Bihar Protest Case : अखेर बिहार सरकारची माघार, आंदोलकांवरील गुन्हे मागे घेणार…’त्या’ व्हिडिओची सर्वत्र चर्चा
Neet Paper Leak : नीट पेपरफुटीविरोधातील आंदोलकांवरील सर्व गुन्हे मागे घेण्याचा निर्णय बिहार सरकारकडून घेण्यात आला आहे.
Bihar Protest Case : नीट पेपरफुटीविरोधात देशभरात विद्यार्थ्यांकडून (Bihar Protest Case ) आंदोलन छेडण्यात आले. बिहारमध्ये या आंदोलनादरम्यान पोलिसांकडून एके-47 चा वापर करण्यात आल्याचा व्हिडिओ समाजमाध्यमांवर व्हायरल झाला. या मुद्द्यावरुन विरोधकांनी सत्ताधाऱ्यांना संसदेत चांगलंच धारेवर धरल्याचं पाहायला मिळालं. त्यानंतर अखेर बिहार सरकारला माघार घ्यावी लागलीयं. नीट पेपरफुटीविरोधातील आंदोलनात दाखल गुन्हे मागे घेण्याचा निर्णय बिहार सरकारने घेतला आहे. यासोबतच अटकेत असलेल्या सर्व आंदोलकांना सोडलं जाणार असून पुढील काळात कोणतीही कारवाई केली जाणार नसल्याचा विश्वासही बिहार सरकारने दिला आहे.
समाजमाध्यमांवर पोलिसांनी एके-47 चा वापर केल्याचा व्हिडिओ व्हायरल झाला. त्यानंतर सर्वसामान्य नागरिकांसह विरोधकांकडून संतापाची लाट उसळली. या प्रकरणी काल सोमवारी सायंकाळी बिहार सरकारने आंदोलकांवरील गुन्हे मागे घेण्याचे आदेश दिले असून बिहार सरकारच्या गृह विभागाचे सचिव छत्रनील सिंह यांनी आदेश जारी केले आहेत.
बिहारच्या गृहविभागाच्या माध्यमातून जारी करण्यात आलेल्या आदेशानुसार नीट यूजी पेपरफुटी विरोधात सुरु असलेल्या आंदोलनाच्या पार्श्वभूमीवर बिहार सरकारकडून 26 जुलैच्या सायंकाळी 6 पूर्वी दाखल करण्यात आलेले गुन्हे मागे घेण्यात येणार आहेत. आंदोलनातील सहभागी व्यक्तींविरोधात सरकार कोणत्याही प्रकारची दंडात्मक किंवा कायदेशीर कारवाई करणार नाही, असं सांगण्यात आलं. 26 जुलैच्या सायंकाळी 6 वाजण्यापूर्वी ज्या केसेस दाखल झाल्या असतील त्या तात्काळ मागे घेण्याची कारवाई केली जाईल. या प्रकरणांमध्ये अटक करण्यात आलेल्या व्यक्तींना तातडीनं मुक्त केलं जाईल.