा जास्त काळापासून लंडनमध्ये राहत होते. दरम्यान दिलीप दोशी यांच्या निधनानंतर अनेक आजी माजी क्रिकेटपटूंनी त्यांच्यासोबतच्या आठवणींना उजाळा दिला. तसेच क्रिकेट चाहत्यांनीही दोशींबाबतच्या कामगिरीचा उल्लेख सोशल मीडियावर पोस्ट करत केला आहे.