पश्चिम बंगालमध्ये मध्यरात्री हायहोल्टेज ड्रामा; राहत्या घरातून वनमंत्र्यांना अटक

पश्चिम बंगालमध्ये मध्यरात्री हायहोल्टेज ड्रामा; राहत्या घरातून वनमंत्र्यांना अटक

Jyotipriya Mallik : राजकीयदृष्ट्या अत्यंत संवेदनशील असलेल्या पश्चिम बंगाल राज्यातून मोठी बातमी समोर आली आहे. आज पहाटे साडेतीन वाजण्याच्या सुमारास पश्चिम बंगालचे वनमंत्री ज्योतिप्रिय मलिक यांना अटक करण्यात आली. ईडीचे अधिकारी आणि सीआरपीएफचे जवान त्यांना कोलकात्यातील सीजीओ कॉम्प्लेक्समधील ईडीच्या कार्याालयात घेऊन गेले. या कारवाईने बंगालच्या राजकारणात मोठी खळबळ उडाली आहे. सत्ताधारी तृणमूल काँग्रेसकडून भाजपावर टीकेची झोड उठविण्यात आली आहे. काल गुरुवारी ईडीने मंत्री मलिक यांच्या ठिकाणांवर छापेमारी केली. रेशन घोटाळ्यातील प्रकरणात ही कारवाई करण्यात आली आहे. अटक करण्यात आल्यानंतर मंत्री मलिक यांनी आपल्याला मोठ्या कटात अडकवण्यात आल्याचा आरोप केला.

राज्यातील रेशन घोटाळ्यात मंत्री मलिक यांचा हात असल्याचा आरोप ईडीने केला आहे. वनमंत्रीपदाच्या आधी मलिक यांच्याकडे अन्न पुरवठा मंत्रालयाची जबाबदारी होती. या काळात त्यांनी रेशनिंग धान्य पुरवठ्यात घोटाशा केल्याचे ईडीने म्हटले आहे. त्यानुसार चौकशीही सुरू होती. गुरुवारी सकाळी साडेसहा वाजता ईडीचे अधिकारी मलिक यांच्या सॉल्ट लेक परिसरातील घरी दाखल झाले होते. तेव्हापासून त्यांच्या घराची झडती घेतली जात होती. मलिक यांचीही चौकशी केली जात होती. मलिक यांचे स्वीय सचिव अमित डे यांच्या घरीही ईडीने छापा टाकला होता.

तर ईडी विरोधात तक्रार करणार – मुख्यमंत्री बॅनर्जी 

या दरम्यान, मुख्यमंत्री ममता बॅनर्जी यांनी गुरुवारी दुपारी पत्रकार परिषदेत सांगितले होते की मलिक अस्वस्थ आहेत. या तपासणी दरम्यान जर मलिक यांच्याबरोबर काही झालं तर भाजपा आणि ईडी विरोधात पोलिसांत तक्रार दाखल करण्याचा इशारा बॅनर्जी यांनी दिला होता. राजकारणातून अशा प्रकारच्या कारवाया केल्या जात असल्याचा आरोप मुख्यमंत्री बॅनर्जी यांनी केला होता.

Priyanka Gandhi : PM मोदींवरील टीका भोवली; निवडणूक आयोगाने प्रियंका गांधींना धाडली नोटीस

घोटाळ्यात मलिक कसे अडकले ? 

सूत्रांनी दिलेल्या माहितीनुसार केंद्रीय तपास यंत्रणांनी व्यावसायिक बकीबुर रहमान यांना अटक केल्यानंतर मंत्री मलिक यांच्यावर छापा टाकला. रहमान यांना 53 तासांच्या चौकशीनंतर अटक करण्यात आली होती. त्यांच्या फ्लॅटमधून सरकारी कार्यालयांचे शिक्के असलेले 100 पेक्षा जास्त कागदपत्र सापडले होते. त्यानंतर कारवाईचा वेग वाढविण्यात आला होता.

मंत्री मलिक यांच्यावर कोणते आरोप ?

ईडीच्या सूत्रांनी सांगितले की रहमान यांच्या कंपन्यांत 50 कोटींपेक्षा जास्त गुंतवणूक केली गेली होती. कोविड लॉकडाऊनच्या काळात राज्यात सार्वजनिक वितरण प्रणालीत अनेक अनियमितता समोर आल्या होत्या. यामध्ये मोठ्या प्रमाणात भ्रष्टाचार झाला होता. त्यावेळी ज्योतिप्रिय मलिक अन्न आणि नागरी पुरवठा विभागाचे मंत्री होते. त्यामुळे या प्रकरणात आधी छापेमारी करण्यात आली. नंतर मलिक यांची चौकशी करण्यात आली. त्यानंतर त्यांना अटक करण्यात आली.

Tags

follow us
  • fb
  • instagram
  • youtube