दलित-आदिवासी राष्ट्रपती बनवण्यामागे BJP चा स्वार्थ; नव्या संसद सदनाच्या उद्घाटनवरून खर्गेंची टीका

दलित-आदिवासी राष्ट्रपती बनवण्यामागे BJP चा स्वार्थ; नव्या संसद सदनाच्या  उद्घाटनवरून खर्गेंची टीका

Mallikarjun Kharge’s attack on the inauguration of the new Parliament building : नवीन संसद भवनाच्या (New Parliament House) उद्घाटनाची तारीख निश्चित करण्यात आली असून, 28 मे रोजी पंतप्रधान नरेंद्र मोदी (Prime Minister Narendra Modi) यांच्या हस्ते नवीन संसद भवनाचे उद्घाटन होणार आहे. लोकसभेचे अध्यक्ष ओम बिर्ला यांनी गुरुवारी त्याची अधिकृत घोषणा केली. मात्र, नवीन संसद भवनाच्या उद्घाटनावरून राजकीय संघर्ष शिगेला पोहोचला आहे.

मोदींच्या हस्ते होणाऱ्या या उद्घाटनाला काँग्रेस नेते राहुल गांधी (Rahul Gandhi) यांनी विरोध केला. तर त्यानंतर आता काँग्रेसचे अध्यक्ष मल्लिकार्जुन खर्गे (Mallikarjun Kharge) यांनी राष्ट्रपतींना उद्घाटन कार्यक्रमाला आमंत्रित न केल्याबद्दल मोदी सरकारवर निशाणा साधला आहे.

मल्लिकार्जुन खर्गे म्हणाले की, मोदी सरकारने केवळ निवडणुकीच्या फायद्यासाठी दलित आणि आदिवासी समुदायाच्या व्यक्तीला राष्ट्रपती केले असल्याचे दिसते, अशा शब्दात मोदी सरकारवर टीका केली.

खर्गे म्हणाले की, माजी राष्ट्रपती रामनाथ कोविंद यांना संसदेच्या नवीन इमारतीच्या पायाभरणी प्रसंगी निमंत्रित करण्यात आले नव्हते, तसेच आता राष्ट्रपती द्रौपदी मुर्मू यांना उद्घाटनप्रसंगी आमंत्रित करण्यात आलं नाही. ते म्हणाले की, राष्ट्रपती हे देशातील सर्वोच्च घटनात्मक पद आहे. खर्गे यांच्या आधी काँग्रेस नेते राहुल गांधी यांनीही संसदेच्या नव्या इमारतीबाबत पंतप्रधान नरेंद्र मोदींवर निशाणा साधला होता.

‘राष्ट्रपतींनी नवीन संसद भवनाचे उद्घाटन करावे’

एका ट्विटमध्ये काँग्रेस अध्यक्ष खर्गे यांनी लिहिलं की, केवळ राष्ट्रपती हे सरकार, विरोधी पक्ष आणि नागरिकांचे प्रतिनिधित्व करतात. राष्ट्रपती हे भारताचे प्रथम नागरिक आहेत. त्यांनी पुढे लिहिले की नवीन संसद भवनाचे उद्घाटन त्यांच्याकडून (राष्ट्रपती) झाल्यास त्यातून लोकशाही मूल्य आणि घटनात्मक शिष्टाचाराची बांधिलकी आणि प्रतिष्ठा प्रतिबिंबित होईल.

‘शुभमन गिलच्या बहिणीला अपशब्द वापरल्यास…’; महिला आयोगाचा ट्रोलर्सना थेट इशारा

मात्र, मोदी सरकार तसं करत नाही. मोदी सरकारने सातत्याने शिष्टाचाराचा अवमान केला आहे. भाजप-आरएसएस सरकारमध्ये राष्ट्रपती पद हे केवळ औपचारिकतेसाठी आहे, असा घणाघाणत त्यांनी केला.

पंतप्रधानांनी उद्घाटन करणे चुकीचं
मल्लिकार्जुन खर्गे यांच्या आधी काँग्रेस नेते राहुल गांधी यांनीही या उद्घाटनावरून टीका केली होती. पंतप्रधानांच्या हस्ते नवीन संसद भवनाचे उद्घाटन चुकीचे आहे. त्यामुळं नवीन संसद भवनाचे उद्घाटन राष्ट्रपतींनी करावे, पंतप्रधानांनी नव्हे, असे राहुल गांधी म्हणाले होते.

लोकसभा अध्यक्ष ओम बिर्ला यांनी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांची भेट घेऊन नवीन संसद भवनाचे उद्घाटन करण्याची विनंती केली. नवीन संसद भवनाचे बांधकाम पूर्ण झाल्यानंतर गुरुवारी (ता. 18) लोकसभा सचिवालयाने याबाबतची माहिती दिली. दरम्यान, त्यानंतर राहुल गांधींच्या वक्तव्याने आणि खर्गे यांच्या ट्विटने आता नव्या वादाला तोंड फुटले असून भाजपकडून यावर काय प्रत्युत्तर येतं, हेच पाहणं महत्वाचं आहे.

Tags

follow us
  • fb
  • instagram
  • youtube