सदर्न कमांडकडून ‘मिलिटरी-सिव्हिल फ्यूजन अभियान’; समन्वयातून राष्ट्रीय सुरक्षेची एकात्मिक तयारी अधिक मजबूत
पुण्यातील मुख्यालयात मल्टी-डोमेन धोक्यांचे मूल्यांकन करण्यासाठी उच्चस्तरीय टेबल टॉप सराव आयोजित करण्यात आला.
‘Military-Civil Fusion Campaign’ : सदर्न कमांडने आपल्या कार्यक्षेत्रात ‘मिलिटरी सिव्हिल फ्यूजन अभियान’ अंतर्गत व्यापक उपक्रम राबवले. या उपक्रमाद्वारे सशस्त्र सेना, नागरी प्रशासन, सुरक्षा यंत्रणा, शैक्षणिक संस्था आणि उद्योग क्षेत्र यांना एकत्र आणून राष्ट्रीय सुरक्षेची एकात्मिक तयारी अधिक सक्षम करण्यात आली. महाराष्ट्र, गुजरात, राजस्थान तसेच दक्षिण भारतातील विविध ठिकाणी हे उपक्रम राबवण्यात आले. यामुळे भारतीय लष्कराच्या ‘Whole-of-Nation’ दृष्टिकोनाची पुनःप्रत्ययास पुष्टी झाली.
संस्थात्मक समन्वय, एजन्सींमधील संवाद आणि जटिल सुरक्षात्मक आव्हानांना प्रतिसाद देण्याची क्षमता वाढवण्यावर भर देण्यात आला. या अभियानात केंद्रीय सशस्त्र पोलीस दल, राज्य पोलीस, नागरी प्रशासन, आपत्ती व्यवस्थापन यंत्रणा, विमानतळ आणि नागरी विमान वाहतूक संस्था, वन व खाण विभाग, एनसीसी, शैक्षणिक संस्था आणि उद्योग क्षेत्रातील प्रतिनिधींनी सहभाग घेतला.
यामुळे अंतर्गत सुरक्षा, हवाई क्षेत्र जागरूकता, संकट व्यवस्थापन, आपत्ती प्रतिसाद आणि तंत्रज्ञानाधारित निरीक्षण यांसारख्या क्षेत्रांमध्ये एकात्मिक नियोजनाची उपयुक्तता सिद्ध झाली. पुण्यातील मुख्यालयात मल्टी-डोमेन धोक्यांचे मूल्यांकन करण्यासाठी उच्चस्तरीय टेबल टॉप सराव आयोजित करण्यात आला. या सरावाचे नेतृत्व लेफ्टनंट जनरल धीरज सेठ यांनी केले. तसेच महाराष्ट्र सरकारचे वरिष्ठ अधिकारी, रेल्वे विभागाचे प्रतिनिधी आणि विविध सुरक्षा यंत्रणांचे अधिकारी उपस्थित होते.
याशिवाय पुण्यात औंध मिलिटरी स्टेशन येथे बहु-एजन्सी सराव, भोपाळ येथे ड्रोनविरोधी परिसंवाद, बाबिना येथे संयुक्त गस्त आणि निरीक्षण उपक्रम, चेन्नई येथे सुरक्षा परिषद, तसेच बेलगावी, हैदराबाद, जोधपूर आणि जैसलमेर येथे विविध समन्वय उपक्रम पार पडले. या उपक्रमाचे वैशिष्ट्य म्हणजे केवळ समन्वय नव्हे, तर सर्व यंत्रणांनी एकत्र येऊन सामूहिक उद्दिष्टाने काम केले. यामुळे विश्वास वाढला, माहितीची देवाणघेवाण सुधारली आणि निर्णय प्रक्रिया अधिक वेगवान झाली.
आधुनिक सुरक्षा आव्हानांना एकट्याने सामोरे जाणे शक्य नाही हे अभियान दर्शवते. लष्कर आणि नागरी यंत्रणांमधील सुसंगत भागीदारीमुळे भविष्योन्मुख, लवचिक आणि समन्वयित सुरक्षा प्रणाली विकसित होत आहे.